पुणे :पुणे महापालिकेची पावसाळापूर्व कामे सध्या सुरू आहेत. मात्र, त्यांची परिणामकारता सध्या रोज बरसणारा पाऊस उघडी पाडतो आहे. यंदा पाऊस अधिक पडेल, असा अंदाज असताना, पावसाळ्याच्या दिवसांत शहराची नेमकी काय परिस्थिती असेल?
पावसाळ्यात शहरातील कोणत्याही भागात, तसेच रस्त्यावर पाणी साचून राहू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या वळवाच्या पावसातच शहरातील काही रस्त्यांची अवस्था खराब होण्यास सुरुवात झाली असून, अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचत असल्याचेही समोर आले आहे.
शहरात सध्या पावसाळापूर्व कामे सुरू आहेत. शिवाय, पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिनी याबरोबरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीच्या केबल टाकण्यासाठी रस्तेखोदाई सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने उभारण्यात येणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठीदेखील रस्ते खोदण्यात येत आहेत. खोदलेले रस्ते ३१ मेपर्यंत बुजविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्या दृष्टीने कामे केली जात असल्याचा दावा महापालिकेच्या पथ विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र, सध्या पडत असलेल्या पावसाने या खोदलेल्या रस्त्यात पाणी जात असून, खणलेल्या रस्त्यांच्या अवतीभवती चिखलाचे साम्राज्य दिसते आहे.
पुणे महापालिकेच्या वतीने दर वर्षी पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक ती कामे पूर्ण करण्याचा दावा केला जातो. मात्र, पावसाळ्यात अनेक भागांत पाणी शिरून तेथील जनजीवन विस्कळीत झाल्याचे प्रकार घडतात. रस्त्यांवरही खड्डे पडून डांबर आणि खडी वेगळी होते. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये पाऊस पडण्याच्या पद्धतीत बदल झाल्याने पावसाळापूर्व कामे केल्यानंतरही नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते.
महापालिकेचा कारभार प्रशासनाच्या हाती असून, लक्ष ठेवण्यासाठी तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनावर कोणाचा अंकुश आहे की नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. केंद्रासह राज्यात महायुतीची सत्ता आहे. सध्या महापालिकेचे सभागृह अस्तित्वात नसल्याने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेऊन तीन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांसह महापालिकेतील सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतली. यामध्ये मोहोळ यांनी पावसाळापूर्व केल्या जाणाऱ्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्या. ज्या भागात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पावसाचे पाणी साचते, अशा ठिकाणांची यादी महापालिकेने तयार केली असून, तेथे पाणी साचून राहू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
पाणी साचून राहणाऱ्या नवीन जागांची माहितीही उपलब्ध झाली असून, त्यावरदेखील उपाययोजना सुरू असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी घेतलेल्या बैठकीत सांगण्यात आले. पावसाळापूर्व कामे करताना या कामांची जबाबदारी संबधित अधिकाऱ्यांवर निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यांची खोदाई पूर्ण करून खोदलेले रस्ते ३१ मेपूर्वी पूर्ववत केले जातील, असे महापालिका प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे प्रशासनाचे नियोजन कोलमडून पडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पाऊस पडत असल्याने महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या कामात अडथळा निर्माण होत आहे. खोदलेली माती पावसामुळे रस्त्यावर पसरत असून, त्यावरून गेल्यानंतर वाहन घसरत असल्याचेही प्रकार घडत आहे. पुढील दहा दिवसांत राहिलेली प्रलंबित कामे पूर्ण करून ३१ मेपर्यंत रस्ते पूर्ववत करण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर असणार आहे. महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने न पाहिल्यास गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये जी स्थिती शहरातील विविध भागांत निर्माण झाली, त्यापेक्षा गंभीर स्थिती यंदा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. त्याचा आढावा दररोज घेतला जात आहे. हवामान विभागाने यंदा पाऊस अधिक पडेल, असा अंदाज व्यक्त केल्याने त्यानुसार नियोजन सुरू आहे.- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका