पर्यावरण अभ्यासक, कार्यकर्त्यांची भीती; ठोस उपाययोजना करण्याची मागणी

पुणे : महाशिर हा देशी मासा पूर्वी मुळा-मुठा नदीच्या पात्रात मुक्तपणे पोहताना दिसायचा. चित्रबलाकसारखा दुर्मीळ पक्षी नदीकाठावरून सहज वावरायचा. आता मात्र शहरीकरणाच्या ओझ्याखाली दबून नदीकाठची जैवविविधता घुसमटत आहे. लुप्त होणारी जैवविविधता, बुजणारे नाले आणि नदीकाठसंवर्धनात आकुंचन पावणारे नदीपात्र पुण्यात पावसाळ्यात पुरासारखी परिस्थिती निर्माण करतील, अशी भीती एका बाजूला असून, दुसरीकडे अमर्याद पाणीउपसा करणाऱ्या विंधनविहिरी तयार होत असताना, नदीकाठची प्रदेशनिष्ठ वृक्षसंपदा नष्ट होत असल्याने भूजल पुनर्भरणही अवघड होत गेल्याने भविष्यात उन्हाळ्यात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होईल, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

दाट वृक्षराजी, संपन्न जैवविविधता असे वैभव मिरविणाऱ्या पुण्यातील नद्या आणि आसपासच्या जैवविविधतेचे जागतिक पर्यावरणदिनी हे चित्र आहे. पुणे शहरात झाडांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. टेकडीपासून घराचे अंगण वा गच्चीपर्यंत वृक्षसंपदेचे, वनस्पतींचे जतन-संवर्धन करण्याची धडपड पुणेकर करत असतो. मात्र, शहराच्या विस्तार-विकासात ही हिरवी स्वप्ने आताशा उन्मळून पडत आहेत. नदीकाठही असाच ओसाड होत असल्याने तेथील जैवविविधता नष्ट होत असून, त्याचा दीर्घकालीन फटका मानवालाच बसेल, अशी भीती पर्यावरणवादी कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

स्वच्छ पाण्याचे लक्षण असलेला महाशिर आणि स्वच्छ पर्यावरणाची खूण असलेला चित्रबलाक, शहरातील नद्यांपासून दूर गेलेले दिसतात. एका बाजूला सिमेंटची पोती, जेसीबी, ट्रक आणि बांधकामासाठी आवश्यक असलेल्या अनेक अवजारांनी मुळा-मुठा नदीकाठ सुशोभित करण्यासाठी धडपड होताना दिसते, तर दुसरीकडे शहरातील घरांची सर्वाधिक मागणी असलेल्या वाकडसारख्या भागात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे हवेत उडणाऱ्या सिमेंट, धुळीपासून त्रस्त झालेले रहिवासी मोर्चे काढत आहेत. या सगळ्या वावटळीत अनेक छोटे-मोठे-सूक्ष्म जीव, वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती मात्र संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाल्याचे निरीक्षण पर्यावरणप्रेमी नोंदवत आहेत. विकास आवश्यक असला, तरी तो पर्यावरणाच्या मुळावर उठणारा नसावा, यासाठी जैवविविधतेच्या जतन-संवर्धनासाठी ठोस प्रयत्नांची गरज ते अधोरेखित करत आहेत.

‘वाढत्या शहरीकरणामुळे केवळ नदीकाठीच प्राण्यांना अधिवास उरला आहे. त्यांचा नैसर्गिक अधिवास हिरावून पार्क, फूड कोर्टसारख्या कृत्रिम गोष्टी निर्माण करणे कितपत योग्य आहे? नदीकाठचे एक झाड काढले जाते, तेव्हा फक्त झाड नाही, तर त्याची संपूर्ण परिसंस्थाही नष्ट होते. विकास व्हायला हवा. मात्र, प्रकल्प पर्यावरणपूरक करायला हवेत,’ अशी अपेक्षा पर्यावरण अभ्यासक प्राजक्ता महाजन व्यक्त करतात.

जीवित नदी प्रकल्पाच्या संस्थापक शैलजा देशपांडे सांगतात, ‘नदीवर कुणाची मालकी नाही. आपण फक्त तिचे राखणदार आहोत. जिवंत झरे, नदीकाठची झाडे यांचे संवर्धन करायला हवे. आपला कचरा, आपली उष्णता या सगळ्यांचा भार नदी वाहून नेत असते. तिच्या अस्तित्वाचे संरक्षण आपणच करायला हवे. नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली झाडांची कत्तल न करता नागरिकांचा विकास आणि नदीचे संवर्धन यात संतुलन असायला हवे.’

‘नदीत असलेल्या जिवंत झऱ्यांमुळे भूजल पुनर्भरण होत राहते. वाढलेले तापमान कमी करण्यात त्यांची मदत होते. नदीकाठच्या झाडांमुळे पवन वाहिनी तयार होऊन वायुप्रदूषणही कमी होते. चतुरासारखे छोटे कीटक डासांची अंडी, डास आणि अळ्या खात असतात. त्यामुळे रोगराई कमी होण्यास मदत होते. वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाश्या, वटवाघळांची वसाहत या नद्यांच्या काठी आहे. वटवाघूळ उत्तम परागीभवनासाठी ओळखले जाते. इथे असणाऱ्या प्रत्येक जीवामागे कारण आहे. जैविक साखळी संतुलित ठेवण्यासाठी नदीकाठचे प्रत्येक झाड कारणीभूत ठरते,’ असेही देशपांडे नमूद करतात.

