पुण्यामध्ये शनिवारी रात्री आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेचे पुण्यासह संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. याप्रकरणी अपल्वयीन आरोपीच्या वडिलांनाही अटक करण्यात आलेली आहे. तसेच पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे. दरम्यान आता या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत आतापर्यंत काय-काय कारवाई झाली, तसेच घटनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?

अमितेश कुमार म्हणाले, “ही घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात ३०४ अ गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या घटनेचे गांभीर्य पाहाता त्यानंतर ३०४ हे कलम वाढवण्यात आलं. त्याच दिवशी आम्ही बाल न्याय मंडळाकडे त्या आरोपीला सज्ञान म्हणून ट्रिट करण्यात यावं, अशी मागणी केली होती. मात्र, तेव्हा आमची मागणी मान्य झाली नाही. त्यानंतर पुढच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. तसेच आरोपी मुलाच्या वडीलांवर आणि पब मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आरोपी मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यासाठी आम्ही बाल न्याय मंडळाकडे मागणी केली होती, त्यानंतर आमची मागणी मान्य झाली आणि आरोपीची १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली”, असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.

हेही वाचा : “बिल्डर कुटुंबाने पैशांच्या जोरावर गुन्हा पचवला होता, पण…”, आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप

पुणे पोलीस आयुक्त पुढे म्हणाले, “आरोपीला सज्ञान म्हणून ग्राह्य धरण्यासाठी बाल न्याय मंडळाकडे प्रोसेजर सुरू आहे. आरोपीच्या वडीलांची पोलीस कोठडी आज संपत असल्यामुळे आम्ही त्यांना पुन्हा न्यायालयात दाखल करणार आहोत. या सर्व प्रकरणाचा तपास संवेदनशीलपणे सुरु आहे. या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का? याचा तपास सुरु आहे. अशा प्रकारे तापस करून आम्ही लवकरात लवकर न्याय देण्याचा आणि आरोपींना शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न करत आहोत. या प्रकरणात न्यायालयात योग्य ती बाजू मांडण्यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत”, असंही पोलीस आयुक्त म्हणाले.

“आरोपीच्या पालकाने अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यास दिली, याचाही तपास सुरू असून या प्रकरणात कारवाई करण्यास दिरंगाई झाली किंवा कोणी मॅनेज झाले असा काही आरोप होत आहे. मात्र, आम्ही यावर सांगतो की, अशा प्रकारच्या घटनांमध्ये कायद्याच्या मार्गावर पोलीस चालत आहेत. यामध्ये दिरंगाई झाली किंवा कोणी मॅनेज झालं असं म्हणणं योग्य नाही. आता सुरुवातीला ३०४ कलम का लावण्यात आलं नाही, तसेच आरोपीला पिझ्झा खाण्यासाठी दिला का? याबाबत चौकशी सुरू आहे”, असंही पोलीस आयुक्तांनी सांगितलं.

हेही वाचा : Pune Porsche Accident: “अल्पवयीन मुलाचा रक्तचाचणी अहवाल महत्त्वाचा नाही, त्याने..”; काय म्हणाले आयुक्त?

या घटनेतील आरोपीचे ब्लड रिपोर्ट आले नाहीत. सुरुवातीला ब्लड सॅपल घेण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदाही ब्लड सॅपल घेण्यात आले होते. त्यामध्ये आमचे फॉरेन्शिक लॅबला आवाहन आहे की, दोन्ही ब्लड सॅपल आरोपीचे आहेत की नाही, याची खात्री करावी. आरोपी मद्य पित असतानाचे सीसीटीव्ही आमच्याकडे आहेत. त्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरु आहेत. येरवडा पोलीस ठाण्यात काय घडलं याचा तपास सुरु आहे. तसेच आपल्या या कृत्यामुळे अपघात होईल, याची जाणीव आरोपीला होती. या प्रकरणाती एका एका घटनेचा बारकाईने तपास पोलीस करत आहेत. या घटनेत गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला ही बाब आमच्या चौकशीत समोर आली आहे”, असंही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.

गाडीत किती लोक होते?

“पोर्श या गाडीतमध्ये अपघात घडला तेव्हा एकूण चार लोक होते. त्यातील एकजण गाडी चालवत होता. अजून दोन मुले होते आणि एक ड्रायव्हर होता. तसेच ज्या पबमध्ये पार्टी झाली, त्यावेळी आणखी सात ते आठ लोक त्या ठिकाणी होते. यातील ड्रायव्हरचं विधान महत्वाचं असून ते ग्राह्य धरण्यात येईल”, असं पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलं.