सामान्य कार्यकर्त्यांचे दु:ख विलासराव देशमुख यांनी कायम जाणून घेतले. त्यामुळेच ते लोकनेते पदापर्यंत पोहोचले. मोठय़ा पदावर पोहोचूनही विलासरावांनी कधीही मोठेपणा मिरविला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना जपणारा नेता अशीच त्यांची ‘ओळख’ जनमानसात राहिली, अशा शब्दात राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबतच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.
साहित्य शिवार वार्षिकाच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त आठवणींचा जागर या अंतर्गत ‘तो राजहंस एक!’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे संस्थापक पृथ्वीराज पाटील, संयोजक जयराम देसाई आदी यावेळी उपस्थित होते. सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करीत मोठय़ा पदावर पोहचल्यामुळे त्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या दु:खाची जाण होती. तत्काळ निर्णय घेण्याची त्यांची हातोटी होती, असे डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सांगितले, तर विलासरावांच्या जीवनावरून सामान्य कार्यकर्त्यांचा असामान्य नेता कसा होतो हे दिसून येते. सत्ता नसतानाही त्यांनी सामान्यांच्या दु:खाची जाण ठेवल्यामुळेच ते लोकनेते झाल्याचे सुधीर गाडगीळ यांनी स्पष्ट केले.
दिल्लीसाठी महाराष्ट्र खेळ..
वैयक्तिकदृष्टय़ा त्यांनी कधीही कोणाचा दुस्वास केला नाही. काँग्रेस पक्षावर केलेली टीकाही त्यांनी कधी मनावर घेतली नसल्याचे रामदास फुटाणे यांनी सांगितले. राज्याची ताकद दिल्लीला माहिती आहे. महाराष्ट्रातील नेते एकत्र आले तर दिल्लीत आपल्याला बसू देणार नाहीत, याची जाणीवही त्यांना आहे. त्यामुळे ते नेत्यांना एकत्र येऊन देत नाहीत, असे सांगतानाच फुटाणे यांनी ‘दिल्लीसाठी महाराष्ट्र हा खेळ आहे आणि येथे मात्र बारामती आणि लातूरचा मेळ नाही’, अशी वात्रटिका केली.