पुणे : मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर सूस खिंडीत दोन मालवाहू ट्रकचा अपघात झाला. अपघातात दोघे जण जखमी झाले. ट्रकमध्ये अडकलेल्या दोघांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. बाह्यवळण मार्गावर सूस खिंड परिसरात महिंद्रा शोरुमजवळ रस्त्याच्या कडेला ट्रक थांबला होता. त्या वेळी भरधाव वेगाने साताऱ्याकडे निघालेला ट्रक थांबलेल्या ट्रकवर आदळला. ट्रकमधील केबिनमध्ये चालक आणि त्याचा सहकारी अडकले.

हेही वाचा >>> पुणे : टोमॅटो, मिरची, घेवड्याच्या दरात वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाताची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पाषाण केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात ट्रकच्या केबीनचे नुकसान झाले होते. केबीनचा काही भाग कटर यंत्राने कापून जवानांनी दत्तू अंबू गोळे (वय ६०) आणि सूरज सुर्वे (वय ३०) यांची सुटका केली. त्यांच्या पायला दुखापत झाली होती. गोळे आणि सुर्वे मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाणे, लतेश चौधरी, विष्णू राऊत, ज्ञानदेव गोडे, अब्दुल पटेल, सुरेश इष्टे, ओंकार देशमुख, विकास कुटे आदी मदतकार्यात सहभागी झाले होते.