पुणे : शारदीय नवरात्रोत्सवास सोमवारी (२२ सप्टेंबर) घटस्थापनेने सुरुवात होत असून, तिथीच्या वृद्धीने यंदा नवरात्र दहा दिवसांचे आहे. या वर्षी नवरात्र २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर असे दहा दिवसांचे असून प्रत्येकाने कुलाचारानुसार घटस्थापना करून पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरे करावे.‘आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्राचा आरंभ होतो. या वर्षी २२ सप्टेंबर रोजी नवरात्रारंभ होणार असून, याच दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाईल. साधारणपणे नवरात्र नऊ दिवसांचे असते. परंतु, तिथीच्या क्षय-वृद्धीमुळे कधी ते आठ, तर कधी दहा दिवसांचे होऊ शकते. या वर्षी तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांचे असणार आहे. गेल्या वर्षीही तृतीया वृद्धीतिथी असल्याने नवरात्र दहा दिवसांचे होते,’ अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
‘नवरात्रापूर्वी अशौच आल्याने प्रतिपदेस नवरात्र बसविता येणार नसेल, तर अशौच संपल्यावर सप्तरात्रोत्सवारंभ (२४ सप्टेंबर), पंचरात्रोत्सवारंभ (२७ सप्टेंबर), त्रिरात्रोत्सवारंभ (२९ सप्टेंबर) किंवा एकरात्रोत्सवारंभ (३० सप्टेंबर) असे पंचांगात दिलेल्या दिवशी कमी दिवसाचे नवरात्र करावे. नवरात्रामध्ये देवीचा टाक किंवा मूर्ती याची वेगळी स्थापना करून पूजा केली जाते. काही जणामंध्ये नऊ दिवस इतर देवांची पूजा केली जात नाही, त्याऐवजी पूजेतील इतर देवांची अभिषेक करून नेहमीप्रमाणे रोज पूजा करावी आणि घटावर किंवा टाकावर फुलाने पाणी शिंपडून पूजा करावी,’ असे दाते यांनी सांगितले.
यंदाच्या नवरात्रातील प्रमुख दिवस
ललिता पंचमी : शुक्रवार, २६ सप्टेंबर
महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) : सोमवार २९ सप्टेंबर
दुर्गाष्टमी, श्रीसरस्वती पूजन, महाष्टमी उपवास : मंगळवार ३० सप्टेंबर
महानवमी, नवरात्रोत्थापन : बुधवार १ ऑक्टोबर
विजयादशमी (दसरा) : गुरुवार २ ऑक्टोबर (विजय मुहूर्त : दुपारी २.२७ ते ३.१५)
उपवास कधी करावा?
‘नवरात्रामध्ये देवीस दररोज एक माळ अर्पण करताना जितक्या दिवसांचे नवरात्र असेल, तेवढ्या माळा अर्पण कराव्यात. तिथी वृद्धी असल्याने दोन दिवसांच्या दोन स्वतंत्र माळा अर्पण कराव्यात. अनेकजण नवरात्रीचे सर्व दिवस उपवास करतात. मात्र, काही कारणाने ते शक्य नसल्यास पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा. तसे करणेही शक्य नसल्यास किमान अष्टमीचे दिवशी तरी करावा,’ असे मोहन दाते यांनी सांगितले.
नवरात्रामध्ये अखंड नंदादीप लावला जातो. काही वेळेस वाऱ्याने किंवा काजळी काढताना तो विझतो. अशा वेळेस काही अशुभ नसते, तो नंदादीप पुन्हा लावता येतो.मोहन दाते, दाते पंचांगकर्ते
