जहाल विचारांच्या शिवसेनेची १९६६ मध्ये स्थापना झाल्यावर मुंबईनंतर पुण्यात अल्पावधीतच ती फोफावली आणि दुफळी झाल्यावर रोडावलीही. ती एवढी, की गुरुवारी (१९ जून) पक्षाचा वर्धापनदिन पुण्यात जाणवलाच नाही. दोन्ही गटांकडून सभागृहांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून सोपस्कार पार पडण्यात आले. मात्र, शहरात पक्षाच्या अस्तित्वाची जाणीव होणार नाही, एवढा शुकशुकाट होता. आगामी महापालिका निवडणूक जवळ आली असतानाही आजवर गरजणारा ‘आव्वाज’ घुमलाच नाही.
शिवसेनेच्या स्थापनेनंतर पुण्यात १९७२ मधील विधानसभेच्या निवडणुकीपासून सुरू झालेला झंझावात १९९५ मध्ये तीन आमदारांपर्यंत येऊन पोहोचला. आता ही संख्या शून्यावर आली. पुणे महापालिकेतही तीच गत. २००७ मध्ये सर्वाधिक २० नगरसेवक. त्यानंतर लागलेली उतरती कळा थांबलीच नाही.
आता दुभंगलेल्या शिवसेनेपैकी शिवसेना (ठाकरे) गटाकडे तीन आणि शिवसेना (शिंदे) गटाकडे अवघा एक नगरसेवक उरला आहे. शिंदे गटाकडे अन्य पक्षांतील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा ओघ सुरू झाला असला, तरी ते मूळचे शिवसैनिक नाहीत. अपवाद काँग्रेसमधून आलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा. त्यामुळे अन्य पक्षांतून येऊन धनुष्यबाण हाती घेतलेल्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची पक्षाच्या वर्धापनदिनापेक्षाही आगामी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यासाठी एक व्यासपीठ हवे होते, ते मिळाले एवढीच भावना असावी. वर्धापनदिनी शहरातील शुकशुकाटाने ही बाब अधोरेखित झाली.
पक्षाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने दोन्ही गटांकडून सभागृहांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि सत्कार करून सोपस्कार पार पाडण्यात आला. या कार्यक्रमांचा फारसा गाजावाजाही झाला नाही. महापालिका निवडणूक जवळ आलेली असताना गरजणारा आवाज दबलेल्या स्थितीत असल्याचे चित्र शहरात निर्माण झाले. दोन्ही गटांचा मेळावा मुंबईत होता. बहुतांश पदाधिकारी मुंबईला गेले असल्यामुळे पुण्याच्या कार्यक्रमांकडे थोडे दुर्लक्ष झाल्याचा दावा करण्यास दोन्ही गटांना वाव आहे.
मात्र, गेल्या ५९ वर्षांचा या पक्षाचा संघर्षाचा, उत्कर्षाचा आणि ऱ्हासाचा कालखंड पाहिल्यास हा पक्ष कधी काळी सत्तेतील वाटेकरी आणि लढवय्या बाण्याचा असल्याचा विसर कार्यकर्त्यांनाच पडला असावा, अशी स्थिती वर्धापनदिनी शहरात दिसली. पुण्यात एके काळी डरकाळी फोडणाऱ्या या पक्षाचा ‘आव्वाज’ आता दबल्याचे दिसून आले.
पुण्यात राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिकूल वातावरणात शिवसेनेची पाळेमुळे रुजण्यास सुुरुवात झाली. १९६६ मध्ये पक्षाची स्थापना आणि त्यानंतर १९७२ मध्ये कसबा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढविण्यात आली. काका वडके हे उमेदवार होते. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या माजी आमदार लीला मर्चंट उभ्या होत्या. वडके दुसऱ्या स्थानावर राहिले.
कसब्यातून सुरू झालेला हा झंझावात प्रारंभीच्या काळात कोथरूड परिसरात होता. राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री शशिकांत सुतार १९७८ मध्ये पुणे महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९० मध्ये तत्कालीन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. ते पुण्यातीलच नाही, तर पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे पहिले आमदार. नंतरच्या १९९५ च्या निवडणुकीतही ते विजयी झाले. सुतार यांच्यानंतर शिवाजीनगर मतदारसंघातून विनायक निम्हण हे १९९९ आणि २००४ मध्ये असे दोन वेळा शिवसेनेकडून आमदार झाले.
१९९५ च्या निवडणुकीत सुतार यांच्यासह तत्कालीन भवानी पेठ मतदारसंघातून दीपक पायगुडे आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सूर्यकांत लोणकर असे तीन आमदार होते. एकाच वेळी पुण्यात शिवसेनेचे तीन आमदार निवडून आल्याची ती पहिलीच वेळ. २००९ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यावर कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत मोकाटे, तर हडपसरमधून महादेव बाबर निवडून आले. २०१४ नंतर मात्र एकही आमदार निवडून आला नाही.
महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद १९९७ पासून वाढली. २००७ मध्ये २० नगरसेवक होते. त्या वेळी काँग्रेस आणि भाजपच्या साथीने ‘पुणे पॅटर्न’ करून महापालिकेत सत्ताही मिळाली. पण, त्यानंतर लागलेली उतरती कळा थांबलेली नाही. २०१२ च्या निवडणुकीत १५ आणि २०१७ च्या निवडणुकीत अवघे १० नगरसेवक निवडून आले. त्यांपैकी पाच नगरसेवक भाजपकडे गेले. पक्ष फुटल्यावर ठाकरे गटाकडे तीन आणि शिंदे गटाकडे अवघा एक नगरसेवक राहिला. अशा परिस्थितीत दुभंगलेल्या दोन्ही गटांनी वर्धापनदिनाचा कार्यक्रम आयोजिला; पण मूळ शिवसेनेचा ‘आव्वाज’ जाणवलाच नाही. आगामी निवडणुकीत तो दिसला, तरी शिवसैनिकांना हुरूप येईल.