पुणे : यंदाची लोकसभा निवडणूक वेगळी आहे. हा देश कोणत्या पद्धतीने चालवायचा हा प्रश्न आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात, ते पाहता चिंता वाटू लागली आहे. लोकशाहीच्या मार्गाने म्हणजेच लोकांच्या सहमतीने देश चालवणे, ही लोकशाहीची गरज आहे. स्थानिक पातळीवर लोकशाही दिसत नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद यांच्या निवडणुका दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. आणखी काही दिवसांनी कदाचित लोकसभा, विधानसभा न घेण्याची दुर्बुद्धी सत्ताधाऱ्यांना होईल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केली. 

  पुरंदर येथील सासवड येथे महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत झाली. पवार म्हणाले, ‘मोदी ठिकठिकाणी सांगतात अबकी बार ४०० पार. याचा अर्थ त्यांना हव्या त्या पद्धतीने कायदे करायचे आहेत. त्यासाठी खासदारांची संख्या वाढवायची आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली घटना बदलायची आहे. कर्नाटक, राजस्थान, उत्तरप्रदेश येथील भाजपच्या खासदारांनी हेच सांगितले. एकाच पक्षाचे खासदार विविध ठिकाणी जाहीरपणे घटना बदलण्यासाठी ४०० पार सांगतात. याची नोंद आपल्याला घ्यावी लागेल.’  सुळे म्हणाल्या, ‘काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत असणाऱ्या पक्षाला माझ्या विरोधात एक उमेदवार देता आला नाही. माझ्याच घरातील महिलेला माझ्याविरोधात उभे केले. दिल्लीतून विलंब झाल्याने पुरंदरमध्ये अद्याप विमानतळ झालेला नाही. खेड तालुक्यात होत नसल्याने मी पुरंदर येथे विमानतळ आणला. मी आणि संजय जगताप यांनी ५० पेक्षा जास्त बैठका घेतल्या. विमानतळ पुरंदरमध्येच होईल, बाकी कुठेही होऊ देणार नाही.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदींना महाराष्ट्राची चिंता

काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांनी काँग्रेसयुक्त भाजप केले. अजित पवार जाहीरपणे लहान व्यापारी, उद्योजकांना धमक्या देतात. माझे काम कर, नाहीतर बघून घेईन. ४ जूननंतर जनताच तुम्हाला बघून घेईल. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात गेल्या महिन्यापासून २७ वेळा आले. मुंबईत आठ सभा घेणार आहेत. सारा देश सोडून महाराष्ट्रात येतात, कारण या महाराष्ट्राची त्यांना भीती वाटते, अशी टीका खासदार राऊत यांनी केली.