पुणे: यंदा दहावीच्या निकालात पुणे विभागातील १३ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक सात विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले असून, शहरातील मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील रावी नामजोशी या विद्यार्थिनीने शिकवणी न लावताही शंभर टक्के गुण मिळवण्याची कामगिरी केली आहे.
गेल्या काही वर्षांत दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांच्या गुणांचा टक्का उंचावत असल्याचे दिसून येत आहे. त्यातही ९०-९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय ठरत आहे. यंदाच्या निकालातही त्याचे प्रतिबिंब दिसत आहे.
पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यातील सात, पुणे जिल्ह्यातील सहा अशा एकूण १३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.शंभर टक्के गुण मिळाल्याचा आनंद व्यक्त करून रावी म्हणाली, ‘परीक्षा सोपी होती. मात्र, शंभर टक्के गुण मिळण्याची अपेक्षा केली नव्हती. कोणत्याही विषयासाठी शिकवणी लावली नव्हती.
अभ्यासासाठी आई-वडील, शिक्षकांनी मार्गदर्शन केले. परीक्षेची तयारी करण्यासाठी खूप सराव केला होता. रोज ठरावीक तास अशा पद्धतीने अभ्यास केला नाही. मात्र, अभ्यासात सातत्य ठेवले होते. मूलभूत विज्ञानामध्ये संशोधन करण्याची इच्छा आहे. त्यामुळे आता अकरावीला विज्ञान शाखेला प्रवेश घेणार आहे.’