जगात वावरत असताना, जगातली कर्तव्यर्कम पार पाडत असताना, समाधी अवस्था कशी काय टिकेल, असं आपल्याला स्वाभाविकपणे वाटतं. कारण सगळी कामं वगैरे आटोपून ‘ध्यान’ करायचं आणि त्यात ‘समाधीसुखा’चा अनुभव घ्यायचा असतो, असा समज आहे. इथं तर कवि नारायण सांगतो की, ऐसिया भगवद्भजनविधीं। भजनशील झाली बुद्धी। तैं सकळ कर्मी समाधी। जाण त्रिशुद्धी स्वयें झाली।। एकदा का समस्त कर्मामध्ये भगवंताची जाणीव टिकली, भगवंताचं भान राहू लागलं की मग समस्त कर्मामध्ये समाधी अवस्था टिकते. इतकंच नाही, तर कर्माचरणात ती कशी काय टिकेल, असं ज्यांना वाटतं त्यांना अनुलक्षून कवि नारायण सांगतो की, ‘‘कर्माचरणीं समाधी। एक म्हणती न घडे कधीं। ते पावले नाहीं निजात्मबोधीं। जाण विशुद्धी विदेहा।। ४२४।।’’ म्हणजे, कर्माचरण करीत असताना समाधी अवस्था टिकणं कधीच शक्य नाही, असं ज्यांना वाटतं त्यांना हे जनकराजा, आत्मस्वरूपाचा बोध झालाच नाही, हे खात्रीनं समज! म्हणजे कर्म करीत असताना समधी टिकतेच. आता ही समाधी म्हणजे काय आहे? तर मनाचं समत्व आहे. ‘आधी’चा एक अर्थ पाया असा आहे. तेव्हा कोणत्याही गोष्टीचा पाया आंतरिक समत्व असेल तर ती आंतरिक समाधी अवस्था आहे. जगात वावरताना मनावर कोणत्याही अनुकूल किंवा प्रतिकूल घडामोडीचा खोलवर परिणाम न होणं, ही अवस्था समत्वाची आहे. आता असं पाहा. जन्मापासून आपण स्वत:ची एक ओळख मानत असतो. म्हणजे आपलं नाव, आपलं गाव, आपलं घरदार या सगळ्या ओळखी आपल्या जन्मामुळे आणि जन्मापासूनच व्यक्तिमत्त्वाचा भाग झालेल्या असतात. आपला जन्म अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी झुंजत असलेल्या घरात झाला की अपरंपार भौतिक ऐश्वर्य असलेल्या घरात झाला; इथपासूनच आपली ‘ओळख’ जगात आणि मनात रुजू लागत असते. तेव्हा माणसाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीनुसार त्याची ओळख जगाच्या आणि आपल्याही मन:पटलावर ठसली असते. त्या ओळखीनुरूप म्हणजे आपल्या जीवनाच्या स्थितीनुरूपची सुख-दु:खं आपल्या वाटय़ाला येत असतात आणि त्यानुसारच्या अनंत चिंता, काळज्या मनाला चिकटत असतात. वयपरत्वे तसंच परिस्थितीपरत्वे काळजीचं, चिंतेचं स्वरूप बदलत जातं, पण त्या चिंतेपासून कायमची सुटका मात्र कधीच होत नाही. कधी थोडा काळ चिंतारहित वाटतो, तर त्या समाधानाच्या स्थितीतही पुन्हा चिंता करावी, अशी परिस्थिती ओढवणार नाही ना, ही चिंताही सुप्तपणे शिरकाव करीत असते. तेव्हा अगदी थोडा अपवादात्मक काळ वगळला, तर जीवनाचा बराचसा काळ हा चिंतेतच सरतो आणि मग पुढचा जन्म पुन्हा नवी ओळख, नवं आयुष्य आणि नव्या चिंतांसह वाटय़ाला येतो. त्या जन्मात आधीच्या जन्मातली ओळख, आधीच्या जन्मातल्या चिंता, काळजीची कारणं आणि आव्हानं, संकटं; यातलं काहीही आठवत नसतं. पण म्हणून चिंतेनं बोट सोडलं नसतं! उलट नवं रूप घेऊन नव्यानं तिचा खेळ सुरू झाला असतो. या खेळाला कधी तरी पूर्णविराम मिळावा, अशी अपेक्षा मनात निर्माण झाली, तर ‘मुख्य भजना’ची वाट दिसू लागली, यात शंका नाही!
– चैतन्य प्रेम
chaitanyprem@gmail.com