राहुल गांधींवरील टीका रास्त ठरावी असे त्यांचे राजकीय प्रमाद अनेक असताना, अमेरिकेत शिखांची माफी मागावी लागल्याबद्दल झोड उठवणे बरे नाही…
शीख फुटिरतावाद, त्यातून निर्माण झालेली स्वतंत्र खलिस्तानची चळवळ हा भारतीय राजकारणातील एक काळाकुट्ट अध्याय. क्षणिक आणि तात्पुरत्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कट्टरपंथीयांस जवळ केले की काय होते याचा तो मूर्तिमंत आणि अत्यंत हिंसक धडा. त्याची परिणती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येत झाली. त्याआधी या शीख दहशतवाद्यांच्या भस्मासुराचा बीमोड करण्यासाठी श्रीमती गांधी यांच्यावर अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवण्याची वेळ आली. शीख फुटिरतावाद्यांचा नेता जर्नेलसिंग भिंद्रनवाले हा सुवर्ण मंदिरात दडून बसलेला होता. त्यास नेस्तनाबूत केल्याखेरीज या खलिस्तानी चळवळीचा अंत होणे अवघड हे लक्षात आल्यानंतर इंदिरा गांधी यांनी लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्या यांस सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाईचा आदेश दिला. त्याबरहुकूम वैद्या यांनी ही लष्करी कारवाई केली आणि भिंद्रनवाले त्यात मारला गेला. या कारवाईचा सूड म्हणून दोघांची हत्या झाली. एक खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी. आणि दुसरे जनरल वैद्या. निवृत्तीनंतर अवघ्या सहा महिन्यांत, १९८६ साली, पुणे येथे शीख मारेकऱ्यांनी जनरल वैद्या यांस भर रस्त्यात गोळ्या घालून ठार केले. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या आठवणी ताज्या झाल्या. श्रीमती गांधी यांची हत्या त्यांच्याच शीख सुरक्षा रक्षकांनी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर देशभर शिखांविरोधात संतापाचा आगडोंब उसळला. ठिकठिकाणी त्यांचे शिरकाण झाले. राजधानी दिल्लीत तर कहर झाला. रक्ताचे पाट वाहिले. जगदीश टायटलर, सज्जनकुमार आदी काँग्रेस नेत्यांनीच कार्यकर्त्यांस चिथावणी देत शिखांविरोधात हिंसाचारास प्रवृत्त केले. ‘‘मोठा वृक्ष कोसळला की त्याखाली लहानसहान झुडपे चिरडली जातात’’, अशी त्यावर राजीव गांधी यांची प्रतिक्रिया. म्हणजे त्यांनी एका अर्थी शिखांच्या शिरकाणाचे समर्थनच केले. पुढे यातील काहींविरोधात न्यायालयात गुन्हे दाखल होऊन शिक्षा झाली. तथापि त्या नृशंस शीख हत्याकांडाच्या जखमा अद्यापही भरून आलेल्या नाहीत.
या इतिहासाचा संबंध राहुल गांधी यांना ताज्या अमेरिका भेटीत एका शीख तरुणाने काँग्रेसच्या शीखविरोधी कृत्यांविषयी जबाबदार धरले; त्याच्याशी आहे. श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्या वेळी राहुल गांधी १४ वर्षांचे होते आणि त्या वेळी काँग्रेसच्या राजकारणात त्यांचा काही वाटा असण्याची शक्यता नाही. पण सद्या:स्थितीत ते काँग्रेसचे अघोषित अध्यक्ष आहेत. त्यामुळे ‘तेव्हा’च्या घटनांविषयी त्यांचा काहीही संबंध नव्हता हे खरे असले तरी सध्याच्या काँग्रेसशी मात्र त्यांचे थेट नाते आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या इतिहासकालीन पापांसाठी त्यांना वर्तमानात काही विचारले जात असेल तर त्यात काही गैर आहे असे नाही. तेव्हा अमेरिकी तरुणाच्या कृतीबाबत काही आक्षेप घेता येणार नाही. शिखांविरोधात काँग्रेसचे धोरण, त्यातील काही वादग्रस्त नेत्यांस काँग्रेसकडून दिले गेलेले अभय इत्यादी मुद्द्यांची पार्श्वभूमी या तरुणाच्या प्रश्नास होती. त्यास सामोरे जाताना राहुल गांधी यांनी पक्षाने इतिहासात जे काही केले त्याबाबत सपशेल माफी मागितली. ‘‘जे घडले तेव्हा मी राजकारणात नव्हतो; पण तरीही जे काही झाले ते चूक होते असेच माझे मत आहे आणि त्याची जबाबदारी घेत मी माफीही मागण्यास मागेपुढे पाहणार नाही’’, अशा अर्थाचे विधान राहुल गांधी यांनी केले. याआधीही ‘८० च्या दशकात’ तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाने जे काही केले त्यासाठी राहुल गांधी यांनी जनतेची क्षमा मागितलेली आहे. अमेरिकेत या माफीची पुनरुक्ती झाली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर इतिहासातील कृत्यांसाठी वर्तमानातील नेत्यांनी जाहीर माफी मागितल्याची अनेक