पुणे : राज्यात सर्वदूर पाऊस झाल्याने फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. फळभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. घाऊक बाजारात आवक कमी झाल्याने हिरवी मिरची, ढोबळी मिरची, फ्लाॅवर, गाजर, या फळभाज्यांच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशातून २० टेम्पो हिरवी मिरची, इंदूर येथून ५ टेम्पो गाजर, कर्नाटकातून २ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून २ ते ३ टेम्पो शेवगा, तामिळनाडूतून ३५० प्लास्टिक जाळी (क्रेट्स) तोतापुरी कैरी, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, गुजरातमधून ३ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून ८ ते १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून ५०० ते ५५० गोणी सातारी आले, भेंडी ५ टेम्पो, गवार ३ टेम्पो, टोमॅटो ८ हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, गाजर ७ ते ८ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ टेम्पो, भुईमूग शेंग ६० गोणी, मटार ५०० ते ६०० गोणी, तांबडा भोपळा १४ ते १५ टेम्पो, कांदा ९० ते १०० ट्रक अशी आवक झाली, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४५ ते ५० टेम्पो अशी आवक झाली.
पालेभाज्यांच्या दरात वाढ
पावसामुळे आवक कमी झाल्याने पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली. मार्केटयार्डातील तरकारी विभागात मेथीच्या शेकडा जुडीच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली. कांदापात, मुळे, शेपूच्या शेकडा जुडीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली. राजगिरा, करडई, अंबाडीच्या दरात घट झाली. रविवारी तरकारी विभागात कोथिंबीर एक लाख २५ हजार जुडी, तसेच मेथीच्या ३५ हजार जुडींची आवक झाली होती. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – १५०० ते २५००, मेथी – २५०० ते ३५००, शेपू – १५०० ते २०००, कांदापात – १५०० ते २०००, चाकवत – ५०० ते १०००, करडई- ५०० ते ८००, पुदीना – ५०० ते १०००, अंबाडी – ४०० ते ७००, मुळे – १५०० ते २०००, राजगिरा – ५०० ते ८००, चुका- ५०० ते १०००, चवळई – ५०० ते ८००, पालक – १५०० ते २५००
कलिंगड, खरबूज, संत्री, डाळिंब महाग
मागणी वाढल्याने कलिंगड, खरबूज, डाळिंब, संत्री या फळांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पपई, अननसाच्या दरात घट झाली आहे. अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी फळबाजारात मोसंबी ८० ते ९० टन, संत्री १५ ते २० टन, डाळिंब ९० ते १०० टन, पपई ३० ते ३५ टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड ७ ते ८ टेम्पो , खरबूज ४ ते ५ टेम्पो, चिकू एक हजार खोकी, अननस १ ट्रक, बोरे ३० ते ३५ गोणी, सीताफळ १० ते १५ टन, सफरचंद ८ ते ९ हजार पेटी अशी आवक झाली.