पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परीक्षा आणि मूल्यमापनविषयक सर्व सेवा आता कागदविरहित केल्या गेल्या आहेत. कागदविरहित सेवेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, परिसंस्थांसाठी संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.

परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी ही माहिती दिली. विद्यापीठातील विभाग आणि संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ट्रान्सस्क्रिप्ट, पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रक अशी कागदपत्रे महत्त्वाची असतात. आतापर्यंत विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करून त्या अर्जाची प्रत विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्रात जमा करावी लागते. त्यात विद्यार्थ्यांचा वेळ जातो. त्यामुळे ही प्रक्रिया कागदविरहित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता परीक्षा विभागाच्या छाननी आणि सारणी कक्षाचे कामकाज कागदविरहित करण्यात आले आहे. त्यासाठी grievance.unipune.ac.in हे स्वतंत्र संकेतस्थळ आणि कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

डॉ. देसाई यांच्या परिपत्रकानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाने परीक्षा व मूल्यमापनविषयक विद्यार्थिकेंद्रित सर्व सेवा कागदविरहित करण्याच्या प्रक्रियेतील पुढचा टप्पा सुरू केला आहे. परीक्षा, मूल्यमापन, निकाल, तसेच निकालोत्तर अनेक त्रुटी या सुविधेमुळे अद्ययावत दुरूस्त होऊन पर्यायाने विद्यार्थी, महाविद्यालये आणि परिसंस्थांना परीक्षा व मूल्यमापन संदर्भातील सर्व दुरुस्त्या, निर्णय किंवा इतर गोष्टीही कागदविरहित उपलब्ध होत आहेत.

परीक्षा व मूल्यमापन सेवा याच संकेतस्थळाद्वारे आपण परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडे प्रस्ताव, अर्ज, विनंती सादर कराव्यात. या संकेतस्थळाद्वारे काही समस्या, त्रुटी या छाननी आणि तालिनीकरण कक्षाच्या स्तरावरच निरसित होतील. प्रमाद समितीपुढे किंवा इतर अधिकार मंडळांकडून सोडवल्या जाणे अपेक्षित असलेले विषय तिकडे वर्ग होतील. आता याच संकेतस्थळाद्वारे प्रमादविषयक तक्रारी आणि त्या अंतर्गत सभा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांचा वेळ आणि प्रशासकीय कामकाजापोटी महाविद्यालयांना सोसावा लागणारा खर्चही संपुष्टात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत विद्यार्थी, शिक्षकांना प्रत्यक्ष विद्यापीठात येऊन कागदपत्रे सादर करावी लागत होती. यापू्र्वी परीक्षा विभागातील बरेचसे काम कागदविरहित झाले आहे. आता छाननी कक्षही कागदविरहित झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांची कामे ऑनलाइन पद्धतीने मार्गी लागतील. हे विद्यापीठाने टाकलेले पाऊल महत्त्वाचे आहे, असे अधिसभा सदस्य राहुल पाखरे यांनी सांगितले.