पुणे : ‘आयुकाच्या माध्यमातून देशातील संशोधन संस्थांसाठी नवा आदर्श घालून देणारे डॉ. जयंत नारळीकर यांचा वारसा शालेय अभ्यासक्रमातून शिकवायला हवा. त्यांचा वारसा पुढे नेणारी पिढी घडवणे हीच नारळीकरांना खरी श्रद्धांजली असेल,’ अशा शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने आयोजित ‘डॉ. जयंत नारळीकर मेमोरिअल लेक्चर’मध्ये डॉ. माशेलकर बोलत होते. ‘आयुका’चे संचालक डॉ. आर. श्रीआनंद, माजी संचालक डॉ. अजित केंभावी, सेंटरचे संचालक मेजर जनरल (निवृत्त) नितीन गडकरी या वेळी उपस्थित होते.
डॉ. माशेलकर म्हणाले, ‘शास्त्रज्ञ म्हणून डॉ. जयंत नारळीकर यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. देशातील अनेक शास्त्रज्ञांना घडवण्याचे काम त्यांनी केले. ‘आयुका’ हा त्यांच्या कार्याचा जिवंत दाखलाच आहे. तेथे त्यांनी संशोधनासाठी पोषक वातावरण निर्माण केले. संस्था स्थापन करून ती कशी चालवावी, याचा वस्तुपाठ घालून दिला. देशातील संशोधन संस्थांसाठी त्यांनी नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.’
‘सर्वसामान्यांनाही विज्ञान-संशोधनाची गोडी लागावी, तसेच संशोधन क्षेत्रातील नव्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची कवाडे खुली करण्यासाठी नारळीकर यांनी भारतीय भाषांमधून अनेक व्याख्याने, उपक्रमांचे आयोजन केले. इंग्रजीचे वर्चस्व असलेल्या खर्चिक विज्ञानाला सर्वांसाठी खुले करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. शास्त्रज्ञ म्हणून ते महान होते. मात्र, त्याहीपेक्षा त्यांनी विज्ञान, संशोधन क्षेत्रासह समाजाला दिलेला वारसा मोलाचा आहे. शासनाने पाठ्यपुस्तकांची नव्याने निर्मिती करताना नारळीकर यांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा,’ असे माशेलकर यांनी सांगितले.
केंभावी म्हणाले, ‘शास्त्रज्ञ म्हणून आयुष्याच्या अखेरपर्यंत नारळीकर कार्यरत होते. संशोधन कार्यातून त्यांच्या कामाचा विस्तार ध्यानात येतो. अतुलनीय कार्य हाच त्यांचा वारसा आहे.’
मोठ्या संस्थांमध्ये प्रवेश न मिळाल्याने खचून जाणाऱ्या संशोधकाला ‘आयुका’च्या माध्यमातून नवी उभारी देण्याचे, संधी देण्याचे काम डॉ. जयंत नारळीकर यांनी केले. उत्तम शिक्षक असलेले नारळीकर सहृदयी प्रशासक होते. आग्रही भूमिका न घेता सर्वांच्या मतांचा आदर करून ते निर्णय घेत असत. आयुका आणि नारळीकर हे समीकरण त्यांच्या कार्यामुळे दृढ झाले.- प्रा. डॉ. आर. श्रीआनंद, संचालक, आयुका