व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा देऊन शिक्षिका झालेली एक दलित महिला कालांतराने मुख्याध्यापक होतेच, पण शिक्षणाधिकारी पदावरून निवृत्त होते. या महिलेची जीवनकहाणी ‘यशोगाथा’ ठरेल का? तिची कहाणी जर तिने स्वत:च सांगितली, तर वरवर पाहता यशाचाच वाटणाऱ्या मार्गावरील तिच्या वाटचालीतील संघर्षही उलगडेल का?  या दोन्ही प्रश्नांची उत्तरे, ‘पहिल्या महिला दलित आत्मचरित्रकार’ म्हणून सार्थ उल्लेख होणाऱ्या शांताबाई कांबळे यांच्या ‘माज्या जल्माची चित्तरकथा’ या आत्मचरित्रातून मिळतात. हे निकोपपणे, हकिगत सांगितल्यासारखे अथपासून आजवरचा दीर्घ प्रवास मांडणारे आत्मचरित्र, म्हणून तत्कालीन समीक्षक स. शि. भावे त्याला ‘अभिजात’ म्हणाले होते. पण काही वाङ्मयीन निकषांवर अभिजात ठरणाऱ्या आत्मकथेत जीवनदर्शन आणि समाजदर्शनही आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी मराठीत समीक्षकांची नवी पिढी यावी लागली. मधल्या काळात ‘एम. फिल.’साठी काही सरधोपट विद्यापीठीय अभ्यासही या आत्मचरित्रावर झाले.

या आत्मकथेवर आधारित चित्रवाणी मालिकाही आली आणि मूळ मराठी पुस्तकाचे अनुवाद हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत झाले. हे सारे शांतपणे पाहात, शांताबाई कांबळे या आत्मचरित्राच्या प्रकाशनानंतरही ३५ वर्षांहून अधिक काळ जगल्या. गेल्या बुधवारी त्यांची निधनवार्ता आली. विद्रोही आत्मचरित्राची वाट मलिका अमरशेख यांच्या ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ (१९८४)ने रुंदावल्यानंतर आणि दलित स्त्रीजीवनाचे चित्रण करणारे ‘जिणं आमुचं’ हे बेबीताई कांबळे यांचे पुस्तक (१९८६) आले त्याच वर्षी ‘माज्या जल्माची चित्तरकथा’ पुस्तकरूपाने प्रकाशित झाले खरे, पण त्याहीआधी- १९८२ मध्ये दिनकर साक्रीकरांच्या ‘पूर्वा’ या नियतकालिकात ते अंशाअंशाने प्रकाशित झाले होते. मध्येच रविराज बेहेरे, ग. वा. बेहेरे यांच्या कुठल्याशा ‘अद्भुत कादंबरी’ या अंकातही हेच आत्मचरित्र लेखिकेच्या पूर्वपरवानगीविना छापून आले, पण त्यानंतर मात्र साक्रीकरांच्या ‘पूर्वा प्रकाशन’नेच ते काढले. शिक्षकी पेशातला नवरा दुसरे लग्न करतो,  तेव्हा ‘आता मी काय येत नाय! तिला घेऊन जावा आणि खुशाल राज्य करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता माझी आशा सोडाच’ असे नवऱ्याला निक्षून सांगणारी ही पहिली पत्नी. पण दुसऱ्या पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे पहिल्या संसारात परत येतो आणि पुन्हा घर एकसंध होते, तेव्हा तिची क्षमाशीलता दिसते की सामाजिक बंधने दिसतात? शांताबाईंनी पुस्तकात त्याबद्दल संयतपणेच लिहिले असले तरी त्यांची मानसिक स्थिती वाचकापर्यंत पोहोचते. पहिले मूल (मुलगा) निपचित जन्मल्यानंतर लगोलग शेतीच्या कामासाठी जावे लागण्यासारखे प्रसंगही तत्कालीन ग्रामीण जीवनात मुकाटय़ाने सहनच करावे लागत, त्यापेक्षा शांताबाई निराळय़ा वागल्या नाहीत. मात्र घरच्या चाकोरीत राहातानाच शिक्षिकेच्या नोकरीमुळे त्यांच्यासमोर काही पायऱ्या खुल्या झाल्या. मूळचा निव्र्याजपणा, कुतूहल व शिकण्याची ओढ तसेच विचारांतील स्पष्टपणा या गुणांमुळे त्यांचे जगणे सुसह्य, सकारात्मक झाले. हेच गुण त्यांच्या लेखनातही दिसून येतात. कवी प्रा. अरुण कांबळे हे त्यांच्या चार अपत्यांपैकी एक, पण आईकडे स्वतंत्रपणे लेखनगुण होते आणि चिकाटीदेखील, याबद्दल प्रा. कांबळे यांनीच या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे.