पुणे : ‘लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या सरकारची शिक्षण क्षेत्रातील हुकूमशाही वाढत आहे. त्या वेळच्या शिक्षणमंत्र्यांच्या हट्टामुळे १९९६ मध्ये पहिलीपासून इंग्रजी आली. पहिली भाषा पक्की झाल्याशिवाय दुसरी भाषा कशी येणार? या निर्णयाने पहिलीच्या मुलांना इंग्रजी तर येत नाही, पण त्यांचे मराठी कच्चे झाले. आता तीन भाषा सुरू ठेवल्या, तर मराठीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल,’ याकडे लक्ष वेधून, ‘कुठे नेऊन ठेवले आपण शिक्षण,’ असा सवाल ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डाॅ. रमेश पानसे यांनी शनिवारी उपस्थित केला.
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते डाॅ. रमेश पानसे यांना पु. ग. वैद्य कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी पानसे बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, पु. ग. वैद्य यांच्या पत्नी वसुंधरा वैद्य, संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू आणि कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
‘शिक्षणाची नीतिमत्ता खालावली आहे. निकाल चांगला लावण्यासाठी वार्षिक परीक्षेत कमी गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतर्गत परीक्षेत भरघोस गुण देऊन शासकीय शाळा अनैतिक होत आहेत. शिक्षण क्षेत्र बिघडण्याला सरकार जबाबदार आहे,’ असे पानसे म्हणाले.
‘बालसाहित्य दुर्लक्षित आहे आणि शिक्षण क्षेत्रातील बालसाहित्य तर त्याहून अधिक दुर्लक्षित आहे. आदिवासी मुलांपर्यंत बालसाहित्य पोहोचवावे. त्यांच्या रूपाने मराठीला शक्ती देण्यासाठी एक नवा गट सज्ज होत आहे. त्यांच्यासाठी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेची शाखा पालघरमघ्ये सुरू करण्यासाठी ग्राममंगल संस्थेच्या माध्यमातून पुढाकार घेऊ,’ असे त्यांनी नमूद केले. सासणे, प्रभुणे, राजगुरू, कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. स्वाती महाळंक यांनी सूत्रसंचालन केले. संजय ऐलवाड यांनी आभार मानले.