एक भांडं भरण्यासाठी त्या दोघींची अर्ध्या तासाची धडपड उघड्या डोळ्यांनी पाहिली तेव्हा पाण्याच्या थेंबाची किंमत या माणसांना कशी आणि किती चुकवावी लागते या कल्पनेने अंगावर काटा आला. जे पाणी निघालं ते अत्यंत गढूळ होतं, पण तेच त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी होतं.
उन्हाळा सुरू झाल्यानंतर अनेक भागांत पाण्यासाठी संघर्ष चाललेला असतो. आया- बायांचा बराच वेळ केवळ पाणी आणण्यात जातो. डोंगरमाथे तुडवत पाण्यासाठी पायपीट करावी लागते. कुठेतरी एखादा पाण्याचा स्त्रोत असतो, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि पुन्हा भरलेले पाण्याचे हंडे घेऊन घरी येण्यासाठी जे कष्ट उपसावे लागतात त्याचं वर्णन शब्दात नाही करता येणार. पाणी हे सृष्टीचं आदि तत्त्व. पाण्यावर किती लिहिलं, बोललं गेलंय. संतांनी पाण्याचं वर्णन अनेक परींनी केलेलं आहे. जगात सगळं काही असलं तरी पाणीच जर नसेल तर मग सगळंच अर्थहीन. रहीम यांचा दोहा आहे.
रहिमन पानी राखीए, बिन पानी सब सून
पानी गये न उबरे, माती, माणूष, चून
कबीरांनी माणसाच्या जीवनाचं क्षणभंगुर असणं सांगताना ‘पानी केरा बुदबुदा’ असं म्हटलं आहे. मानवी जीवन पाण्याचा बुडबुडा आहे पण हे जीवनसुद्धा एखाद्या मातीच्या कुंभासारखं आहे.
जल में कुंभ, कुंभ में जल है,
बाहर भीतर पानी
फुटा कुंभ जल जलहि समाना
यह तथ्य कहयो ग्यानी
कुंभाच्या आत पाणी आहे, बाहेरही पाणी आहे. हा कुंभ फुटल्यानंतर बाहेरचं आणि आतलं पाणी एक होतं. कुंभाच्या आतल्या पाण्याचा विलय होतो. इथं कुंभ हा मानवी शरीराचं प्रतीक आहे… तर असं हे पाणी अनेक प्रतिमांमधून आपण वाचलेलं असतं. पाण्याची अनेक रूपे शब्दात, चित्रात, गाण्यात व्यक्त झालीत पण सृष्टीतल्या जीवांची तहान भागवण्याचं जे पाण्याचं स्थान आहे ते सर्वात श्रेष्ठ आहे.
राजस्थानातल्या एका लोकगीतात नवविवाहित सुनेला पाण्याचा थेंब थेंब वाचवण्याची शिकवण दिलेली आहे. बाई तू जपून चाल. पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान आहे. जर हातातून तूप सांडलं तर काही बिघडणार नाही, कोणताच अनर्थ होणार नाही पण पाण्याचा एक थेंब जरी सांडला तरी मोठं अरिष्ट घडेल.
धीरे चाल पणीहारी ल्हेंगो गरद भरै
घीय ढूलै तो म्हारो कच्छू नही बिगडे
पाणीडो ढूलै तो म्हारो जीवडो जलै
धीरे चाल पणीहारी ल्हेंगो गरद भरै
बाईचा आणि पाण्याचा जवळचा संबंध आहे. खेड्यापाड्यात, दुर्गम आदिवासी भागात, वाडी- वस्ती- तांड्यावर आजही पाण्यासाठी वणवणत असलेली जी दृश्यं उन्हाळ्यात दिसतात त्यात बायका, पोरीच अधिक आढळतात. दररोजच्या कष्टाच्या कामाशिवाय पाणी आणणं हे आणखी एक वाढीव काम उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना करावं लागतं. अक्षरश: अंत पाहणारी ही गोष्ट आहे. पाण्याच्या शोधात बाया रानोमाळ भटकतात. घरची लहान लेकरं याकामी जुंपली जातात. कुठेतरी पाण्याचा ठावठिकाणा दिसतो. तिथं मग ओंजळीनं पाणी भरत राहावं लागतं. या दिवसात अनेक ठिकाणी खोलवर विहिरीत उतरून पाणी भरतानाची बायांची चित्र वर्तमानपत्रात झळकतात. पाण्याच्या थेंबा- थेंबासाठी तरसणारं हे एक वेगळं जग आहे.
‘ठाकूर का कुंवा’ या नावाची प्रेमचंद यांची एक कथा आहे. जोखू आणि गंगी हे एक कष्टकरी जोडपं. जोखू काही दिवसांपासून आजारी आहे. त्याच्या घशाला कोरड पडलेली. पाण्याचा तांब्या तोंडाला लावतो पण प्रचंड अशी दुर्गंधी येऊ लागते. ‘हे पाणी माझ्यानं पिणं शक्यच नाही. एवढं सडलेलं पाणी ?’ तो आपल्या बायकोला म्हणतो. गंगी विचार करते. काल तर या पाण्याला दुर्गंध नव्हता मग आजच एवढा घाण वास का येतोय. नक्कीच विहिरीत एखादं जनावर मरून पडलं असावं. घसा ओला करण्यासाठी दुसरं पाणी नाही. जोखू म्हणतो, ‘इकडं आण. तेच पाणी नाक बंद करून घोटभर तरी पितो.’ गंगीला वाटतं हे पाणी पिऊ नये, आजार आणखी वाढेल. मग स्वच्छ पाणी आणायचं तरी कुठून ? गावातल्या ठाकूरच्या वाड्यासमोर एक विहीर आहे पण तिथलं पाणी घ्यायला खालच्या जातीतल्यांना परवानगी नाही. अख्खा गाव इथल्या विहिरीवर पाणी भरतो, आपल्याला मात्र तिथे पाणी भरता येत नाही याची सल गंगीला आहे.
