संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडलं. या अधिवेशनात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबद्दल संभाजीराजे छत्रपती यांनी मोठी घोषणा केली आहे. २०२४ साली होणाऱ्या निवडणुका लढणारच, असा निर्धार संभाजीराजेंनी व्यक्त केला आहे.

“स्वराज्य यापुढे सक्षम पर्याय म्हणून येणार आहे. त्यामुळे २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागा. घाबरण्याची गरज नाही. माझा विश्वास आहे, सुसंस्कृत नेता स्वराज्यात येणारचं. आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुण घ्यायचे आहेत,” असेही संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

हेही वाचा : “फुटलेल्या शिंदे गटातही दोन गट…”, संजय राऊतांचा मोठा दावा; कीर्तीकरांच्या ‘त्या’ विधानावर म्हणाले, “भाजपा अजगर…!”

“अगोदरच का निवडून देता?”

“आजचे काही प्रस्थापित लोक माजलेले आहेत. या प्रस्थापितांना माझा विरोध आहे. पण, चूक त्यांची नसून आपली आहे. कारण, आपण त्यांना निवडून देतो. नंतर माजल्यानंतर म्हणतो बघून घेऊ. मात्र, अगोदरच का निवडून देता?,” असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे.

“स्वराज्यच्या माध्यमातून जनजागृती करत सामान्य शेतकऱ्यांना…”

“शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि महासंताचं नाव घेत येड्यात काढलं जातं. त्यामुळे आजही वेळ गेलेली नाही. स्वराज्यच्या माध्यमातून जनजागृती करत सामान्य शेतकऱ्यांना ताकद करण्याचं काम करायचं,” असं संभाजीराजेंनी सांगितलं.

हेही वाचा : “तपास ठरलेला आहे, कितीही केला तरी…”, नरहरी झिरवळांचा राहुल नार्वेकरांना टोला!

“स्वराज्य नावातच एवढी ताकद आहे, की…”

“मला अनेक लोक विचारत होते, स्वराज्यचं ब्रीदवाक्य आणि बोधचिन्ह काय आहे? पण, आम्हाला सर्वांना वाटलं, स्वराज्य नावातच एवढी ताकद आहे, की त्याला ब्रीदवाक्य आणि बोधचिन्ह ठेवण्याची गरज नाही,” असेही संभाजीराजेंनी म्हटलं.