उदाहरणे सापडतील. जपानने दुसऱ्या महायुद्धात युद्धकैद्यांशी क्रूर वर्तन केल्याबद्दल मागितलेली माफी, इटलीने लिबियाची मागितलेली, बेल्जियमने अफ्रिकी काँगोची, पोप फ्रान्सिस यांनी कॅनडातील स्थानिकांची, बिल क्लिंटन यांनी मोनिका लुइन्स्की हिची, टायगर वुड्स याने लैंगिक विकृतीसाठी आपल्या चाहत्यांची इत्यादी शेकडो दाखले अशा जाहीर माफीचे देता येतील. पाश्चात्त्य देश, त्यांचे नेते ऐतिहासिक चुकांसाठी वर्तमानात क्षमा मागण्यात कचरत नाहीत. याचे मूळ धर्मसंस्कारांत असावे. ख्रिाश्चन धर्मीयांचा धर्मग्रंथ बायबल हा माणूस स्खलनशील असल्याचे स्वीकारतो आणि पश्चात्तापाच्या प्रायश्चित्ताने तो पापमुक्त होऊ शकतो असेही मानतो. अर्थात बौद्ध आणि जैन या भारतात उगम पावलेल्या धर्मांतही क्षमेचे महत्त्व आहेच. तेव्हा राहुल गांधी यांस शीख बांधवांची जाहीर माफी मागावी लागली या सर्वार्थाने शिळ्या कढीस राजकीय आनंदासाठी पुन:पुन्हा उकळी आणण्याचे कारण नाही. राहुल गांधी यांच्यावरील टीका रास्त ठरेल असे अनेक राजकीय प्रमाद आढळतील. असे असताना त्यांनी अमेरिकेत माफी मागितली याबद्दल भाजपच्या काही नेत्यांस आनंदाच्या उकळ्या फुटताना दिसतात. राहुल गांधी यांच्यावर देशातच नव्हे तर परदेशांतही अशी नामुष्की वारंवार येऊ लागली आहे, अशा अर्थाची प्रतिक्रिया भाजपचे नेते यावर देतात. यातून उलट आपल्याच बालबुद्धीचे प्रदर्शन होते याची या मंडळींस जाणीव दिसत नाही. माफी मागण्यात मोठेपणा असतो यावर या मंडळींचा विश्वास नसावा. अमेरिकेसारख्या देशात स्थानिक रेड इंडियन्सवर दीर्घकाळ अत्याचार होत होते. त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले. वास्तविक त्या अत्याचारांत माजी अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांचा काहीही हात नव्हता. तरीही सरकारच्या या औदासीन्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि स्थानिकांची माफी मागितली. क्षमा मागावी अशा कृत्यात सहभाग नसतानाही व्यापक औदार्याचे प्रदर्शन करत माफी मागितली गेल्याची आणखीही अनेक उदाहरणे सापडतील.
तथापि माफी मागावी अशा कृत्यांस जबाबदार असलेले जनतेची माफी मागण्याइतका मनाचा उमदेपणा दाखवतात का, हा खरा प्रश्न. म्हणजे जमीन हस्तांतरण कायदे जाहीर करून मागे घ्यावे लागले याबद्दल, कृषी सुधारणा विधेयके मागे घ्यावी लागली याबद्दल, निश्चलनीकरणाच्या महान निर्णयामुळे जनतेचे कमालीचे हाल झाले याबद्दल, कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांच्या कौटुंबिक कार्यक्रमात अकारण हजेरी लावली याबद्दल, पठाणकोट येथे प्रत्यक्ष लष्करी तळाच्या स्वयंपाकघरात अतिरेकी घुसेपर्यंत आपल्या सुरक्षा यंत्रणांस वा गुप्तहेरांस ते कळले नाही याबद्दल, चीनने गलवान खोऱ्यात घुसखोरी केल्याबद्दल, करोनाकाळात टाळ्या-थाळ्या वाजवून घेतल्या याबद्दल किंवा अगदी ताजे उदाहरण म्हणजे पहलगाम येथे सुरक्षा व्यवस्थेत दुर्लक्ष झाल्याबद्दल आपल्या कोणी मान्यवरांनी जनतेची वा संबंधितांची माफी मागितल्याचे उदाहरण नाही. याचा अर्थ या सर्व घटना माफी मागण्याएवढ्या मोठ्या, महत्त्वाच्या आहेत असे आपणास वाटत नाही असा असू शकतो. अथवा माफी मागणे हे येरागबाळ्यांचे काम; आपले नाही, अशीही धारणा यामागे असू शकते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरात दंगलीबद्दल आणि बाबरी मशीद पाडल्यानंतर जे झाले त्याबद्दल ‘खंत’ व्यक्त केली होती आणि त्यांचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचीही तीच भावना होती. हे दोन या पक्षाचे ज्येष्ठ नेते. त्यांच्यानंतर त्या पक्षाच्या कोणा नेत्याने वर उल्लेखलेल्या कृत्यांबद्दल साधी खंतही व्यक्त केल्याचे उदाहरण नाही.
अलीकडच्या इतिहासात स्वत:ची शिक्षा कमी केली जावी यासाठी कोणी माफी मागितली किंवा काय याची चर्चा वारंवार झडत असताना त्या पार्श्वभूमीवर आजीच्या कृत्यांसाठी नातवाने माफी मागण्याचा मोठेपणा राहुल गांधी यांनी दाखवला. मौन राहून ‘चला, पुढला प्रश्न…’ असे म्हणण्याचा पर्याय त्यांनी नाकारला हे ठीकच. माफी आणि मौन यांतून निवड करण्याचा हा विवेक अन्यांनीही दाखवावा अशी अपेक्षा या निमित्ताने करणे अस्थानी ठरणार नाही.