रात्रीचे नऊ वाजलेले असतात. सगळीकडे अंधार पसरलेला असतो. ती विहिरीवर येते. ठाकूरच्या वाड्यासमोर बसलेले चार- दोन लोकही उठून गेलेले असतात. या अंधारात गंगीचे मन आतल्या आत बंड करत असते. आम्हीच का नीच आहोत आणि हे लोक का उच्च आहेत. यांनी चोऱ्यामाऱ्या करायच्या, दादागिरी करायची, गोरगरिबांचं जगणं हराम करायचं आणि हे म्हणे उच्च! तेवढ्यात तिला चाहूल लागते. ती सावध होते. गावातल्याच दोन स्त्रिया विहिरीवर पाणी भरण्यासाठी येत असतात. गंगी अंधारात लपून बसते. दोघी पाण्याची भांडी भरून निघून जातात. गंगी घनदाट अंधारातून जरा बाहेर येते. ठाकूरच्या वाड्याचा दरवाजाही बंद झालेला असतो. अमृत चोरून आणणारा राजकुमारही एवढी जोखीम बाळगणार नाही तेवढी सावधगिरी तिनं बाळगलेली असते. दबक्या पावलाने ती विहिरीच्या उंचवट्यावर चढते. क्षणिक आत्मविश्वासाने चढताना विजयाचा असा अनुभव तिला याआधी कधी आलेला नव्हता. बाजूला पडलेल्या दोरखंडाचा फास तिने घागरीच्या गळ्याला अडकवला. घागर विहिरीत सोडली. चौकस नजरेने तिने आजूबाजूला पाहिलं. आता या वेळी जर ती पकडली गेली तर माफीचा किंवा सुटकेचा कोणताच मार्ग शिल्लक उरलेला नव्हता. दोन- चार वेळा हात मारल्यानंतर घागर भरली. सरसर ती पाणी शेंदू लागली. भरलेली घागर विहिरीच्या तोंडाजवळ आली. झेपावल्यासारखं ती घागर स्वत:च्या दिशेने ओढणार एवढ्यात वाड्याचा बलदंड दरवाजा उघडला. त्याच वेळी गंगीच्या हाती असलेला दोर सुटला. क्षणात पाण्याने भरलेली घागर दोरखंडासह विहिरीत धडाम् आवाज करत कोसळली. काही क्षण पाणी हिंदकळत राहिलं. कोण आहे, कोण आहे असा आवाज करत ठाकूर विहिरीच्या दिशेने येत होता आणि गंगी अंधाराला चिरत घराकडे धावत होती. घरी परतल्यानंतर तिने पाहिलं, जोखू तोंडाला तांब्या लावून तेच घाण पाणी पीत होता.
२०१९ या वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झालेला होता. बहुतांश जलसाठे आटले होते, गुरांसाठी छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या, पाण्याचं दुर्भिक्ष ग्रामीण भागात प्रचंड होतं. या दुष्काळाची पाहणी करताना कोरलेलं एक दृश्य मनातून जाता जात नाही. यवतमाळ जिल्ह्यातलं सावरगाव बंगला हे गाव. गावाबाहेर असलेली एक कोरडी विहीर. सकाळी दहा हजार लिटर पाणी असणारा एक टँकर दररोज या विहिरीत रिचवला जातो. त्यानंतर गावकरी पाणी शेंदून काढतात. तळाशी असलेलं पाणी शेंदताही येत नाही अशा विहिरीतून पाणी काढण्यासाठी दोन बहिणींची धडपड. एक खोलवर विहिरीत उतरली आहे आणि दुसरीच्या हाती एक दोरी पाणी शेंदण्यासाठी. खाली उतरलेली बहीण एक प्लास्टिकचा डबा आपल्या हाताच्या ओंजळीने भरते. वर असलेली लहान बहीण तो डबा शेंदते. दगडाच्या कपारीला अनेक ठिकाणी ठेचकाळत तो डबा वर येतो तेव्हा अर्ध्याहून अधिक पाणी सांडून जातं. एक भांडं भरण्यासाठी त्या दोघींची अर्ध्या तासाची धडपड जेव्हा उघड्या डोळ्यांनी पाहिली तेव्हा पाण्याच्या थेंबाची किंमत या माणसांना कशी आणि किती चुकवावी लागते या कल्पनेने अंगावर काटा आला. जे पाणी निघालं ते अत्यंत गढूळ पण हेच त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी होतं. दोन ठिकाणांहून पाणी आणावं लागतं अन् अर्धा दिवस त्यातच जातो अशी माहिती त्यांनी दिली… जी बहीण विहिरीत खोलवर उतरलेली होती ती दगडी कपारीला धरून सरसर वर येते. इथलं पाणी भरल्यानंतर त्यांना गावाच्या दुसऱ्या बाजूला असलेला डोंगर उतरून पुन्हा आणखी पाणी आणायचंय. विहिरीतून वर आलेल्या या मोठ्या बहिणीला तिचं नाव विचारलं तेव्हा (कदाचित काव्यगत वाटेल… पण) तिनं नाव सांगितलं होतं वर्षा… ‘वर्षा लखन जाधव’… ‘वर्षा’ या शब्दाचा अर्थ तिला माहीत असण्याची शक्यता कमीच होती. आणि प्रेमचंद यांच्या ‘ठाकूर का कुंवा’ या कथेतल्या बाईचं नाव होतं गंगी… जे ‘गंगा’ या नावावरूनच आलं असणार.
aasaramlomte @gmail.com
लेखक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आहेत.