पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अखेर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील निलेश चव्हाणला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. निलेश चव्हाणचा पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर पुण्याहून दिल्ली, दिल्लीहून गोरखपूर आणि तिथून नेपाळ गाठल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. निलेश चव्हाण हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. परंतु, तांत्रिकदृष्ट्या तपासंती त्याला आज बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहा पथक निलेश चव्हाणचा शोध घेत होते. प्रामुख्याने गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट चार आणि सायबरचे पोलीस अधिकारी, कर्मचारी शोध घेत होते. निलेश चव्हाण हा नेपाळ भारत सीमेवरून वीस किलोमीटर आत असल्याची माहिती मिळाली होती. सायबर पोलिसांच्या च्या मदतीने पिंपरी- चिंचवड पोलीस तिथपर्यंत पोहोचले. निलेश चव्हाण हा भारतीय मोबाईल किंवा सिम कार्ड वापरत नव्हता. यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे अशक्य झालं होतं. निलेश चव्हाण नेपाळमधील सिम कार्डद्वारे तिथलं इंटरनेट वापरत असे. अखेर सायबरच्या मदतीने पिंपरी- चिंचवड पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. तो एकटाच राहत होता. परंतु, नेपाळमधील सिम कार्डद्वारे तो कुणाच्या संपर्कात होता, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
वैष्णवी हगवणे यांचं दहा वर्षाच बाळ त्याच्याकडे होत. हे बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबातील सदस्यांना निलेश चव्हाणने पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावलं होतं. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखेर याबाबत पोलिसांनी आणि प्रशासनाने हस्तक्षेप करत वैष्णवीच बाळ कस्पटे कुटुंबाच्या स्वाधीन केलं होतं. तेव्हा देखील अनोळखी व्यक्तीने ते बाळ रस्त्यावर कस्पटे कुटुंबाला दिलं होतं.
वारजेसह बावधन पोलिसात देखील निलेश चव्हाण विरोधात तक्रार देण्यात आली होती. पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून पुणे पोलिसांना निलेश चव्हाणला स्वाधीन केला जाऊ शकतं. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. निलेश चव्हाण यांच्याकडे चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची धागेदोरे कुठपर्यंत आहेत, हे स्पष्ट होणार आहे. नेपाळमधून निलेश चव्हाणला अटक केल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांचं कौतुक होत आहे.