पुणे : ‘शेतकऱ्यांना कीड आणि रोगमुक्त रोपे पुरविण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, देशभरात नऊ ठिकाणी स्वच्छ रोपनिर्मिती केंद्रांची (क्लीन प्लान्ट सेंटर) उभारणी करण्यात येणार आहे. त्यातील तीन केंद्रे महाराष्ट्रात असतील. त्यामध्ये पुण्यातील केंद्र द्राक्षांसाठी, नागपुरातील संत्र्यांसाठी, तर सोलापूरमधील डाळिंबासाठीचे असेल.’ अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकारातून कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथाॅन’चा समारोप आणि पारितोषिक वितरण मंगळवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा कृषी अधिकारी संजय कोचळे यावेळी उपस्थित होते.
शिवराजसिंह चौहान म्हणाले, ‘महाराष्ट्र फलोत्पादनाचे आगार असले तरी, फलोत्पादनात अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांना रोग आणि कीडमुक्त रोपे मिळाली तर, फलोत्पादनातील ही समस्या सुटणार आहे. त्यामुळे स्वच्छ आणि रोगमुक्त रोपांसाठी केंद्रांची उभारणी करण्याचे नियोजित आहे. या केंद्रांतून दरवर्षी आठ कोटी रोगमुक्त रोपे शेतकऱ्यांना दिली जातील. इस्त्राइल आणि नेदरलँड या देशांचेही त्यासाठी योगदान घेतले जाईल. पुण्यातील केंद्र द्राक्षांसाठी, नागपुरातील केंद्र संत्र्यासाठी तर सोलापूरमध्ये डाळिंबासाठीचे केंद्र असेल. या तीन केंद्रांसाठी ३०० कोटींचा खर्च अपेक्षित असून, मोठ्या आणि मध्यम आकाराच्या रोपवाटिकांसाठी अनुक्रमे तीन आणि दीड कोटींचे अनुदान दिले जाईल.’
‘क्राॅप कव्हर’साठी प्रयत्नशील : देवेंद्र फडणवीस
‘वातावरण बदलामुळे कृषी क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे भाज्या आणि फळांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘क्राॅप कव्हर’ असणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य शासन मिळून ‘क्राॅप कव्हर’च्या क्षेत्रात काही योजना आणता आली तर, त्यासाठी राज्य शासन सकारात्मक असेल,’ असे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सांगितले.
जलसिंचन, पीक काढणी, पिकांवरील फवारणी तंत्रज्ञान, एआय कंट्रोल रोव्हर्स, कीड व्यवस्थापनात मशीनचा वापर आदी तंत्रज्ञान हॅकेथाॅनमध्ये आहे. हे उपाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचे उत्तम उत्पादनात रूपांतर करून ते बाजारात उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा आणि इन्क्युबेशन केंद्र सुरू करावी आणि तंत्रज्ञानाचे व्यावसायिक उत्पादनाच्या रुपात विकसित करून शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी सूचना फडणवीस यांनी केली.