महायुती सरकारचे खंदे समर्थक, निस्सीम भक्त व प्रबळ पाठीराखे म्हणून आमचे असे मत झाले आहे, की दीर्घकाळ रेंगाळलेल्या पालकमंत्रीपदाच्या वादामुळे सरकारची नाहक बदनामी होत आहे. आधी नाशिक व रायगड अशा दोन जिल्ह्यांत असलेला हा वाद आता चाणक्यांच्या दटावणीनंतर केवळ रायगडपुरता सीमित राहिलेला आहे. एरवी सरकारच्या विरोधात कुणी काहीही बोलले की त्यावर सर्वशक्तीनिशी तुटून पडायची सवय आम्हाला लागलेली आहे. मात्र या वादात युतीमधील दोन पक्षच एकमेकांवर चिखल उडवत असल्याने आम्हाला त्याकडे मूकदर्शक म्हणून बघावे लागते, जे वेदनादायी आहे. त्यामुळे आता आम्हीच पुढाकार घेत काही उपाय सुचवू इच्छितो.

१) गडचिरोलीप्रमाणे या जिल्ह्यातही सह किंवा उप-पालकमंत्री हे पद निर्माण करण्यात यावे. कुणी सह व कुणी उप व्हावे यावरून वाद निर्माण होत असेल तर सरळ सरळ दोन पालकमंत्री नेमावेत.

२) असे निदर्शनास आले आहे की ऐन झेंडावंदनाच्या आधीच या वादाला धार चढते. त्यामुळे केवळ या जिल्ह्यात एका अतिरिक्त झेंडावंदनाची प्रथा निर्माण करावी. त्यासाठी कुठल्याही महापुरुषाची जयंती निवडावी. म्हणजे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे व ही जयंती असे चार दिवस झेंडे फडकतील. त्यातील प्रत्येकी दोन ध्वजारोहण दोघांना समान न्याय तत्त्वानुसार वाटून द्यावे. हे वाटप ईश्वरचिठ्ठीने करावे.

३) या जबाबदारी विभाजनाला आदितीताई व भरतशेठ तयार नसतील तर दोघांनीही संयुक्तपणे (एकाने खालची गाठ सोडायची, दुसऱ्याने वरची मग तो फडकताना दोघांनीही दोरीला हात लावायचा) ध्वज फडकवावा. त्याची छायाचित्रे कुणावर अन्याय करणारी नसतील याची काळजी घ्यावी.

४) जिल्ह्यासाठी येणारा वार्षिक निधी सम प्रमाणात दोघांनाही वाटून देण्यात यावा. नियोजन समितीच्या बैठकीत दोघांसाठी समान उंचीच्या व दर्जाच्या खुर्च्या असतील याची काळजी घ्यावी.

५) जिल्हाधिकारी व त्यांच्या अधीनस्त प्रशासनाने दोघांचेही निर्देश ऐकताना कुणा एकावर अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. गरज पडली तर यासाठी नोकरशाहांना प्रशिक्षण देण्यात यावे.

६) सरकारी भूमिपूजन समारंभात दोन नारळ, दोन कुदळी ठेवण्यात याव्यात. हे पूजन करताना दोघांच्याही समर्थकांना किमान २० फूट दूर ठेवण्यात यावे, जेणेकरून काही अनर्थ घडणार नाही.

७) उद्घाटन कार्यक्रमात दोन रेशमी फिती, दोन कोनशिला व दोन पडदे लावण्यात यावेत, त्यामुळे कार्यक्रम निर्विघ्न पार पडण्यास मदत होईल.

८) कार्यक्रमात कुणी आधी व कुणी नंतर भाषण करायचे हे तो कार्यक्रम कोणाच्या मतदारसंघात आहे हे बघून निश्चित करावे.

९) एखादी आपत्ती आली तर दोघेही एकाचवेळी घटनास्थळी पोहचतील याची खबरदारी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी. मदतीचे धनादेश वाटताना ते सम प्रमाणात दोघांच्याही हस्ते वितरित करावेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१०) दोघांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या विकासाला गती देताना श्रेयवादाची लढाई कधीही लढणार नाही, असे हमीपत्र मुख्यमंत्र्यांनी दोघांकडून आधीच घ्यावे. तरीही वाद मिटत नसेल तर महायुतीने आम्हा सर्वांना यावर व्यक्त होण्याची तसेच तुटून पडण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून आमच्या ताकदीचा अंदाज या उभय पक्षांना येईल.