पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पसार झालेला सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून बावधन पोलिसांनी अटक केलेल्या पाचही आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी मंगळवारी जामीन मंजूर केला.

हगवणेंना आश्रय दिल्याप्रकरणी कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम वीरकुमार पाटील (वय ४७, रा. कोगनोळी, ता. निपाणी, बेळगाव, कर्नाटक) यांच्यासह मोहन उर्फ बंडू उत्तमराव भेगडे (वय ५९, रा. भेगडे वस्ती, वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक ( वय ५५, रा. भांगरवाडी, लोणावळा), अमोल विजय जाधव (वय ३५), राहुल दशरथ जाधव (वय ४५, दोघे रा. पुसेगाव, ता. खटाव, सातारा) यांना पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली होती. त्यांना मंगळवारी दुपारी शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

अटक आरोपींचे राजेंद्र हगवणेंशी मित्रत्वाचे संबंध आहेत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर पसार झालेल्या राजेंद्र आणि सुशील हगवणेंना आश्रय दिला. मोबाइल संच, तसेच मोटारींचा वापर केला. या गुन्ह्यात आरोपी सामील आहेत का. त्यांनी हगवणेंना आर्थिक मदत केली का, यादृष्टीने तपास करायचा आहे, असे बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी न्यायालयात सांगितले.

राजेंद्र हगवणे, तसेच अन्य आरोपी हे प्रभावशाली राजकारणी असून, अटक आरोपींच्या मदतीने साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, तसेच पुरावा नष्ट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकील नितीन अडागळे यांनी युक्तिवादात केली.

आरोपींच्या वतीने ॲड. सुशीलकुमार पिसे, ॲड. कुंडलिक गावडे, ॲड. सचिन जाधव, ॲड. श्रीकांत पन्हाळे यांनी बाजू मांडली. आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा जामीनपात्र आहे. अशा जामीनपात्र गुन्ह्यात आरोपींना अटक करताना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३१ नुसार नोटीस देण्यात आलेली नाही. मुख्य आरोपींविरुद्ध लावण्यात आलेली कलमे आरोपींना लागू होत नाहीत. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी, तसेच जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. दाेन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींनी जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला. न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाने पोलिसांना सुनावले

‘गुन्हेगाराला आश्रय देणे हा जामीनपात्र गुन्हा आहे. असे असताना आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली. पोलिसांना फक्त अटकेचे अधिकार आहेत का, सरकार पक्षाने जागरूकता दाखवायला नको का,’ अशा कठोर शब्दांत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी पोेलिसांना सुनावले.