– गौरी मांजरेकर
यूट्युबर्सच्या माध्यमातून हेरगिरीचे प्रकरण चर्चेत असताना समाजमाध्यमांचं आर्थिक गणित, त्यामागची मानसिकता, त्याचा आपल्या समाजमानावर पडणारा प्रभाव जाणून घेणं गरजेचं ठरतं. यूट्युब, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, टिकटॉक इत्यादी समाजमाध्यमांचा उद्देश सुरुवातीला केवळ माहिती इतरांपर्यंत पोहोचवणं एवढाच होता. २०१४ च्या सुमारास भारतीयांत मोफत इंटरनेट वापराची सवय रुजवली गेली. यूट्युब, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, टिकटॉक या माध्यमांचा एवढा प्रसार झाला की त्यातून आशयनिर्मिती करणाऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली. टिकटॉकच्या यूजर्सचा आकडा प्रचंड वाढला असताना भारताने या चिनी अॅपवर बंदी आणली. पुढे २०२०मध्ये करोनामुळे टाळेबंदी जाहीर झाली आणि लोक घरात अडकले. ई-लर्निंग घराघरांत पोहोचलं आणि यूट्युब हा आबालवृद्धांचा टाइमपास ठरला. अनेक तरुणांनी याच काळात आपलं यूट्युब चॅनेल आणि इन्स्टाग्राम हॅण्डल सुरू केलं. यूट्यूब वापरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आणि समाजमाध्यमांमध्ये सर्वांत प्रसिद्ध माध्यम म्हणून यूट्युबचं नाव झालं. यूट्युबच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाली आणि यूट्युबनेदेखील व्ह्यूजच्या आणि सब-स्क्राइबर्सच्या संख्येआधारे पैसे देण्यास सुरुवात केली. यूट्युबमुळे अनेक व्लॉगर्सचं आयुष्य, राहणीमान बदलून गेलं. ‘टेक्निकल गुरुजी’ नावाचं चॅनेल चालवणाऱ्या गौरव चौधरीचं मासिक उत्पन्न १ कोटी आहे आणि त्याचे चार कोटी ५० लाख सबस्क्राइबर्स आहेत. मोटिव्हेशनल वक्ते संदीप माहेश्वरी यांचे सबस्क्राइबर्स दोन कोटी आठ लाख आहेत व मासिक उत्पन्न ३० ते ५० लाख रुपये आहे. हे उत्पन्न केवळ सबस्क्राइबर्सच्या संख्येवर ठरत नाही तर ते व्हिडीओ कोणी पाहिले, किती काळ पाहिले, ते एखाद्या खास विषयावरील होते का, यावर ठरवलं जातं. ‘ट्रेण्डिंग’ कीवर्ड भोवती आपला व्हिडीओ किंवा रील कन्टेन्ट कसा फिरवायचा याचं गणित या तरुणाईला उमगलं आहे. काहींनी तर ‘इमेज कन्सल्टन्ट’ सारख्या व्यावसायिक लोकांची मदत घेऊन ‘प्रेझेंटेशन स्किल्स’ शिकून घेतली आहेत. त्याचा वापर लोकांना मूर्ख बनविण्यासाठी कसा केला जातो, हे काही उदाहरणांवरून समजून घेऊ या.
अस्मिता पटेलने शेअर बाजारासंबंधीचे कोर्सेस यूट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सुरू करून १०४ कोटी रुपये मिळवले. स्वत:ची व्यावसायिक म्हणून प्रतिमा निर्माण करण्यासाठी तिच्या यूट्यूबवरील ‘टॉक शो’मध्ये तिने बॉलीवूड तारकांना बोलवलं. तिच्या अनेक विद्यार्थ्यांना कोर्समधून काहीच लाभ झाला नाही. पुष्कळ विद्यार्थ्यांनी कर्ज घेऊन २० ते २५ लाखांची फी तिच्याकडे जमा केली. काही विद्यार्थ्यांनी तिची पोलिसांत तक्रार केली तर काहींनी सेबीकडे तक्रार केली. सेबीने चौकशी केली तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलं.
अस्मिता पटेलच्या कोर्सची टॅगलाइन होती, ‘रोज ५० हजार कमवा व राजासारखं आयुष्य जगा.’ ती ऑनलाइन दाखवत असलेला आत्मविश्वास नेटिझन्सना भुरळ पाडणारा ठरला. तिच्या म्हणण्यानुसार तिला तिच्या विद्यार्थ्यांची बचत आणि दिवसाला केवळ १५ मिनिटे हवी होती. ज्यांची कोर्सची फी भरण्याची क्षमता नसेल त्यांना ती कर्ज घेण्यास प्रवृत्त करत असे. काहींनी तिच्या स्टॉक कोर्सपायी स्वत:ची नोकरी सोडली तर काहींनी कष्टाने जमा केलेले पैसे भरले. ‘ईझी मनी’ किंवा वर्षभरात करोडपती होण्याचं गाजर दाखविल्यावर अनेकजण तिच्या जाळ्यात सहज फसले.
