इंदापूर : उजनी धरणातील पाण्याचा चलसाठा संंपल्यानंतर आता मृतसाठा हा उणे २२ टक्के झाला असल्याने उजनी धरणाच्या निर्मितीनंतर ४७ वर्षांपूर्वी पाण्यात बुडालेल्या अनेक गावांच्या पाऊलखुणा दिसू लागल्या आहेत. लवकरच प्राचीन पळसनाथाच्या मंदिर परिसरातील पाणीपातळी कमी होऊन हे मंदिर खुले होण्याच्या मार्गावर आहे.
सध्या उजनी धरणातून लातूर, सांगोला ,मंगळवेढा या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रातूनच पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मृतसाठ्यातील पाणीही संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या धरणाच्या जलाशयात प्राचीन पळसनाथाचे मंदिर आहे. त्या मंदिर परिसरातील पाणीपातळी कमी होऊ लागल्याने हे मंदिर पूर्णपणे खुले होण्याच्या मार्गावर आहे.
इंदापूर तालुक्यातील एक हजार वर्षांचा प्राचीन इतिहास असलेले हे मंदिर ४७ वर्षे असंख्य लाटांच्या तडाख्यात आजही उभे आहे. हे मंदिर अवर्षणाच्या काळात उघडे पडल्यानंतर वास्तुशास्त्रज्ञ, अभियंते, इतिहासप्रेमी, पर्यटक आवर्जून भेट देत असतात. पळसदेव या गावाला प्राचीन समृद्ध इतिहास आहे. हे गाव पुरातन काळातले असल्याने अनेक प्राचीन मंदिरे या गावांमध्ये अस्तित्वात होती. १९७५-७६ दरम्यान हे गाव उजनी धरणाच्या पाण्यामध्ये गेले. हे गाव नवीन गावठाणामध्ये पुनर्वसित झाले. मात्र, आजही जुन्या गावातील वैभवशाली परंपरा असलेल्या पाऊलखुणा स्पष्टपणे दिसतात.
हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेले पळसनाथ मंदिराचे शिखर हे प्राचीन इतिहासाची साक्ष देत, आजही उजनी धरणाच्या पाण्यात तग धरून उभे आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये अत्यंत कोरीव काम, सभामंडप असलेले हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिर परिसरातील पाणीपातळी कमी होत असल्याने हे मंदिर लवकरच भाविक आणि पर्यटकांसाठी खुले होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पळसदेव गावाला प्राचीन इतिहास आहे. प्राचीन काळातील अनेक ऐतिहासिक मंदिरे उजनी धरणामध्ये बुडाली. विश्वनाथाच्या मंदिरावर रामायणातील महत्त्वाच्या घटना मूर्ती स्वरूपामध्ये आहेत. त्याची पडझड झाली आहे. या दुर्मिळ हस्तकलेचा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी या मंदिराचे पुनर्वसन व्हावे. नवीन गावात बांधण्यात आलेल्या पळसनाथ मंदिराला पर्यटनाचा ‘क’ दर्जा देण्यात यावा.- शरद पांडुरंग काळे,माजी उपसरपंच, पळसदेव ग्रामपंचायत