सातत्याने लोकांमध्ये राहून त्यांच्या प्रश्नांसाठी कायमच प्रस्थापित नेते आणि प्रस्थापित व्यवस्थेशी झगडणारा नेता अशी बबनराव ढाकणे यांची ओळख. ती विविध आंदोलने, चळवळींतून निर्माण झालेली. प्रश्न त्यांच्या पाथर्डी तालुक्यातील असो, राज्यातील किंवा देशाचा, बबनरावांनी कायमच आक्रमकता दाखवली. नगर जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांचे व त्यांचे फारसे सूत कधी जुळले नाही. जिल्ह्यातील सग्यासोयऱ्यांना धरून चालणाऱ्या प्रस्थापितांच्या राजकारणावर ते नेहमीच सडकून टीका करत. मात्र बबनरावांची कारकीर्द कायमच प्रस्थापितांना दखल घ्यायला लावणारी ठरली. चार वेळा आमदार, राज्यातील विविध खात्यांची मंत्रीपदे, विधानसभेचे उपाध्यक्षपद, विरोधी पक्षनेतेपद, एकदा खासदार त्याच वेळी केंद्रीय राज्यमंत्रीपद अशी विविध पदे भूषवूनही बबनरावांचे पाय कायमच जमिनीवर राहिले. त्यांची खरी ओळख होती ती ‘ऊसतोडणी मजुरांचा नेता’ अशीच. नागनाथआण्णा नाईकवाडी यांच्या साथीने त्यांनी ऊसतोडणी मजुरांचे संघटन राज्यात प्रथम सुरू केले. साखर संघाशी त्यांच्या मजुरीचा करार, मजुरीची वाढ यासाठी त्यांनी १९७० मध्ये पहिला संप घडून आणला. विधानसभेतही त्यांनी ऊसतोडणी मजुरांच्या साखर कारखान्यातील वेठबिगारीच्या चर्चा घडवून आणण्यासाठी अशासकीय विधेयक मांडले होते.

परंतु सरकारने नामुष्की टाळण्यासाठी आश्वासन दिले. पुढे ऊसतोडणी मजुरांच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना असावा या उद्देशाने केदारेश्वर कारखान्याची स्थापनाही केली. दुष्काळाचा प्रश्नही त्यांनी हिरिरीने हाती घेतला. पाथर्डीत त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यामुळे यावे लागले. बबनराव त्या वेळी पंचायत समितीचे सभापती होते. तेही अपक्ष म्हणून निवडून आलेले. मुळा धरण आठमाही करण्याची मागणी असो की वांबोरी चारीचे पाणी बंद पाइपलाइनमधून दुष्काळी भागाला मिळण्याचा प्रश्न. त्यांच्या आंदोलनांनी राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडले. तेव्हा हजारो शेतकरी-आंदोलकांना ठेवण्यासाठी तुरुंगही अपुरे पडले होते. सुरुवातीला अपक्ष, नंतर काँग्रेस, जनता पक्ष, जनता दल मग पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास घडला. या सर्व काळात त्यांचे सूर अधिक जुळले ते वसंतराव नाईक आणि शरद पवार यांच्याशी. पुरोगामी विचारांची मांडणी करण्यासाठी १९६९ मध्ये त्यांनी मुस्लिमांच्या पुढाकारातून सामूहिक सत्यनारायण पूजा घडवल्या. शिक्षण आठवीपर्यंत झाले असले तरी सुशिक्षित बेरोजगारांचे मोर्चे, डीएड तरुणांची परिषद, सुशिक्षित बेरोजगारांसाठी भत्ता अशा प्रश्नांसाठी त्यांनी मोर्चे काढले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर काही काळ ‘शेतकरी विचार दल’ नावाचा स्वतंत्र पक्षही स्थापन करून जिल्ह्यात प्रस्थापितांना आव्हान देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अखेर २००४ पासून ते राजकारणापासून अलिप्त झाले. त्यानंतरही त्यांचे सेवाभावी कार्य सुरूच राहिले. त्यांच्या निधनाने सामान्यांसाठी संघर्ष करणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.