पुणे : सन १९८० मध्ये दर्जेदार गूळ कोल्हापूरच्या पेठेत ४० रुपये किलो दराने विकला जात होता आणि आता ४३ वर्षांनंतरही त्याच दराने गूळ विकत आहोत. उत्पादन खर्चही निघेना, त्यामुळे गुळात भेसळ वाढली आहे. गुऱ्हाळघरांना टाळे लागत असताना गुऱ्हाळ घरांवर नियंत्रणे कसली लादता, असा जाब कराड, शिराळा आणि कोल्हापुरातील गुऱ्हाळघरचालकांकडून विचारला जात आहे.राज्य सरकार शेतकरी हिताचे कारण देत गुऱ्हाळघरांवर नियंत्रणे लादण्याच्या विचारात आहे. त्या विरोधात पश्चिम महाराष्ट्रातील गूळ उत्पादकांकडून आवाज उठवला जात आहे.

कोल्हापुरातील गूळउत्पादक आणि शेतकरी संघटनेचे नेते आदम मुजावर म्हणाले, मी १९८० मध्ये माझ्या गुऱ्हाळघरात तयार केलेला दर्जेदार गूळ ४० रुपये किलो दराने कोल्हापूरच्या बाजारपेठेत विकला आहे. आज ४३ वर्षांनंतरही माझ्या गुळाला ४०-४५ रुपयांच्या वर दर मिळत नाही. उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे गुळात साखरेची भेसळ वाढली आहे. एक किलो गुळात ७० टक्के साखर आणि ३० टक्के उसाचा रस असतो. कर्नाटकातून येणारा भेसळयुक्त गूळ आमच्या सरकारी यंत्रणेने रोखला नाही. त्यामुळे दर्जा नसलेला कर्नाटकी गूळ कोल्हापूरचा गूळ म्हणून विकला गेला. व्यापाऱ्यांना पैसे मिळाले, बाजार समितीला सेस मिळाला, पण कोल्हापूरचा गूळ बदनाम झाला. कोल्हापूरच्या गुळाच्या दर्जावर लोकांचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे आता गुळाला मागणी राहिली नाही. दर्जेदार, सेंद्रीय किंवा कमी रसायनांचा वापर करून गूळ निर्मितीचा प्रतिकिलो उत्पादनखर्च ७० रुपयांच्या घरात आहे. तितका दर मिळत नाही. त्यामुळे भेसळ करून गूळ उत्पादन होते. वाढलेली मजुरी, कामगारांकडून होणारी फसवणूक, वीज, इंधन आणि वाहतुकीच्या वाढलेल्या दरामुळे गुऱ्हाळघरांना टाळे लागत आहे. अशा स्थितीत सरकारी मदतीची गरज असताना, राज्य सरकार गुऱ्हाळघरांवर नियंत्रणे, निर्बंध लादण्याचा विचार करत असेल, तर आम्ही त्याला कोल्हापुरी पद्धतीने विरोध करू.

हेही वाचा >>>पिंपरी: छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी घेणारा व्यायामशाळा प्रशिक्षक अटकेत

गूळ उद्योग नामशेष होण्याच्या मार्गावर

आदम मुजावर म्हणाले, की कोल्हापुरात मागील वर्षी शंभर गुऱ्हाळे सुरू होती. यंदा जेमतेम ४० सुरू होतील. शिराळा येथील सुभाष नामदेव पाटील म्हणाले, की पाच वर्षांपूर्वी शिराळ्यात ४० गुऱ्हाळे होती, आता फक्त एकच राहिले आहे. कराडमधील सुभाष भोसले म्हणाले, कराड परिसरात पाच वर्षांपूर्वी २४० गुऱ्हाळे होती, यंदा फक्त ३५ ते ४० सुरू होतील. गूळ निर्मिती व्यवसाय तोट्यात आल्यामुळे गुऱ्हाळघरे वेगाने बंद होत आहेत.

पुन्हा वर्षा बंगल्यात घुसू

शरद पवार मुख्यमंत्री असताना गुऱ्हाळघरांवर नियंत्रण आणण्याचा विचार सुरू होता. त्यामुळे कोल्हापूरचे नेते श्रीपतराव बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वर्षा बंगल्यात घुसलो होतो. आताही तसेच आंदोलन करावे लागणार आहे. गूळ उद्योग अडचणीत असताना मदत करण्याऐवजी उद्योगासमोर अडचणी आणण्याचा सरकारचा डाव आहे, असा इशारा कराड तालुका गूळ उत्पादक संघाचे उपाध्यक्ष सुभाष भोसले यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुण्यातील रस्त्यांवर इस्रायलच्या राष्ट्रध्वजाचे स्टिकर्स चिटकावले, विविध तीन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

गुळाला चांगला दर मिळत नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सन १९८० मध्ये दर्जेदार गुळाला शेतकऱ्यांना ४० रुपये किलो दर मिळत होता, हे खरे आहे. सध्या शेतकऱ्यांना सरासरी ४० ते ४५ रुपये किलो दर मिळतो आहे. भेसळ मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे गुळाचे उत्पादन वाढले आहे, परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या गुळाला चांगला दर मिळत नाही, असे मत पुणे मार्केट यार्डातील गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी व्यक्त केले.