पुणे : मुंबई - सोलापूर आणि मुंबई - साईनगर शिर्डी या वंदे भारत गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे या गाड्यांमधून ३२ दिवसांत एक लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. याचवेळी या गाड्यांमुळे रेल्वेच्या तिजोरीत ८.६० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या ११ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या. या गाड्यांनी ३२ दिवसांच्या कालावधीत १ लाख २५९ प्रवाशांची वाहतूक केली. याचबरोबर या गाड्यांमुळे ८.६० कोटींची महसूल जमा झाला आहे. मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथील २६ हजार २८ प्रवासी संख्येतून २.०७ कोटी रुपयांच्या महसूलाची नोंद केली. सोलापूर - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने सोलापूर, कुर्डूवाडी आणि पुणे येथील २७ हजार ५२० प्रवासी संख्येतून २.२३ कोटी रूपयांचा महसूल नोंदविला. हेही वाचा >>> वसंत मोरे यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, श्वान संगोपन केंद्राचे उद्घाटन मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि नाशिक रोड येथील २३ हजार २९६ प्रवाशांच्या संख्येतून २.०५ कोटी रुपयांच्या महसुलाची नोंद केली. साईनगर शिर्डी - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने साईनगर शिर्डी आणि नाशिकरोड येथून २३ हजार ४१५ प्रवाशांच्या संख्येतून २.२५ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. मुंबई - सोलापूर- मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील नववी वंदे भारत गाडी आहे आणि मुंबई - साईनगर शिर्डी - मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील दहावी वंदे भारत गाडी आहे. हेही वाचा >>> पुणे : कोथरूडमध्ये कोयता गँगची दहशत, वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार वंदे भारत एक्स्प्रेसमधील सुविधा - ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट - जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली - बायो-व्हॅक्यूम टॉयलेट - प्रत्येक सीटच्या खाली चार्जिंग पॉइंट - इंटेलिजेंट एअर कंडिशनिंग सिस्टीम