शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत असताना काही वर्षांपूर्वी एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये शहराला भेडसाविणारी प्रमुख समस्या कोणती, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सहाजिकच वाहतूक कोंडी आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक सुविधेचा अभाव, असेच उत्तर पुढे आले. त्यानंतर अलीकडच्या पाच ते दहा वर्षांत पीएमपी सक्षमीकरणासंदर्भात सातत्याने चर्चा झाली आणि होत आहे. प्रत्यक्षात पीएमपीचे सक्षमीकरण कागदावरच राहिले आहे. पीएमपीमधील अधिकारी आणि राज्यकर्त्यांमध्ये पीएमपी ‘आपली’ आहे, ही मानसिकता निर्माण होत नाही तोपर्यंत पीएमपीची रडकथा कायम राहणार आहे.

कोणत्याही शहरातील सार्वजनिक वाहतूक यंत्रणा नेहमी तोट्यात असते, हे वास्तव आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आणि पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील बारा लाखांपेक्षा जास्त प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी सतरा वर्षांपूर्वी या दोन्ही महापालिकेतील परिवहन उपक्रमांचे एकत्रीकरण करून पीएमपी ही स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात आली. मेट्रो, पीएमपी, उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग, बीआरटी हे सार्वजनिक वाहतुकीचे प्रमुख घटक आहेत. मात्र गाड्या खरेदीतील दफ्तर दिरंगाई, निविदा प्रक्रियेतील अनियमितता आणि गैरव्यवहार, थांब्यांची दुरवस्था, अरेरावीपणा आणि अनास्था अशा अनेक गोष्टी पीएमपीच्या रडकथेला हातभार लावत आहेत. पीएमपीच्या सुधारणेचा विषय निघाला की, आर्थिक तुटीचे कारण आपसूक पुढे येते. तो तोटाही महापालिकांकडून भरून काढला जातो. पण कामगिरीत सुधारणाच दिसत नाही.

हेही वाचा : लोकमानस: स्वत:चेच हसे करून घेणाऱ्या संस्था

हीच अवस्था बीआरटीची. देशातील पहिला बीआरटी मार्ग प्रायोगिक तत्त्वावर पुण्यात सुरू करण्यात आला. पण बीआरटी मार्ग कुठे आहे, असा प्रश्न विचारण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. बीआरटी मार्गात सुधारणेच्या नावाखाली असंख्य बदल आणि प्रयोग करण्यात आले. पण ते उपयुक्त ठरलेच नाहीत. उलट, बीआरटी मार्गांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण देत बीआरटी मार्गावरच हातोडा टाकण्याचे काम महापालिका प्रशासन, माजी नगरसेवक आणि पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी मिळून केले आहे. त्यामुळे बीआरटी सध्या मृत्युशय्येवर आहे.

हेही वाचा : पहिली बाजू : भारतीय न्याय संहिता ही काळाची गरज!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सार्वजनिक वाहतूक सुविधांच्या सक्षमीकरणाच्या निव्वळ गप्पा किंवा कागदोपत्री आराखडे करून चालणार नाही, त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी लागेल, याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे बैठका, प्रस्ताव यातच सुधारणा अडकली आहे. मेट्रो, बीआरटी, पीएमपी या आणि अन्य सार्वजनिक वाहतूक सेवांची सांगड मेट्रोबरोबर घालावी लागणार आहे, तरच शाश्वत वाहतूक व्यवस्था शहरात निर्माण होईल. प्रवाशांना पायाभूत सुविधा देणे, खासगी आणि सार्वनजिक वाहतूक सेवांमध्ये समन्वय साधल्यास पुण्यातील प्रवास सुखकर होणार आहे. भविष्यात याच गोष्टीला प्राधान्य द्यावे लागणार आहे. अन्यथा एका बाजूला मेट्रो मार्गिकांचे जाळे विस्तारत असताना दुसऱ्या बाजूला बीआरटी आणि पीएमपी मरणासन्न अवस्थेत पाहावी लागले. त्यामुळे आता अचूक नियोजन करण्याची वेळ आली आहे.