पुणे : ‘कला, संस्कृती यांचा विकास करायचा असेल, तर राष्ट्र सुरक्षित रहायला हवे. त्यामुळे सावरकरांनी नेहमीच राष्ट्रीय सुरक्षेचा विचार पेरला. लष्कराचे सामर्थ्य आणि मुत्सद्देगिरी त्यांच्या विचारांत, रोमारोमांत दिसते. सावरकरांना ‘फादर ऑफ इंडियन नॅशनल सिक्युरिटी’ म्हणून संबोधले, तरी वावगे ठरणार नाही. ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सुरक्षेचे पुरस्कर्ते होते,’ असे मत मेजर मोहिनी गर्गे यांनी बुधवारी व्यक्त केले.
पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे मेजर मोहिनी गर्गे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. याच कार्यक्रमात लेखक सुकल्प कारंजेकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कारा’ने गौरविण्यात आले, तर मेघश्री दळवी यांना ‘चेतना पुरस्कार’, डॉ. मनीषा सोनवणे यांना ‘मातृस्मृती पुरस्कार’ आणि मनीषा बाठे यांना ‘मुक्ता-जना-वेणा-बहिणा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्रकृतीच्या कारणास्तव दळवी यांना उपस्थित राहता आले नाही. ग्रंथालयाचे उपकार्याध्यक्ष शशिकांत आमडेकर, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र चिपळूणकर, कार्यवाह सुधीर इनामदार या वेळी उपस्थित होते.
गर्गे म्हणाल्या,‘शस्त्रे, लष्करी सामर्थ्य यांचे महत्त्व सावरकरांच्या कार्यातून अधोरेखित होते. सशस्त्र क्रांती हीच त्यांच्या कामाची सुरुवात होती. स्वातंत्र्यासाठी शस्त्र धारण करायला त्यांनी प्रेरणा दिली. पाकिस्तानला जे उत्तर आज भारताने दिले आहे, तोच सावरकरांचा दृष्टिकोन होता. नेत्यांनी व्यवहारिकपणे निर्णय घ्यायला हवेत. सैन्यात अद्ययावत तंत्रज्ञान, शस्त्रे हवीत आणि त्याहीपेक्षा जयुष्णू वृत्ती सैन्यात जोपासणे गरजेचे आहे.’
‘परराष्ट्र धोरण आणि युद्ध वेगवेगळे नाहीत. युद्ध केवळ रणांगणावर लढले जात नाही. अर्थकारणाच्या माध्यमातून ते लढले जाते. सावरकरांची अनेक तत्त्वे आजही परिणामकारक ठरत आहेत. दुसऱ्यांसाठी आपण सर्वजण एक आहोत. सावरकरांनी देशाला हा विचार दिला. त्यामुळेच आज वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे, विविध धर्मांचे, भाषांचे प्रतिनिधी जागतिक मंचावर भारताची भूमिका मांडत आहेत. दहशतवादाविरुद्ध आम्ही सगळे एक आहोत, हा संदेश देत आहेत,’ असे गर्गे म्हणाल्या.
सावरकर, टिळकांनी स्वदेशीचा आग्रह केला. आता आत्मनिर्भरतेला पर्याय नाही. सध्याच्या काळात युद्ध जिंकायचे असेल, तर स्वदेशीचा स्वीकार करायलाच हवा. सामान्य नागरिकांनी देशात बनलेल्या वस्तू आणि सेवा स्वीकारायला हव्यात. तीच देशासाठी केलेली मोठी मदत आहे. – मेजर मोहिनी गर्गे