लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : तलाठी भरती परीक्षेची गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली आणि भरतीचा पुढील टप्पा म्हणून निवड यादी, प्रतीक्षा याद्या २३ जानेवारी रोजी रात्री उशीरा राज्यातील २३ जिल्ह्यांमधील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या याद्या संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समितीने तयार केली आहे. उर्वरित आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे.

वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे पडताळणी, चारित्र्य पडताळणी आदी प्रक्रिया सुरू आहे. कागदपत्रे पडताळणीत उभे आणि समांतर आरक्षण असे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे असतात, ती कागदपत्रे तपासण्यात येत आहेत. परीक्षेला जाताना उमेदवारांनी जो अंगठा यंत्रावर दिला आहे, निवड झालेल्या उमेदवाराचा आणखी एकदा अंगठा घेऊन परीक्षेला बसलेला आणि निवड झालेला उमेदवार तोच आहे किंवा कसे, हे तपासण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली असून १५ फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया जिल्हा निवड तपासणी समितीकडून करण्यात येत आहे. या प्रक्रियेत एखादा निवड झालेला उमेदवार गळाल्यास तातडीने प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला निवड समिती पाचारण करणार आहे.

आणखी वाचा-पोलिसांनी पुण्यातील ‘भाईं’चा नक्षा उतरविला…गज्या मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळसह ३०० गुंडांची पोलीस आयु्क्तालयात चौकशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी या प्रक्रियेचे वेळापत्रक संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यांत १००-१२५ च्या आसपास उमेदवारांची तपासणी प्रक्रिया करायची आहे, त्या ठिकाणी दहा-बारा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. १५०-२०० च्या आसपास उमेदवार असलेल्या जिल्ह्यात थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही प्रक्रिया पूर्ण करून १५ फेब्रुवारीनंतर संबंधितांना नियुक्त्या दिल्या जाणार आहेत, असे प्रभारी अपर जमाबंदी आयुक्त नरके यांनी सांगितले.