19umranikar
– गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

‘जनता बँक’ आणि ‘तन्वी हर्बल’ प्रायोजक असलेल्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची पुणे विभागाची प्राथमिक फेरी सोमवारी झाली. ‘सिंहगड इन्स्टिटय़ूट’, ‘मांडके हिअरिंग सव्र्हिसेस’, ‘इंडियन ऑईल’, इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट (आयसीडी) यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत असून ‘युनिक अॅकॅडमी’ आणि ‘स्टडी सर्कल’ या स्पर्धेसाठी नॉलेज पार्टनर आहेत. सध्याची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती, आव्हाने अशा अनेक मुद्दय़ांवर विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन या स्पर्धेच्या निमित्ताने समोर आला. धर्म आणि दहशतवाद, बिईंग ‘सेल्फी’श, यत्र नार्यस्तू पूज्यन्ते?, मला कळलेली ‘नमो’नीती, इतिहास वर्तमानातला.. हे पाच विषय प्राथमिक फेरीसाठी स्पर्धकांना देण्यात आले होते. आपल्या शैलीत आणि भाषेत विद्यार्थी व्यक्त झाले.
‘धर्म आणि दहशतवाद’ या विषयाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक प्राधान्य दिले. धर्म म्हणजे नक्की काय? एकतर धर्म- ‘रिलीजन’ या अर्थाने व दुसरे आपण करतो ते कर्म म्हणजेच धर्म. धर्म ‘कॅटॅलिस्ट’ ठरतो आहे का? धर्माचा अभिमान कोणत्या पातळीपर्यंत असावा?, धर्मापेक्षाही स्वकर्तृत्वाचाच अभिमान बाळगणे अधिक योग्य आहे, धर्माला रंग आपण देतो, कोणताच धर्म दहशतवादाला प्रोत्साहन देत नाही. स्वधर्माचा अभिमान बाळगा, पण इतर धर्माचा आदर करुनच. धर्म ही संकल्पना दहशतवादाशी जोडण्यामागचे राजकारण, अर्थकारण अशा मुद्दय़ांवर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला. यत्र नार्यस्तू पूज्यन्ते? हा विषयही विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरला. केवळ दुर्गादेवीची पूजा केली म्हणजे स्त्रीला सन्मान देणे नव्हे. तिला ‘मासिक पाळी’सारख्या ओळखीसह स्वीकारणे आवश्यक आहे, या मुद्दय़ांबरोबर स्त्री जेव्हा चौकटीतून बाहेर पडून काही करु पाहते, तेव्हा  कुटुंबाच्या अस्तित्वाचा प्रश्न का निर्माण होतो? सती प्रथा पूर्वीच संपली, विधवा स्त्रियांचे प्रश्न अजून का संपले नाहीत? रस्त्यावर दुचाकी चालवताना एखादी स्त्री मागून येऊन पुरूषाच्या पुढे गेली तर लगेच तिला ‘ओव्हरटेक’ करण्याकडे त्या पुरूषाचे लक्ष का असते? इतका पुरूषी अहंकार आपण का बाळगतो? असे प्रश्नही विद्यार्थ्यांनी उपस्थित केले.
मला कळलेली ‘नमो’ नीती मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या भारत स्वच्छता अभियानातून दिसलेले मोदी, त्यांची परदेश नीती, अर्थकारणावर होणारे परिणाम, निवडणूकपूर्व काळात मोदींनी सोशल मीडियाचा केलेला प्रभावी वापर. निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतर बदललेल्या भूमिका, अशा मांडलेल्या मुद्दय़ांनी विद्यार्थ्यांचा राजकारणाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची झलक दिली. वास्तविक तरूणाईला सर्वाधिक जवळ जाणाऱ्या बिईंग ‘सेल्फी’श या विषयाला मात्र विद्यार्थी फारसे व्यक्त झाले नाहीत. ‘इतिहास’ म्हणजे काय? फक्त भूतकाळातील घटनांना इतिहास म्हणावे का? त्याचा वर्तमानावर होणारा परिणाम, वर्तमानात इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी कशी हवी. असे पैलू ‘इतिहास वर्तमानातला..’ यातून पुढे आली.

नवे काही शिकवणारी स्पर्धा
– ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धकांचे मनोगत

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पुणे विभागाच्या प्राथमिक फेरीत ७२ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून १४ विद्यार्थ्यांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली. स्पर्धेच्या विषय आणि परीक्षकांचे मार्गदर्शन यामुळे ही स्पर्धा खूप वेगळी ठरते. स्पर्धेतून खूप शिकायला मिळाले, असे मत स्पर्धकांनी व्यक्त केले.

