जलसंपदा विभागाचा दावा; अतिक्रमणे, रस्ते, भरावांमुळे पुणे, पिंपरी-चिंचवडची दैना
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा नद्यांच्या पात्रात झालेली बेसुमार अतिक्रमणे, बेकायदा भराव आणि वाहतूक अशा विविध कारणांमुळे नदीपात्र आक्रसले आहे. त्यामुळे ४० हजार क्सुसेस या वेगाने पाणी नदीपात्रात सोडल्यानंतरही दोन्ही शहरांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक ६० हजार क्युसेकने पाणी सोडल्यानंतर निळी पूररेषा आणि एक लाख क्युसेकने पाणी सोडल्यानंतर लाल पूर रेषा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या पूररेषांच्या आतमध्ये झालेली अतिक्रमणे, तयार करण्यात आलेले रस्ते, भराव यामुळे दोन्ही शहरांची दैना झाली आहे. या परिस्थितीला सर्वस्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका जबाबदार असल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून सोमवारी करण्यात आला.
धरणांमधून ४० हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांची दैना उडाली आहे. तब्बल तीन हजार दोनशे कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले असून, अनेक ठिकाणची वाहतूकही ठप्प झाली आहे. याबाबत जलसंपदा विभागाने दोन्ही महापालिकांना दोषी ठरवले आहे. नदीपात्रातील अतिक्रमणे, बेकायदा भराव, सर्रास होणारी वाहतूक अशा विविध कारणांमुळे नद्यांचे काठ, प्रवाह बदलला आहे. निळी पूररेषा, लाल पूररेषा निश्चित केल्यानंतरही या रेषांच्या आतमध्ये अनेक बांधकामे, रस्ते, भराव टाकण्यात आले आहेत. याबाबत दोन्ही महापालिकांनी गंभीरपणे विचार करून कार्यवाही करणे आवश्यक आहे. दोन वर्षांपूर्वी २०१६ मध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात ४० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तेव्हा दोन्ही शहरांमध्ये आजएवढी गंभीर परिस्थिती उद्भवली नव्हती. त्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये नदीपात्रात अतिक्रमणे, भराव, नद्यांचे प्रवाह बदलण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे, याकडे जलसंपदा विभागाने लक्ष वेधले. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही शहराला, तर पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत.
या धरणांच्या परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग करणे क्रमप्राप्त आहे. अशा परिस्थितीत धरणांमध्ये पाणी अडवून ठेवणे, अशक्य आहे. या पाश्र्वभूमीवर पुढील वर्षी अशी परिस्थिती येऊ नये, म्हणून नदीपात्रातील वर्दळ कमी करणे, भराव आणि अतिक्रमणे काढून टाकण्याची कामे करावीत, अशी अपेक्षा जलसंपदा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
नदीपात्रात अतिक्रमणे, निष्क्रिय प्रशासन
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत पर्यावरणवादी कार्यकर्ते सारंग यादवाडकर, सुजित पटवर्धन, शैलजा देशपांडे, विजय कुंभार यांच्यासह पर्यावरणवादी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांना पत्र दिले आहे. वातावरणातील बदलांमुळे शहरातील पर्जन्यमानात बदल झाला आहे. मात्र, धरणातून कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीपात्रालगतच्या सोसायटय़ा, इमारतींमध्ये पाणी शिरण्याच्या घटना या नैसर्गिक नसून मानवी हस्तक्षेपांमुळेच उद्भवल्या आहेत. त्यामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण होत असून, पुराची धोकादायक पातळीही दिवसेंदिवस वाढत आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या हव्यासापोटी नदीपात्रात होत असलेली अतिक्रमणे, निष्क्रिय प्रशासन यामुळेच हे प्रकार उद्भवत आहेत, या बाबी पत्राद्वारे निदर्शनास आणल्या आहेत.
६५० जणांची सुटका
पुणे : शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि धरणातून मोठय़ा प्रमाणावर नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे दोन दिवसांत एकूण ६३७ जणांची सुटका करण्यात आली. तसेच सुमारे साडेपाच हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले.
शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि धरणातून मोठय़ा प्रमाणावर नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नदीपात्राच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाल्यामुळे शहरातील शेकडो सोसायटय़ांना पुराचा मोठा फटका बसला. महापालिका, जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (एनडीआरएफ) रविवारपासून बचावकार्य हाती घेतले असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. अग्निशमन दल, महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाकडून पुरात अडकलेल्या तब्बल ६३७ व्यक्तींची आणि सतरा प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे.
पुरामुळे झाडपडी, घरपडी, सोसायटय़ा, वस्त्या, इमारतींमध्ये पाणी शिरण्याच्या घटनाही मोठय़ा प्रमाणावर घडल्या आहेत. मंगळवारी एकूण ९ झाडपडीच्या घटना घडल्या असून एकूण पंधरा इमारती, सोसायटय़ांध्ये पाणी शिरले आहे. तर मंगळवारी दिवसभरात ३०३ व्यक्तींची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून आणखी पाणी सोडण्याची शक्यता असल्यामुळे आपत्ती निवारण पथकही दक्ष असून नदीपात्रालगतच्या सोसायटय़ांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दोन दिवसांमध्ये एकूण साडेपाच हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या तिन्ही धरणांतून नदीपात्रात पाण्याचा विर्सग सुरू करण्यात आला आहे. रविवारी सकाळपासूनच नदीपात्रात मोठय़ा प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आल्यानंतर नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली. नदीचे पाणी नागरी वस्त्या, झोपडपट्टय़ा, सोसायटय़ांमध्ये शिरले आहे. त्यामुळे नदीपात्रालगतच्या रहिवाशांचे महापालिकेच्या नजीकच्या शाळांमध्ये, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तात्पुरते स्थलांतर करण्यात येत आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे महापालिका प्रशासन आणि आपत्ती निवारण कक्षाकडून नदीपात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यानुसार काही भागातील नागरिकांनी धोक्याचा इशारा मिळाल्यानंतर सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. मात्र काही भागांतील नागरिकांकडून स्थलांतर करण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे त्यांचे स्थलांतर करताना प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.