हेही वाचा
अस्मितासारख्या फिन-इन्फ्लुएन्सरना नियमावलीअंतर्गत आणण्याचा निर्णय सेबीने फेब्रुवारी, २०२५ मध्ये जाहीर केला. आता त्या सर्वांना सेबीकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. तसंच त्यांची बँक खाती व फोन नंबर यांची सेबीकडून पडताळणी केली जाणार आहे. व्हॉट्सअॅप व टेलिग्रामच्या चॅनेलच्या माध्यमातून व्यक्तींवर प्रभाव टाकून त्यांना आपल्या फसव्या योजनांमध्ये सहभागी करून घेणाऱ्या फिन-इन्फ्लुएन्सरना या निर्णयाने वचक बसणार आहे.
‘एमबीए चायवाला’, ‘बीटेक पाणीपुरीवाली’, ‘एलएलबी चायवाला’… असे कितीतरी व्हर्च्युअल स्टार्ट-अप आले. त्यांनी स्थानिक उत्पादनांना ‘प्रीमियम उत्पादने’ म्हणून विकण्याचा प्रयत्न केला. यूट्युबवरील तथाकथित इन्फ्लुएन्सरच्या मदतीनं स्वत:ची प्रभावी छबी निर्माण केली. त्यांच्या स्टार्ट-अपमध्ये गुंतविण्यासाठी उत्सुक व्यक्तींना पाच लाख ते ३० लाख जमा करण्यास सांगितले. ‘एमबीए चायवाला’ किंवा प्रफुल्ल बिलोरे यांनी चहाची टपरी सुरू करून एमबीए ही पदवी नावापुढे लावून स्वत: एमबीए असल्याची छबी लोकांच्या मनात निर्माण केली. खरे तर प्रफुल्लने एमबीए पूर्ण केलेलं नाही. त्याला स्वत:चा धंदा सुरू करायचा होता, चहाची टपरी त्याला सोयीस्कर पर्याय वाटला. त्यासाठी त्याने मॅक्डोनाल्ड्समध्ये पार्ट टाइम जॉब करून कौशल्य अवगत केली. आपल्या चहाच्या टपरीची फ्रन्चायझी भारतभर विकून स्वत: कोट्यधीश होण्याची त्याची योजना होती. त्याची फ्रन्चायझी भारतभर विकत घेतली गेली, परंतु त्याचा फायदा फ्रन्चायझी चालविणाऱ्यांना मिळालाच नाही. आपलं गुंतवलेले मुद्दल बुडालं असं जेव्हा फ्रन्चायझी मालकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी एमबीए चायवालाविरोधात पोलिसात तक्रार केली.
तिसरं उदाहरण प्रसिद्ध यूट्यूबर इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहाबादियाचं आहे. काही महिन्यांपूर्वी समय रैनाच्या ‘वाह्यात’ शोमध्ये भारतीय संस्कारांच्या विरोधात वाह्यात प्रतिक्रिया दिली म्हणून तो चर्चेत आला होता. टाळेबंदीच्या काळात आपले व्हिडीओ ‘सनातन हिंदू’ या की-वर्ड भोवती फिरवत हिंदू धर्माच्या विविध पैलूंचा परामर्श त्याने घेतला होता. त्यात बुवा, बाबांसारख्या व्यक्तींना सामील करून घेतलं आणि आपण सनातनी हिंदू असल्याचं तरुणाईवर बिंबविण्याचा प्रयत्न केला. राजकारणातील दिग्गजांना तसंच समाजातील उच्चभ्रू विचारवंतांना आपल्या कार्यक्रमात सहभागी करून स्वत:चं सामाजिक व राजकीय वलय निर्माण केलं. त्याला इन्फ्लुएन्सर का म्हणावं हे जनतेनं ठरवावं असं मला वाटतं. रणवीर अलाहाबादियाचे सबस्क्राइबर्स ७० लाखांच्या घरात आहेत.
