पुणे : ‘शास्त्रज्ञ असलेले डॉ. जयंत नारळीकर यांनी विज्ञान साहित्यामध्ये अत्यंत मोलाचे योगदान दिले. साध्या-सोप्या भाषेत विज्ञानाचे धडे देऊन त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि मराठी साहित्याला बळ देण्याचे काम केले. डॉ. नारळीकरांच्या निधनाने साहित्याच्या नभांगणातील लखलखता तारा निखळला,’ अशी भावना साहित्यिकांनी बुधवारी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठी विज्ञान परिषद आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ यांच्या वतीने साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. राजा दीक्षित, ज्येष्ठ लेखक राजीव तांबे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित, ज्येष्ठ माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र सराफ या वेळी उपस्थित होते.

‘मराठीत सातत्याने विज्ञान साहित्य निर्माण होतच होते. डॉ. नारळीकर यांनी विज्ञान साहित्याला नवी दिशा दिली. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे,’ असे सासणे म्हणाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्रीपाल ललवानी म्हणाले, ‘शास्त्रज्ञ असलेल्या डॉ. नारळीकर यांच्या लेखनाने, पाठिंब्याने अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ अधिक सशक्त झाली. त्यांचा पाठिंबा असल्यानेच फल ज्योतिषाला आव्हान देता आले.’

‘विज्ञान साहित्य चळवळीला त्यांनी प्रवाहित केले. ते प्रयोगशाळेइतकेच विज्ञानाच्या लोकांगणात रमले. त्यांच्या जाण्याने साहित्य चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे काम पुढे नेणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल,’ असे प्रा. राजा दीक्षित यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रा. जोशी म्हणाले, ‘साध्या-सोप्या भाषेत विज्ञानातील किचकट संकल्पना सामान्यांना समजावून सांगण्याचे काम डॉ. जयंत नारळीकर यांनी केले. कल्पना आणि वास्तव यांच्या मिश्रणातून विज्ञान कथा आणि कादंबऱ्यांची निर्मिती करताना त्यात विज्ञानाची माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे दोन्ही हेतू साध्य होतील, असा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले.’