प्रवाहाच्या विरुद्ध काम करणारा शिक्षणतज्ञ अशी रमेश पानसे यांची ओळख करून देता येईल. त्यांनी अर्थशास्त्राची प्राध्यापकी सोडून शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार नावीन्यपूर्ण पद्धतीने करण्यात ते कार्यरत आहेत. ग्राममंगलच्या माध्यमातून शिक्षणाची एक संकल्पना ते रुजवत आहेत व ती चांगली आकार घेत आहे. ग्राममंगल शाळा ऐना (ता. डहाणू) येथे आहे, तसेच विक्रमगड, भामरागड, पुणे येथेही त्यांनी शाळा सुरू केल्या आहेत. लोकसहभागातून रोटरी क्लब तसेच लायन्स क्लबच्या मदतीने इमारती बांधल्या, येथील आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी ग्राममंगलच्या कार्यला वाहून घेतले आहे व त्याचा विस्तारही होतो आहे.
अनेक शिक्षण परिषदांत, शिक्षकांच्या प्रशिक्षणात रमेश पानसे यांनी मार्गदर्शन केले आहे, त्यांची शैक्षणिक कल्पना मांडली आहे. ऐना येथे त्यांनी तेथे बाल शिक्षण संग्रहालय सुरू केले आहे. ग्राममंगलच्या शाळा पाहण्याचा नुकताच योग आला. डहाणू तालुक्यातील ऐना, पालघर तालुक्यातील विक्रमगड, पुण्यातील ग्राममंगल अशा शाळांमधून विद्यार्थी घेत असलेले शिक्षण पाहण्यात आले, ग्राममंगलने नेमके केले काय? तर त्यांनी आधी विद्यार्थ्यांना गुंतवण्यासाठी लागणारी शैक्षणिक साधने तयार केली, कायम स्वरूपात विद्यार्थी वापरू शकतील अशी, ती वर्गातच कपाटात ठेवण्यात येतात. गटात कृती होत असल्यामुळे संबोध स्पष्ट होतात व गृहपाठाची तशी गरज पडत नाही. त्यामुळे पाठीवरचे ओझेही कमीच असते. ग्राममंगल ने यापूर्वी शैक्षणिक साधन निर्मितीची अनेक प्रशिक्षणे घेतली आहेत, तसेच शैक्षणिक साधने विक्री साठी ही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांना बसायला बाक नाहीत, खालीच विद्यार्थी बसतात, सामूहिक गटात विद्यार्थी काम करतात आणि शिकतात. वर्गावर पहिली, दुसरी चौथी पाचवी, नववी, दहावी अशा पाट्या नाहीत तर विषयानुसार नांवे दिलेली आहेत. मराठी, इतिहास, गणित, भूगोल, विज्ञान. त्या त्या वर्गात विद्यार्थी प्रत्येक तासाला जातात, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक हालचाल होते व थोडा बदलही होतो आणि विद्यार्थ्याला कंटाळा येत नाही. शाळेला तुम्ही केव्हाही भेट दिली तर शांतपणे काम चाललेलं असतं, कुठेंही गडबड नाही, गोंधळ नाही, शिक्षक फक्त मार्गदर्शकाची भूमिका निभावतात.
कृती, आनंद, परिसराशी समरसून असणं, त्यात गुंतून असणं, म्हणजेच शिक्षण हे इथे पहायला मिळतं. शिक्षण, गट कार्यात मुलं इतके गुंतून गेलेली असतात की शाळा पाहायला कोणी आलं आहे, याकडे त्यांचं लक्षही नसतं, ते शिकत राहतात. ग्राममंगलमध्ये मुले गटांमध्ये नुसत्या गप्पा मारत नाहीत तर त्यांना शैक्षणिक साधनाच्या साह्याने कृती दिली जाते, त्यामुळे त्यांना ते करण्यात आनंद मिळतो. प्रत्येक घटकांची शैक्षणिक साधने ग्राममंगल मध्ये तयार आहेत आणि ती वर्गातच कपाटात ठेवलेली असतात, त्याच्यामुळे ती बरेच दिवस वापरता येतात. मुलांचे विविध संबोध स्पष्ट होण्यासाठी ही पद्धत खूप छान आहे. यामध्ये जो भाग कच्चा आहे किंवा मागच्या वर्षी राहिलेला आहे तोसुद्धा मुले गटात पूर्ण करून इतर मुलासोबत येऊ शकतात. परीक्षा नसली तरी दहावीला विद्यार्थी बाहेरून परीक्षाला बसवले जातात. परीक्षा नसती तरी मूल्यमापन आहेच. गृहपाठ जास्त दिला जात नसला तरी बहुतेक शाळेतच गृहपाठ व गटातील काम पूर्ण करून घेतलं जातं.
ग्राममंगलच्या आदिवासी भागातील शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थीच शिक्षक म्हणून काम करत आहेत. बोली भाषेमधून बोलत असतांना प्रमाणभाषा ही शिकावी म्हणून आता जवळजवळ ग्राम मंगलमधील ६० शिक्षक मराठी साहित्य परिषदेच्या मराठीच्या प्रथमा परीक्षेला बसले व पासही झाले. अनेक विद्यार्थी साहित्य परिषदेच्या मराठीच्या परीक्षेला बसून, मराठी चांगल्या प्रकारे कसं बोलता येईल लिहिता येईल याचा सराव करत आहेत. त्याचप्रमाणे संगणकसुद्धा अनेक शाळात उपलब्ध करून दिले आहेत, त्यामागे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हा उद्देश आहे.
ग्राममंगलमध्ये बहुतांश आदिवासी विद्यार्थी असल्यामुळे येथे सावित्रीबाई फुले दत्तक योजना मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. एका विद्यार्थ्यांचा वर्षाचा जेवणाचा खर्च ३४, हजार रुपये येतो. पण पंधरा हजार घेऊन एका विद्यार्थ्यांचे पालकत्व घेण्यात बरेचसे पालक पुढे येत आहेत. रोटरी, लायन्स क्लबच्या माध्यमातून शाळेच्या इमारती सुंदर, प्रशस्त उभारलेल्या आहेतच. शिक्षक बरेचसे स्थानिक असल्यामुळे कमी पगारावरही ते तिथे सेवा देत आहेत. शिक्षकही व्हिडिओ कॉन्फरन्स, व्हाट्सअपच्या माध्यमातून स्वतःला अपडेट करत आहेत.
अनुताई वाघ यांच्या प्रेरणेने एवढा सगळा शैक्षणिक डोलारा, रमेश पानसे व त्यांचे कार्यकर्ते योग्य रीतीने पार पाडत आहेत. अनुदानित शाळेपेक्षाही आज अनेक शाळा समाजाच्या सहभागावर व वर्गणी वर चांगल्या चालत आहेत. ग्राममंगल त्यापैकीच एक. कर्मवीरांचा वारसा चालवायचा असेल तर आशा शाळा टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत. आदर्श शिक्षक, आदर्श कार्यकर्ते, आदर्श शाळा यासाठी आदर्श माणसें पेरली पाहिजेत.
चांगल्या व नावीन्यपूर्ण शाळा वाढल्या तरच समाजात अपेक्षित बदल दिसायला लागतील.
anilkulkarni666@gmail.com