पुणे : संततधार पावसामुळे पालेभाज्या लागवडीवर परिणाम झाला असून, बाजारात पालेभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. आवक कमी झाल्याने सर्व पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या एका जुडीचे दर ४० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पालेभाज्यांचे दर महिनाभर तेजीत राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
‘राज्यातील सर्व भागात गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. लागवड झालेल्या फळभाज्या, पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. बाजारात पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्यापासून कमी प्रमाणावर होत असून, सर्व प्रकाराच्या पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत’, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
‘मार्केट यार्डातील तरकारी विभागात सोमवारी ८० हजार ते एक लाख जुडी कोथिंबिर, मेथी १० ते १५ हजार जुडी, शेपू ८ ते १० हजार जुडी, राजगिरा ८ ते १० हजार जुडी, कांदापात १० ते १५ हजार जुडी, मुळे ३ ते ४ हजार जुडी अशी आवक झाली. नेहमीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक तशी कमी प्रमाणावर होत आहे’, अशी माहिती सूयर्वंशी यांनी दिली.
उपवासाच्या भाज्याही महाग
‘नवरात्रोत्सवात महिलांकडून नऊ दिवस उपवास केले जातात. उपवास काळात भेंडी आणि राजगिऱ्याला मागणी वाढते. भेंडी आणि राजगिऱ्याची आवक कमी प्रमाणावर होत आहे. किरकोळ बाजारात राजगिऱ्याच्या एका जुडीचे दर ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो भेंडीचे दर १२० ते १६० रुपयांपर्यंत आहेत. गवारीचे दर तेजीत असून, एक किलो गवारीचे दर १४० ते २०० रुपये किलो आहेत’, असे किरकोळ बाजारातील पालेभाजी व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.
पुणे, नाशिक, मराठवाड्यासह सर्व विभागात पाऊस झाल्याने पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्या खराब होण्याचे प्रमााण जास्त असते. नवीन लागवडीसाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. पालेभाज्यांचे दर महिनाभर तेजीत राहणार आहेत. – राजेंद्र सूर्यवंशी, पालेभाजी व्यापारी, तरकारी विभाग, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड
पालेभाज्यांचे जुडीचे दर
पालक – ४० ते ५० रुपये
मेथी – ३० ते ४० रुपये
कोथिंबिर – ३० ते ३० रुपये
राजगिरा – ५० ते ६० रुपये