पुणे: शहरात ज्या भागात पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुणे, बागकाम तसेच रस्ते धुण्यासाठी केला जातो, तेथील नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तरीही सुधारणा न झाल्यास प्रसंगी त्यांचा नळजोड तोडण्यात येणार आहे. शहरातील सर्व भागांतील नागरिकांना समान आणि पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना सुरू केली आहे. योजनेचे काम अनेक भागांमध्ये ९० टक्के पूर्ण झाले असून, तेथे महापालिकेने मीटर बसविले आहेत. त्यामुळे कोणत्या भागात किती पाणी जाते, याची माहिती महापालिकेला मिळत आहे.
वडगाव बुद्रुक जलशुद्धीकरण केंद्रातून कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा, सिंहगड रस्ता, धायरी, आनंदनगर, सनसिटी, धनकवडी या भागांना पाणी दिले जाते. मात्र, या भागात लोकसंख्या वाढली असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी देण्यास अडचणी येत आहेत.
पाण्याची नासाडी होऊ नये, यासाठी टाक्यांना लावण्यात आलेले बॉल काही सोसायट्यांचे खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे. तर, काही नागरिक वॉशिंग सेंटर, बागकाम तसेच रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे याची शहानिशा करून याला आळा घालण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने पावले उचलली आहेत, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
धरणातील उपलब्ध पाणीसाठा महापालिकेला मंजूर झालेला कोटा आणि दररोज लागणारे पाणी याचा दर आठवड्याला पाणीपुरवठा विभागाच्या वतीने आढावा घेतला जातो. यामध्ये कोणत्या भागातून अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी आल्या, याची माहिती घेतली जाते. काही जुन्या सोसायट्यांमध्ये पाणी पुरेसे मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे अशा सोसायट्यांमध्ये जाऊन अभियंत्यांनी तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले. सोसायटीच्या वितरण व्यवस्थेमुळे पाण्याची गळती होत असल्याचे समोर आल्यानंतर संबधितांना ही गळती दुरुस्ती करण्याची नोटीस देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आले आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रथम नोटीस दिली जाईल. त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यानंतरही त्यामध्ये सुधारणा न झाल्यास आणि पाणी वाया जात असल्याचे लक्षात येताच संबंधितांना कोणतीही पूर्वसूचना न देता थेट नळजोड तोडण्याची कारवाई केली जाणार आहे. – नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, पुणे महापालिका