लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: महापालिका निवडणूक वर्षभरापासून रखडल्या असताना मनसे नेते वसंत मोरे यांनी स्व:खर्चातून केलेल्या विकासकामांचा मोडतोड झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काम शंभर टक्के पूर्ण झाले असतानाच मोडतोडीचा प्रकार घडल्याने वसंत मोरे यांनी समाज माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. मी एकटा नाही लक्ष ठेवू शकत, तुमच्या मदतीची गरज आहे, अशी भावनिक साद ही त्यांनी घातल्यानंतर मोडतोड कशी झाली याचा उलगडा समाज माध्यमातूनच झाला आहे.

वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या बजेटमधून भारती विद्यापीठ कमान ते लेक टाऊन या रहदारीच्या पण प्रचंड दुरवस्था झालेल्या रस्त्याचे मोरे यांनी दोन वर्षांपूर्वी सुशोभीकरण केले. रस्त्यावर सातत्याने कचरा टाकण्यात येत असल्याने आणि मोकाट डुक्करांचा मोठा वावर असल्याने मोरे यांनी योग्य त्या उपाययोजना करत या प्रकाराला आळा घातला. रस्त्यांच्या उंचवट्याच्या भाग लोखंडी जाळ्यांनी बंदिस्त केला. रस्त्या बाजूला लॉन आणि स्पिंकलर्स बसविले होते. काही दिवसांपूर्वी स्पिंकलर्स ची चोरी झाली होती.

हेही वाचा… पुणे : दारू पिऊन शिवीगाळ केल्याने एकाचा खून

वर्षभर निवडणूक नसल्यामुळे कामाची डागडुजी करण्यासाठी प्रशासनाकडे कोणतेही बजेट उपलब्ध नव्हते. त्यामुळे वसंत मोरे यांनी स्वखर्चाने सर्व कामे पूर्ण केली. मात्र बुधवारी सायंकाळी या कामाची मोडतोड झाल्याचा प्रकार घडला अन मोरे यांनी समाज माध्यमातून त्याबाबत नाराजी व्यक्त केली. मोडतोड कशी झाली, याची कोणाला माहिती असल्यास ती द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. राजकीय आकसातून हा प्रकार झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत असतानाच तीव्र उतारावरून आलेल्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने तो लाकडी फळे यांना धडकल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने वसंत मोरे यांना दिली आणि मोडतोड कशामुळे झाली याचा अखेर उलगडा झाला.

हेही वाचा… HSC Result 2023 : बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९१.२५ टक्के

माझे नागरिकांना आवाहन आहे, हे काम मी माझ्या वैयक्तिक पैशातून करतोय, तुम्हीही येता जाता थोडे लक्ष ठेवा राव. मी एकटा नाही लक्ष ठेवू शकत, तुमच्या मदतीची गरज आहे , असे आवाहन वसंत मोरे यांनी केले आहे.