पुणे : करोना संकटाच्या कालखंडात अवघ्या पाच जणांच्या उपस्थितीमध्ये साहित्य संमेलनाध्यक्ष डाॅ. जयंत नारळीकर यांचा सत्कार करण्यात आला होता. नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली.

प्रथेनुसार नूतन संमेलनाध्यक्षांचा सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून आणि तोही परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये केला जातो. पण, करोनाचे संकट असल्याने सत्काराचा जाहीर कार्यक्रम घेण्यावर बंधने होती. त्यामुळे ‘आयुका’मध्ये मोजक्या पाच जणांच्या उपस्थितीमध्ये परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते डाॅ. नारळीकर यांचा सत्कार करण्यात आला. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, तत्कालीन प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि माजी कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होत्या. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मुखपट्टी परिधान केली होती.