पुणे : शहर आणि परिसरातील तापमानात घट झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा सहन करत असलेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. तापमानात झालेली घट आणखी चार ते पाच दिवस कायम राहण्याची, तसेच मेघगर्जनेसह पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा एप्रिलचा महिनाभर तीव्र उष्मा सहन करावा लागला. कमाल आणि किमान तापमानात वाढ होत राहिल्यामुळे उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या. कोरडे हवामान, उत्तरेकडून येणारे उष्ण वारे अशा कारणांमुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. परिणामी, एप्रिलमध्ये १३ ते १४ दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा अधिक नोंदवले गेले. मात्र, ५ मेपासून शहर आणि परिसरात कमाल आणि किमान तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. उष्म्याची तीव्रताही कमी होऊन दिलासा मिळाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, ‘हवेतील आर्द्रता वाढत आहे. त्याशिवाय काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. पुढील चार ते पाच दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच, शहर आणि परिसरात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह पावसाचाही अंदाज आहे.’