लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कालवा समितीच्या बैठकीत केलेल्या नियोजनानुसार दौंड, पुरंदर, इंदापूर आणि बारामती तालुक्यांना पहिल्या उन्हाळी आवर्तनात ४.९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार असल्याने मतदान होईपर्यंत या भागाला खडकवासला धरणातून नवीन मुठा उजवा कालव्याद्वारे जलसंपदा विभागाकडून पाणी देण्यात आले. ‘बारामती’च्या मतदारांना खूश करण्यासाठी तब्बल पुणे शहराला एक महिना पुरेल एवढे पाणी ग्रामीण भागासाठी सोडण्यात आल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुणे शहराला पाणी कमी पडण्याची शक्यता असून पुणे लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान झाल्यानंतर पुण्यात पाणीकपात होण्याची दाट शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता मतदान होईपर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या २४ फेब्रुवारीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड, पुरंदर, बारामती आणि इंदापूर या तालुक्यांसाठी उन्हाळ्यात दोनवेळा चार आणि तीन टीएमसी असे ७.४० टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ४ मार्चपासून पहिल्या उन्हाळी आवर्तनाला सुरुवात झाली. खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्याद्वारे ४५ ते ५० दिवस पाणी सोडण्यात येणार होते. नियोजनानुसार ४ मार्चपासून १९ एप्रिल रोजी ४५ दिवस, तर २४ एप्रिल रोजी ५० दिवस पूर्ण झाले. त्यामुळे ग्रामीण भागासाठी पाणी सोडण्याचे थांबविणे अपेक्षित होते. मात्र, बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार असल्याने ७ मेपर्यंत ११०५ क्युसेक, तर ८ आणि ९ मे रोजी ९०५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. अखेर शुक्रवारपासून (१० मे) पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागासाठी नियोजनापेक्षा १५ दिवस जास्त पाणी सोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा-पुणे : ‘अमोल कोल्हे’ मालिकांमधून संन्यास घेणार ? आढळराव व्हिडिओ दाखवत म्हणाले, हा तर चुनावी जुमला!

दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत केवळ ६.९८ टीएमसी (२३.९५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली असून धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन, पाणीचोरी आणि गळती, याबरोबरच ग्रामीण भागासाठी दुसरे उन्हाळी आवर्तन घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याचे १३ मे रोजी मतदान पार पडल्यानंतर शहरावर पाणीकपातीची टांगती तलवार असणार आहे.

उन्हाळी हंगामात ग्रामीण भागासाठी ७.४० टीएमसी पाणी मंजूर होते. त्यामध्ये पहिल्या उन्हाळी आवर्तन ४.९० टीएमसी, तर दुसऱ्या आवर्तनात अडीच टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन होते. मात्र, इंदापूर, दौंड, बारामतीमधून पाण्याची प्रचंड मागणी होती. त्यामुळे पहिल्या आवर्तनात ५.९ टीएमसी पाणी वापरले. उर्वरित पाण्याचे पुन्हा योग्य नियोजन करण्यात येईल, असे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी सांगितले.