‘शिकायला मिळाले’
मला गेल्यावर्षी या स्पर्धेत सहभागी होता आले नाही. या स्पर्धेतील सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे विषय. ते रोजच्या आजूबाजूच्या घटनांबाबत विचार करायला लावणारे होते. परीक्षकांनी केलेले मार्गदर्शनही उत्तम होते. त्यातून अनेक लक्षात न आलेल्या गोष्टी कळल्या. पुढील फेरीसाठी परीक्षकांच्या सूचनांवरून अधिक तयारी करणार. पुढील फेरीच्या विषयांबाबत खूप उत्सुकता आहे.
– माधुरी निंबाळकर (गणित विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

‘स्वत:तील वक्ता शोधायला लागतो’
मी गेल्यावर्षीही या स्पर्धेत सहभागी झालो होतो. इथे खूप चुरस असते आणि विषयही सरधोपट नसतात. त्यामुळे मांडणी करताना स्वत:तील वक्ता शोधावाच लागतो. स्पर्धेत विद्यार्थ्यांचे नाव, महाविद्यालय जाहीर करण्यात येत नाही. त्यामुळे निवडीबाबत साशंकता राहात नाही. ही पद्धत खूप स्वागतार्ह आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागात स्पर्धा घेऊन त्यातून पुढे आलेले विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने राज्यस्तरीय प्रतिनिधित्व असते. राज्यभरासाठी एकच फेरी घेण्यापेक्षा स्पर्धा घेण्याची ही पद्धतही अधिक चांगली वाटली.
– मयूर आव्हाड (फग्र्युसन महाविद्यालय)

‘न विसरता येणारा अनुभव’
मी गेल्यावर्षी औरंगाबाद विभागात नोंदणी केली होती. पण प्रत्यक्ष स्पर्धेच्या दिवशी जाऊ शकलो नाही, त्याची रुखरूख होती. यावर्षी पुण्यात शिकायला आल्यानंतर या स्पर्धेत सहभागी होणे आणि पुढील फेरीत निवड होणे हा न विसरता येणारा अनुभव आहे. प्रत्येक स्पर्धकाची विषयाची मांडणी, परीक्षकांचे मार्गदर्शन यांतून खूप शिकायला मिळाले. स्पर्धेत कितीही विद्यार्थी असले, तरी एकच जागा महत्त्वाची असते आणि तेथे मला पोहोचायचे आहे.
– बालाजी तळेगावे (मॉडर्न कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर)

‘अधिक सरस अनुभव’
मी गेल्यावर्षीही या स्पर्धेत सहभागी झालो होतो. तो अनुभव चांगलाच होता. यावर्षीचा अनुभव अधिक सरस ठरला. स्पर्धेचे विषय हे आव्हानात्मक असतात. त्याच्या मांडणीसाठी अभ्यास करावाच लागतो. प्रत्येक विषयातून निघणारे अर्थ आणि कंगोरे इतके असतात, की अभ्यासाशिवाय ते मांडता येत नाहीत. त्यामुळे स्पर्धेच्याही पलीकडे जाऊन स्वत:ची प्रगती करण्यासाठी ही स्पर्धा करावी.
– चित्ततोष खांडेकर (संस्कृत विभाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ)

‘महत्त्वाचे व्यासपीठ’
स्पर्धा, त्यातील सहभागाची चुरस, स्वत:ची पडताळणी करण्याची संधी हे सगळे आहेच, मात्र ‘लोकसत्ता’ चे व्यासपीठ मला अधिक महत्त्वाचे वाटले. या व्यासपीठावर मला माझे विचार मांडण्याची, व्यक्त होण्याची संधी मिळाली हीच खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यात पुढील फेरीसाठी निवड झाल्यामुळे आणखीच छान वाटते आहे.
– अर्जुन नलावडे (संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
——————————

परीक्षकांकडून मार्गदर्शन
नवे वाचत राहा, ऐकत राहा. असा गुरूमंत्र स्पर्धेच्या परीक्षकांनी विद्यार्थ्यांना दिला. तरूणाईला व्यक्त होण्यासाठी आणि विचारप्रवृत्त करणारी संधी असल्याचे मत परीक्षकांनी व्यक्त केले. सादरीकरण, विषयाची मांडणी अधिक चांगली व्हावी यासाठी परीक्षकांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

