इंदापूर : दौंड आणि इंदापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतमालाचे नुकसान; तसेच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावोगावी जाऊन बाधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच, प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या सूचना केल्या. बाधित शेतकऱ्यांपैकी कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी तलाठी, मंडल अधिकारी यांनी घेण्याचे आदेश दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिगवण परिसरातील बाधित क्षेत्राची पाहणी करून प्रशासनाला सूचना केल्या. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, प्रांत अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे आदी उपस्थित होते.
भिगवण परिसरातील मदनवाडी, तक्रारवाडी, डिकसळ, शेटफळगढे, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली आदी गावांमधील शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांची शेतीची अवजारे आणि गायी-म्हशींसह शेळ्या, मेंढ्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. कृषी पंप आणि विद्युत उपकरणांचे नुकसान झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंदापुरातील १५ गावांना फटका

नुकसान झालेल्या पिकांचे, फळबागांचे आणि मालमत्तांचे तत्काळ पंचनामे सुरू करून नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली. याबाबत पाटील यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली.अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याचे माजी सभापती, सोनई उद्योग समूहाचे ज्येष्ठ संचालक प्रवीण माने यांनी केली. त्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.