पर्यावरणतज्ज्ञ गुरुदास नूलकर सांगतात, ‘सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेपासून तयार झालेली अन्नसाखळी, पाण्यामध्ये राहणारे सजीव आणि काठावरची वनस्पती मिळून एक परिसंस्था तयार होत असते. त्यापासून पाणी शुद्धीकरण, भूजल पुनर्भरण, विविध प्रजातींची संख्या संतुलित ठेवणे इत्यादी परिसेवा मिळतात. नदीकाठची आणि पाण्यातली जैवविविधता कमी झाली, की या सगळ्या परिसेवाही बंद होतात. त्यामुळे जे पाणी पुण्यापासून सोलापूरपर्यंत पोहोचते, ते नैसर्गिकपणे शुद्ध होण्याची नदीची क्षमताच कमी होते.’

कोणती जैवविविधता धोक्यात?

वाळूंज, पाणीजांभूळ, धेडउंबर, शिंदीची झाडे, करंज किरमिरा, उंबराच्या दुर्मीळ जाती, नागरमोथा, अशी केवळ पाणवठ्याच्या जागी येणारी प्रदेशनिष्ठ झाडे; रानतुळस, पाणलवंग यांसारख्या दुर्मीळ वनस्पती, दोनशे वर्षांपूर्वीची जुनी झाडे, छोट्या झुडपांनी पुण्यातील नद्यांचा काठ आजही फुललेला आहे. स्वर्गीय नर्तक, नदीसुरय, ब्राह्मणी डक, खंड्या, कोतवाल, मोर, घारी यांच्यासह अनेक स्थलांतरित पक्षीही इथे विसावत असतात. उंदीर, बेडूक, साप, मुंगूस, पतंगाच्या विविध जाती, अनेक पृष्ठवंशीय जीव, कीटक नदीकाठावर वास्तव्याला असतात. ही जैवसाखळी आणि त्यांची अन्नसाखळी यांतून नदीची जैवविविधता आकार घेत असते. मात्र, नदीच्या पाण्याचा घसरत चाललेला दर्जा, प्रदूषण, विकासकामे यामुळे ही जैवविविधता धोक्यात आली आहे.

पर्यावरणासाठी लढा

पुणे हे चळवळींचेही शहर असल्याने हिरवी स्वप्ने टिकावीत, यासाठी बाजू लावून धरणारे पुणेकरही आपल्या परीने आपला आवाज पोहोचवत आहेत. वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून नदीकाठी असलेल्या परिसंस्था, देवराया आणि नदीपात्राचे संवर्धन करावे, ही मागणी लावून धरत आहेत. अलीकडच्या काळात राम-मुळा संगमावर करण्यात आलेल्या चिपको आंदोलनात पर्यावरणवादी कार्यकर्ते, मॅगसेसे पुरस्कारविजेते सोनम वांगचुक आणि अभिनेता सयाजी शिंदे यांनीही प्रत्यक्ष उपस्थित राहून पुणेकरांच्या या चळवळीला पाठिंबा दिला. शिवाय, जीवित नदी प्रकल्प, पुणे रिव्हर रिवायव्हल, पार्किन्सन्स मित्र मंडळ यांसारखे गट शहराच्या शाश्वत विकासासाठी लढा देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरी बाजू काय?

‘पुणे महापालिकेने सीडब्ल्यूपीआरएस, तसेच सिंचन विभागाच्या परवानगीने पर्यावरण मंजुरी घेऊन नदीसुधार प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी जैवविविधतेचा अभ्यास करून सविस्तर अहवालही सादर करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात सिमेंटचा वापर न करता मुरुम, दगड, माती अशा स्थानिक वस्तूंना प्राधान्य दिले जात आहे. पाण्याचा प्रवाह आणि झाडांचा विचार करून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रकल्पाच्या कामात विविध पर्यावरणतज्ज्ञांची नेमणूकही करण्यात आली आहे. पाण्यात आणि पाण्यावर टिकू शकणाऱ्या उपलब्ध स्थानिक वनस्पती यांचा अभ्यास करून प्रकल्पाची आखणी केली गेली. प्रकल्पाच्या कामासाठी केवळ सुबाभूळ आणि कूबाभूळ अशी निरुपयोगी झाडे काढण्यात आली असून, त्या बदल्यात बहावा, बकुळ, कदंब, कांचन, सोनमोहर, अर्जुन, कडुलिंब, करंज, पिंपळ, वड, आंबा, जांभूळ, चिंच, कैलासपती अशी देशी वाणाची ३७६५ झाडे लावली असून, सुमारे वीस हजार झाडांचे पुनर्रोपण करण्याची निविदाही काढण्यात आली आहे. एरवी नदीकडे पाठ करून बसणारे लोक या प्रकल्पामुळे नदीच्या पात्राकडे परत येत आहेत. नागरिकांनी नदीकडे यायला हवे म्हणूनच या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे,’ असे पुणे महापालिकेचे म्हणणे आहे.