‘सरधोपट विचार करू नका’19dhole
मराठीतील वक्तृत्वाची परंपरा मोठी आहे, परंतु ती क्षीण होत चालली आहे. या पाश्र्वभूमीवर स्पर्धेतील अनेक विद्यार्थ्यांचे वक्तृत्व संयत, संयमित, मुद्दय़ाला धरुन व संवाद साधणाऱ्या शैलीचे होते. आशेची बेटं त्यातून नक्कीच सापडावीत. परंतु वक्तयांसाठी काही गोष्टी सुचवण्याजोग्या आहेत. भाषणात शाळकरी प्रकारचे फसवे नाटय़ आणण्याचा प्रयत्न नको. दूरचित्रवाणीवरील चर्चा व राजकीय व्यक्तींच्या भाषणांमध्ये हातवारे करुन असे फसवे नाटय़ आणलेले बघायला मिळते, परंतु वक्ता म्हणून भाषण करताना केवळ फड गाजवणे एवढाच उद्देश नसावा. भाषण शब्दबंबाळ नको. कवितेची एखादी ओळ, शायरी, सुविचार, म्हण भाषणात आल्यास हरकत नाही, पण घासून गुळगुळीत झालेल्या शब्दरचनांचा वारंवार वापर टाळावा. धर्म, दहशतवाद अशा संकल्पना खूप गुंतागुंतीच्या असतात. या गोष्टी आपण फारच सोप्या, सरधोपट करुन मांडत नाही ना, याकडे लक्ष हवे. एकवेळ त्यातील गुंतागुंत पुरेशी मांडता आली नाही तरी चालू शकेल, पण संकल्पनेचे सपाटीकरण नको. भाषणात समकालीन वास्तवाविषयी बोलताना प्रत्येक ठिकाणी इतिहासाची साक्ष काढण्याचा अट्टाहास नको. संदर्भापुरता इतिहास जरुर घ्यावा, पण सारे लक्ष इतिहासावरच नको.
– विश्राम ढोले   
—–
‘देहबोलीकडेही लक्ष हवे’19gajendragadkar
वक्तृत्व म्हणजे केवळ भाषण नव्हे. भाषणाचा आशय, भाषाशैली, उच्चार, आवाजाची पातळी, देहबोली हे सारेच त्यात महत्त्वाचे असते. आपण कसे उभे राहतो यातूनही अनेक गोष्टी श्रोत्यांपर्यंत पोहोचत असतात. या घटकांचा काहीसा अभाव विद्यार्थ्यांच्या भाषणांमध्ये जाणवला. काही जणांच्या भाषणात सुसंगतपणा व विषयाची तयारीही थोडी कमी वाटली. परंतु एकूणच या पिढीकडे चांगला आत्मविश्वास असल्याचे दिसून आले. ऐनवेळीही विषय मिळाल्यास ही मुले नक्की धीटपणे बोलू शकतील.
– वर्षां गजेंद्रगडकर
—–
‘आशय आणि शब्दांचा वापर महत्त्वाचा’19modak
भाषणासाठी निवडलेल्या विषयाचे मूळ संदर्भ शोधणे आवश्यक आहे. तसा प्रयत्न काही जणांच्या भाषणात कमी पडल्याचे जाणवले. जसा आशय महत्त्वाचा आहे तसा शब्दांचा वापरही अचूक हवा. आशयानुसार बोलण्याची शैली बदलणेही जमायला हवे. परंतु विद्यार्थी आपले म्हणणे ठाशीवपणे, आत्मविश्वासाने मांडत आहेत ही बाब सकारात्मक वाटली.
– डॉ. केतकी मोडक
—–
‘विद्यार्थी बोलू लागले हे स्वागतार्ह’19jorvekar
मुलांचा सभाधीटपणा वाढला आहे. मुले बोलू लागली आहेत, आपले म्हणणे आत्मविश्वासाने मांडू लागली आहेत, हे महत्त्वाचे आहे. मात्र व्यक्त होताना एक चौकट असावी, भान राखले जावे. वक्तृत्व म्हणजे अभिनिवेषाने, आवाज वाढवून बोलले पाहिजे हे गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सलग बोलणे किंवा पल्लेदार वाक्य म्हणजे वक्तृत्व नाही. श्रोत्यांना खिळवून ठेवण्याचे कसब वक्तयामध्ये हवे. हे सर्व शिकण्याची ‘लोकसत्ता’ ने विद्यार्थ्यांना दिलेली संधी महत्त्वाची आहे.
जयंत जोर्वेकर

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी डॉ. उमराणीकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘महाविद्यालयांत अनेक शैक्षणिक उपक्रम होत असतात. मात्र विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी या स्पर्धेसारखे उपक्रम आवश्यक आहेत. आजूबाजूच्या घडामोडींचा अर्थ लावणे, त्यावर विचार करणे या सवयी विद्यार्थ्यांच्या अंगी बाणण्यासाठी ‘लोकसत्ता’ करत असलेले उपक्रम स्वागतार्ह आहेत. यातून तत्त्वप्रणालीचीही पडझड थांबेल.’’