सल्लागार, स्तंभलेखक सुहेल शेठ यांनी भारतातील एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आवर्जून सांगितलं की, ‘८० टक्के यूट्यूबर्स हे इन्फ्लुएन्सर म्हणण्याच्या योग्यतेचे नाहीत. पुष्कळ जण पैसे आणि फ्रीबीजच्या (भेटवस्तू) मागे एवढे वेडे असतात की त्यांना व्यावसायिक मूल्यांचा विसर पडतो. हे लोक राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करतात. त्यांच्या या संबंधामुळे संवेदनशील आणि प्रतिबंधित माहितीही त्यांना मिळते’
माझं स्वत:चं समाजमाध्यमी इन्फ्लुएन्सर्सबाबत असं निरीक्षण आहे की, अनेकजण व्हिडीओ कन्टेन्टच्या नादात स्वत:चा व्यवसाय किंवा नोकरी सोडून देतात. अनेक जण मार्केटिंग स्किलचा वापर करून लोकांना टोपी घालण्याचं काम करतात. आपली दर्दभरी कथा मांडून सहानुभूती संपादन करायची, नंतर आपलं उत्पादन विकण्याचा प्रयत्न करायचा. काही यूट्यूबर प्रामाणिक व्यवसाय करतात, पण बहुतांश आपल्या संकेतस्थळाचा खोटा अॅड्रेस देऊन किंवा कॅमेरासमोर एक स्टोरी आणि कॅमेरामागे वेगळी कथा असा खोटेपणा करतात. पैसे लुबाडण्याचा प्रयत्न केल्याच्या हजारोंनी तक्रारी सायबर क्राइम विभागाकडे येत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘विभाग नेहमीच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, पण जनता सुशिक्षित असूनही अशा भूलथापांना बळी पडते.’
काही यूट्यूबर्स आपण शिक्षण अर्धवट सोडून कसे वर्षातून दोनदा परदेश वाऱ्या करतो, तसंच आपलं जीवनमान कसं ‘ब्रँडेड’ गोष्टींनी व्यापलं आहे हे तरुणाईच्या मनावर ठसवत असतात. काही वेळा सौंदर्य किंवा प्रसाधनविषयक आशय आणि पॉर्न यामधील रेषाही अस्पष्ट झाल्याचे दिसते. अशांचे सबस्क्राइबर्स लाखांच्या घरात असतात त्यांच्या कमाईचा अंदाज लावणं कठीण असतं. ते नेहमीच पेड प्रमोशन करताना दिसतात. आपली मनमौजी जीवनशैली आजच्या तरुणाईसमोर आदर्श म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करतात.
यूट्युब, फेसबुक किंवा इन्स्टाग्राम यांचे अल्गोरिथम कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्याने त्यांची ‘युजर सेन्सिटिव्हिटी’ तीव्र असते. तुमचे डोळे कुठल्या कन्टेन्टवर नजर टिकवून आहेत हे या अॅप्सना लगेच कळतं आणि ते त्याच विषयीचे व्हिडीओ किंवा रील तुमच्यासमोर आणून ठेवतात. अर्थात स्क्रोलिंग करण्याची सवय असणाऱ्या यूजर्सना यात आपला वेळ कसा निघून जातो हे कळतही नाही. स्क्रोलिंग करताना ‘डोपॅमिन’ स्रावले तर तो आशय पाहणाऱ्याच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम होतो. परंतु व्हिडीओ बघून त्याच्या मनात नैराश्य किंवा मानसिक ताण निर्माण झाला तर त्याला स्क्रोलिंगचा नकारात्मक प्रभाव मानता येईल.
अनेकदा लहान किंवा पौगंडावस्थेतील मुले गेमिंगचे व्हिडीओ बघून गेममध्ये जिंकायचे म्हणून नकळत मानसिक तणावाखाली येतात. त्यांची अधिक चिडचिड होते किंवा हट्टी होतात. अशा गेम्सपासून मुलांना दूर ठेवता आलं तर त्यांचं मानसिक आरोग्य नीट राहील. अॅप्स ही संपर्काची साधनं आहेत त्यांना साधन म्हणूनच वापरण्याचा नियम घराघरांतून पाळला गेला तर कुटुंबात निर्माण होणाऱ्या विसंवादावर तोडगा निघू शकेल. या अॅप्सचा वापर नवीन संकल्पना किंवा कौशल्यं अवगत करण्यासाठी कसा करता येईल, हे पालकांनी स्वत:च्या उदाहरणाद्वारे मुलांसमोर मांडावं. तसंच जर स्वत:कडे काही विशेष ज्ञान किंवा कौशल्य असेल तर या समाजमाध्यमांचा वापर करून ते शेअर केलं तर दुर्लक्षित घटकांना त्याचा फायदा मिळू शकेल.
गूगलचे ‘मार्च कोअर अपडेट २०२५’ ‘री-रँकिंग ऑफ वेबसाइट्स’ या कीवर्डवर आधारित नसून यूजरच्या ‘इन्टेन्ट’ म्हणजेच हेतूवर आधारित आहेत. यूजरच्या दृष्टिकोनातून हे अपडेटेड अल्गोरिदम काम करेल, त्यामुळे कन्टेन्ट क्रिएटरचा कीवर्डवरचा फोकस बदलून अर्थपूर्ण आशय निर्माण झालेला पाहायला मिळेल अशी आशा २०२५ मध्ये करण्यास हरकत नाही. तोवर समाजमाध्यमांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात, हे पक्कं लक्षात ठेवावं लागेल.
gourimanjrekar69@gmail.com