पुणे : पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्याचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना दौंड तालुक्यातील पारगाव परिसरात घडली. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मारुती बाजीराव दिवेकर (वय ७५, रा. पारगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत दिवेकर यांचे नातेवाईक रामकृष्ण ताकवणे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिवेकर यांचे रेणुका मंदिर परिसरात शेत आहे. ते पिकाला पाणी देत होते. त्या वेळी विद्युत खांबाला त्यांचा हात लागला. खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे दिवेकर यांना धक्का बसला आणि ते जागीच कोसळले. बेशुद्धावस्थेतील दिवेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू, अशी नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा – कसब्यात ८० वर्षांपुढील १९ हजार मतदार, ४९ जणांची टपाली मतदानासाठी नोंदणी

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी निवडणूक आयोग निर्णय देऊ शकतो? कायदेतज्ज्ञ म्हणाले, “एखादा…”

दिवेकर इलेक्ट्रिक इंजिनिअर होते. पारगावातील पहिले अभियंता असलेल्या दिवेकर यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पंचक्रोशीत शोककळा पसरली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, सूना, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप दिवेकर कुटुंबीयांनी केला आहे.