पिंपरी : आषाढी वारीसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बुधवारी (१८ जून) तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे उद्या गुरुवारी (१९ जून) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून देहू, आळंदीत हजारो वारकरी दाखल झाले असून, सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. देहूत प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांसमवेत पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदी आणि देहूमध्ये दाखल झाल्या आहेत. आळंदी-देहूच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यांवर खांद्यावर भागवत धर्माच्या पताका घेतलेले वारकरी आणि डोईवर वृंदावन घेऊन निघालेल्या महिला दिसून येत आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये प्रत्येकाच्या मुखातून हरिनामाचे सूर निघत आहेत. आळंदी आणि देहू परिसरात आणि पंचक्रोशीत विविध ठिकाणी वारकऱ्यांच्या राहुट्या दिसून येत आहेत. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे.
पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होत असलेल्या वारकरी आणि भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाकडूनही सज्जता ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांची तयारी केली जात आहे. तुकोबांच्या पालखीचे १८ जूनला देहूतून प्रस्थान झाल्यानंतर त्या दिवशी पालखी देहूतच इनामदार वाड्यात मुक्कामी राहणार आहे. १९ जूनला माउलींची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यंदा प्रस्थान सोहळा गुरुवारी आल्याने परंपरेप्रमाणे नित्य गुरुवारची माउलींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि आरती झाल्याशिवाय पालखीचे प्रस्थान करता येणार नाही. त्यामुळे रात्री आठ वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे. गुरुवारी पालखीचा मुक्काम आळंदीतील गांधी वाड्यात असणार आहे. यादिवशी तुकोबांची पालखी आकुर्डी मुक्कामी पोहोचणार आहे.
तुकोबांचे पालखी प्रस्थान दुपारी
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा यंदा ३४० वा पालखी सोहळा असून, प्रस्थान सोहळ्याची सुरुवात १८ जूनला पहाटेपासूनच होणार आहे. पहाटे साडेचार वाजल्यापासून देऊळवाडा, शिळा मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिर, तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या वतीने महापूजा होईल. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन, इनामदारवाड्यातून संत तुकाराम महाराज पादुकांचे दुपारी दोन वाजता मुख्य देऊळवाड्यात आगमन, पालखी प्रस्थान सोहळ्यास दुपारी अडीच वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमास प्रारंभ होईल. सायंकाळी पाच वाजता पालखी प्रदक्षिणा, साडेपाच वाजता पालखी इनामदार वाड्याकडे मार्गस्थ होईल आणि रात्री इनामदार वाड्यात पालखी सोहळ्याचा मुक्काम असेल. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार असल्याची माहिती पालखी सोहळ्याचे प्रमुख गणेश महाराज मोरे यांनी दिली.