पुणे : पावसाळ्याच्या काळातील समस्यांचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालय स्तरावरची यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, अभियंत्यांवरील जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये आणि पूर परिस्थिती उद्धभवू नये, यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी अभियंत्यांवरील जबाबदारी निश्चित केली. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी, ओमप्रकाश दिवटे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. त्याची माहिती पृथ्वीराज यांनी पत्रकारांना दिली.

प्रत्येक प्रभाग कार्यालयाला पाणी उपसण्यासाठी पंपिंग यंत्रणा, जलद प्रतिसाद पथके आणि इतर आवश्यक वाहने मनपाच्या वाहन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर सिंचन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षातही महापालिकेचा अभियंता उपस्थित राहणार आहे.

शहरात पाणी साठणारी २३० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यापैकी ११७ ठिकाणी उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या असून, ३१ ठिकाणी काम सुरू आहे. उर्वरित ठिकाणांवर लवकरच आवश्यक उपाय करण्यात येणार आहेत. तेथे पंपिंग यंत्रणा आणि इतर यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जाईल, असे पृथ्वीराज यांनी सांगितले.

‘शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांसाठी असणारे ‘लेबर कॅम्प’ योग्य नसल्यास पावसाळ्यात दुर्घटनांचा धोका वाढतो. म्हणून कामगार कार्यालयांमार्फत शहरातील अशा ठिकाणांचे सर्वेक्षण करून धोकादायक लेबर कॅम्प स्थलांतरित केले जातील,’ असेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धोकादायक झाडांकरिता विशेष मोहीम

गेल्या महिन्यात झाडे कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वन विभागाच्या सहकार्याने धोकादायक झाडांचे निरीक्षण करून ती काढण्याबरोबरच झाडांच्या फांद्या कापण्याची विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.