पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग, तसेच वडगाव उड्डाणपूल परिसरात २४ तासांत झालेल्या तीन अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला. भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली, तर दुपारी एकच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. शुक्रवारी सकाळी झालेल्या अन्य एका अपघातातही दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
भरधाव मोटारीचा पहाटे अपघात झाल्यानंतर शनिवारी दुपारी बाह्यवळण मार्गावर भरधाव ट्रकने दोन दुचाकी,रिक्षा,मोटारी अशा चार वाहनांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार राहुल जगन्नाथ खाटपे (वय ३२, रा. सिंहगड महाविद्यालय रस्ता, वडगाव बुद्रुक)यांचा मृत्यू झाला.या अपघातात दुचाकीस्वार दयावर हुसेन सरवर (वय ४५, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द) हे जखमी झाले. याप्रकरणी ट्रकचालक संजय श्रीमंत बिराजदार (वय ३६,रा.सक्करगाव,ता.आळंद,जि. गुलबर्गा, कर्नाटक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाटपे सिंहगड महाविद्यालयात सुरक्षारक्षक होते.बाह्यवळण मार्गाने शनिवारी दुपारी एकच्या सुमारास कात्रजकडून नवले पुलाकडे भरधाव वेगाने ट्रक निघाला होता. भरधाव ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले.सुरुवातीला ट्रकने दुचाकीस्वार सरवर यांना धडक दिली. त्यानंतर ट्रकने मोटार, रिक्षा आणि दुचाकीस्वार खाटपे यांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार खाटपे गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान,वडगाव उड्डाणपुलावर शुक्रवारी (२ मे)सकाळी सातच्या सुमारास ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. किरण पावनोजी गावडे-पाटील (वय ३६,रा. गगनगिरी मंदिराजवळ, हिंगणे, कर्वेनगर)असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार किरण शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उड्डाणपुलावरून निघाले होते.त्या वेळी भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली.अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. किरण खासगी कंपनीत कामाला होते.पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे तपास करत आहेत.
पाच महिन्यांत सहा जणांचा मृत्यू
गेल्या पाच महिन्यांत बाह्यवळण मार्गावर पाच गंभीर अपघात झाले असून, या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. बाह्यवळण मार्गावरील अपघाताच्या घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलीस, महामार्ग प्राधिकरणाने विविध उपाययोजना केल्या आहेत. बाह्यवळण मार्गावरील दरीपूल ते नवले पूलदरम्यान तीव्र उचारावर भरधाव वाहनांचे नियंत्रण सुटून गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. अपघाताच्या घटना रोखण्यासाठी गतीरोधक, वेग नियंत्रणासाठी ‘रमब्लिंग स्ट्रिप’, वेगमर्यादा, तसेच जागोजागी फलक लावण्यात आले आहेत. अवजड वाहनचालकांकडून वेगमर्यादा धुडकावली जात असल्याने गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.