पुणे : गणेशोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा उत्सव. या उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निर्माल्याचे संकलन होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी भक्तिभावाने अर्पण केलेली फुले, हार आणि नारळाच्या शेंड्या हे निर्माल्य शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाची पेरणी करत आहे. गणरायाच्या चरणी अर्पण केलेल्या हारांपासून संकलित होत असलेल्या दररोज एक टन निर्माल्यापासून तीनशे किलो खताची निर्मिती केली जात असून हे खत शेतकऱ्यांना मोफत वितरीत करण्यात येते. गेल्या नऊ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ पुणे युवा गणरायाच्या चरणी अर्पण झालेल्या निर्माल्याला नवा अर्थ देत आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने १३३ व्या वर्षीचा गणेशोत्सव थाटात साजरा होत आहे. त्यामध्ये जमा होणारे निर्माल्य डीपी रस्त्यावरील जोशी किचन जवळ उभारलेल्या ‘निर्माल्य श्रेडिंग प्रकल्पा’त नेण्यात येते. तेथे निर्माल्याची पावडर करून त्याचे सेंद्रिय खत तयार केले जाते. अन्नदाता शेतकऱ्याला हे खत विनामूल्य दिले जाते. दररोज एक टन निर्माल्यापासून साधारण तीनशे किलो खताची निर्मिती केली जाते. यंदा या प्रकल्पाचे नववे वर्ष असून प्रकल्पाचे काम क्लबचे अध्यक्ष अविनाश डोईफोडे, सचिव दिनेश अंकम व प्रकल्प संयोजक मनोज धारप यांच्यासह अन्य सभासद करीत आहेत.  

क्लबचे निनाद जोग म्हणाले, ‘गेल्या नऊ वर्षापासून आम्ही हा प्रकल्प राबवीत आहोत. या प्रकल्पांतर्गत गणेशोत्सवात जमा होणारे निर्माल्य घेऊन येतो आणि त्या निर्माल्यापासून खताची निर्मिती करतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे यामध्ये मोठे सहकार्य  मिळते. उत्सवात दररोज सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान टेम्पो त्यांच्याकडे पोहोचतो आणि वीस पोती म्हणजे साधारण एक टन निर्माल्य ते आम्हाला दररोज देतात. यापासून साधारण तीनशे ते चारशे किलो खत तयार होते. गरजू शेतकरी, सोसायट्यांना हे खत विनामूल्य दिले जाते.’