सत्तेचा माज चढल्यावर काही जणांचा तोल सुटतो याचे ताजे उदाहरण म्हणजे गोव्यातील भाजप सरकारमधील आरोग्यमंत्री विश्वजीत राणे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका रुग्णाला इंजेक्शन देण्यास डॉक्टरांनी नकार दिल्याची तक्रार राणे यांच्याकडे आली. लगेचच त्याची दखल घेत राणे महाशय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह लवाजामा घेऊन रुग्णालयात पोहोचले. माध्यम प्रतिनिधीबरोबर असल्याने व सारे चित्रीकरण होत असल्यानेच बहुधा राणे यांना अधिकच स्फुरण चढले असावे. ‘वैद्याकीय अधिकारी कुठे आहे, बोलवा त्याला’ असा दमच त्यांनी अन्य कर्मचाऱ्यांना दिला. संबंधित अधिकारी मंत्र्यांसमोर उपस्थित होताच राणे यांनी त्यांना ‘माझ्यासमोर खिशात हात घालून उभे राहायचे नाही, सरळ हात ठेवा. तोंडावरील मुखपट्टी काढा’, असे दरडावले. या वैद्यकीय अधिकाऱ्याला दमात घेत त्यांनी ‘या अधिकाऱ्याला लगेचच निलंबित करा’, असे फर्मान त्याच्या वरिष्ठांना सोडले. हा माझा आदेश आहे हे सांगण्यास ते विसरले नाहीत. वैद्यकीय अधिकारी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करू लागले असता त्यांना राणे यांनी बोलूही दिले नाही. या वैद्यकीय अधिकाऱ्याला लगेचच रुग्णालयाच्या बाहेर काढा, असाही आदेश दिला. वास्तविक ज्या रुग्णाला इंजेक्शन दिले नाही म्हणून आरोग्यमंत्री राणे यांनी सारा तमाशा केला त्या रुग्णाला अन्य विभागात इंजेक्शन देण्यात आले होते. सत्तेची हवा डोक्यात गेलेल्या राणे यांना डॉक्टरांची बाजू ऐकून घ्यावी, असेही काही वाटले नाही. आपण किती पराक्रम केला या थाटात राणे बाहेर पडले. थोड्याच वेळात राणे यांचे प्रताप समाजमाध्यमांमध्ये प्रसारित झाले. राणे यांच्या या वर्तनाबद्दल त्यांच्यावर टीकेची झोड उठू लागली. विशेष म्हणजे भाजपच्या समर्थकांनीच राणे यांना लक्ष्य केले.
विश्वजीत राणे हे गोव्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या प्रतापसिंह राणे यांचे चिरंजीव. प्रतापसिंह राणे हे संयमी, शांत, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व बेरजेच्या राजकारणावर भर देणारे मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध होते. गोव्यात कायमच राजकीय अस्थिरता व त्यातच मुख्यमंत्रीपदासाठी संगीत खुर्चीचा खेळ होत असतानाही राणे तब्बल १५ वर्षे मुख्यमंत्रीपदी होते. ते कोणत्याही खात्याच्या सचिवांवर वा सरकारी कर्मचाऱ्यांवर कधी जाहीरपणे कडाडले नाहीत. याउलट त्यांचे चिरंजीव विश्वजीत यांचे वर्तन. वडिलांच्या पुण्याईवर राजकारणात घोडे दमटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काँग्रेसने विधानसभेसाठी उमेदवारी नाकारल्यावर विश्वजीत अपक्ष म्हणून निवडून आले. पुढे काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेस सरकारमध्ये मंत्रीपदी असताना त्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली. २०१७ मध्ये निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्यावर सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू करण्याआधीच भाजपने संख्याबळ जमविले. वडील पक्षाचे ज्येष्ठ नेते असतानाही काँग्रेसवर तोंडसुख घेत विश्वजीत राणे भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यांनी भाजप सरकारमध्ये मंत्रीपद पटकावले.
भाजपमध्ये दाखल झाले तरी विश्वजीत राणे यांच्यातील मूळ ‘काँग्रेसी’ स्वभाव कायम राहिला. राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना विश्वजीत राणे यांच्या कथित ध्वनिफितीमुळे वाद निर्माण झाला होता. काँग्रेसने प्रसिद्धीस दिलेल्या या ध्वनिफितीत राफेल विमान खरेदीच्या फायली या तत्कालीन संरक्षणमंत्री व तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रकिर यांच्याकडे असल्याचे राणे यांच्या कथित संभाषणाने वाद निर्माण झाला होता. २०२२ मध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यावर विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग केले होते. त्यांच्या दबावामुळेच १० दिवस मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होऊ शकला नव्हता. अखेर भाजप नेतृत्वाने प्रमोद सावंत यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद कायम ठेवले. काँग्रेसप्रमाणे भाजपमध्ये बंड पुकारण्याची सोय नसल्यामुळे विश्वजीत राणे यांचा नाइलाज झाला.
आपल्यावर टीका होऊ लागताच राणे यांनी नरमाईची भाषा सुरू केली खरी, पण या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यास साफ नकार दिला. पण या प्रकरणाचे पडसाद उमटू लागताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या अधिकारात राणे यांनी केलेले संबंधित डॉक्टरचे निलंबन रद्द केले. राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. त्यामुळे आधी माफी मागण्यास नकार देणाऱ्या राणे यांनी त्यानंतर मात्र संबंधित डॉक्टरची सपलेश माफी मागितली. खरे तर माफीवर भागवण्यापेक्षा मुख्यमंत्री सावंत यांनी अशा आगाऊ मंत्र्याला थेट घरचा रस्ता दाखवायला हवा होता. डोक्यात सत्तेची हवा गेलेल्या देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील मंत्र्यांना यातून मिळायचा तो धडा मिळाला असता.