– सुरज दहागावकर
‘राजा’ म्हटलं की डोळ्यांसमोर जे उभं राहतं, त्या नेहमीच्या चौकटीत एक राजा अपवाद ठरला. कारण तो फक्त सिंहासनावर नाही, तर लोकांच्या मनात बसला. त्याने लढाई केली खरी पण ती शत्रूंशी नव्हे, अंधश्रद्धा, जातीभेद व विषमतेच्या रूढींशी. त्याच्या आदेशातून भीती नाही तर संधी मिळायच्या. त्याच्या दरबारात दबलेल्यांच्या वेदना, हुंकार ऐकू यायचे. त्याचं राज्य एका सामाजिक क्रांतीचं केंद्र होतं. हा राजा दरबारात नाही तर समाजात गेला. धार्मिक स्थळांमध्ये नाही तर दलितांच्या वस्तीत पोहोचला. माणुसकीच्या वाटेवर चालला. तो राजा लोकांच्या मनात राज्य करत होता. हा लोकराजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज.
छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी जयसिंगराव घाटगे व राधाबाई यांच्या पोटी झाला. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे. कोल्हापूर संस्थानात १८६६ नंतर सातत्याने संकटं ओढवत होती. थोरामोठ्यांचे अकाली निधन, गादीसाठी वाद व इंग्रजांच्या हस्तक्षेपामुळे संस्थान डळमळीत झालं होतं. १८८३ मध्ये चौथे शिवाजी महाराज वारल्यानंतर कोल्हापूर गादी रिकामी झाली. त्या वेळी संस्थानातील चार राण्यांच्या सहमतीने जयसिंगराव घाटगे यांच्या दोन पुत्रांपैकी थोरला मुलगा म्हणजे यशवंतराव यांना दत्तक घेण्यात आले. १७ मार्च १८८४ रोजी औपचारिकरीत्या यशवंतरावांचा दत्तक समारंभ पार पडला. तेव्हा त्यांचे वय केवळ १० वर्षं होतं. घाटग्यांच्या घरात जन्मलेले व भोसले घराण्यात दत्तक गेलेले यशवंतराव त्यांच्या पुढील जीवनात दोन्ही कुलांचं प्रतिनिधित्व करत जगासमोर शाहू महाराज म्हणून लोकप्रिय झाले.
राजर्षी शाहू महाराजांचं नाव केवळ कोल्हापूर आणि महाराष्ट्रापुरतं नाही. कारण देशभर व जगभरही समाज परिवर्तनाच्या लढ्यात जेव्हा कोणी आदर्श शोधतो तेव्हा सर्वात आधी आठवतो तो हा राजा. ज्याने सत्ता उपभोगली नाही, तर ती दबलेल्यांच्या हातात सत्ता द्यायचा प्रयत्न केला. त्यांच्या काळात समाजात सामाजिक विषमता खोलवर मुरलेली होती. जातपात, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, धर्माच्या नावावर वर्चस्व, शिक्षण बंद, सगळं अगदी उघड उघड चालायचं. बहुजनांना ना शिक्षण मिळायचं, ना सन्मान, ना संधी, ना नोकरी. पण हा राजा फक्त दुःख व्यक्त करून गेला नाही. तो लढला आणि त्यांनी या सगळ्याविरुद्ध ठाम पावलं उचलली.
शाहू महाराजांनी आपलं राज्य केवळ प्रशासन, महसूल किंवा कायदे चालवण्यासाठी वापरलं नाही तर त्यांनी त्याला एक सामाजिक बदलाची प्रयोगशाळा बनवलं. राजा असूनही आपली सत्ता हुकुमशाहीसारखी न चालवता त्यांनी ती शोषितांसाठी, वंचितांसाठी, बहुजनांसाठी व दुर्लक्षितांसाठी खर्ची घातली. त्यांनी दलित, वंचित, मागासवर्गीय, शेतकरी, कामकरी लोक व महिलांना समाजात मानाचं स्थान मिळावं यासाठी शिक्षणाची दारं उघडली. आरक्षणाचा विचार त्या काळात करणं ही क्रांती होती पण शाहू महाराजांनी ही क्रांती आपल्या राज्यात सर्वप्रथम घडवून आणली. आज आपण समाजात समतेच्या गोष्टी करतो, आरक्षणाच्या हक्काबद्दल बोलतो, शिक्षण सर्वांसाठी खुलं असावं म्हणतो पण या सर्वामागे शाहू महाराजांच्या विचारांचा भक्कम पाया आहे हे विसरता कामा नये.
शाहू महाराजांनी माणसातला राजा व राजामधील माणूस बनून समाज परिवर्तनाचा वसा खांद्यावर घेतला. राज्य करणं ही त्यांच्या दृष्टीनं केवळ सत्तेची गोष्ट नव्हती, तर ती सुधारणेची जबाबदारी होती. आपल्या राज्यकाळात त्यांनी सामाजिक सुधारणा केवळ बोलून नाही घडवल्या तर त्या करून दाखवल्या. शाहू महाराजांनी बेरड समाजाच्या घरात जाऊन जेवण केलं, फासेपारधी समाजाला ‘गुन्हेगार’ या शिक्क्याखाली दडपलं जात असताना, त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी दिली. शाहू महाराजांनी प्रत्येक वेळी त्या समाजाचा हात पकडला ज्याला वर्णव्यवस्थेने झिडकारलं होतं, धर्मानं नाकारलं होतं व समाजानं अंधारात ढकललं होतं. त्यांच्यासाठी कोणत्याही माणसाचं माणूसपण महत्त्वाचं होतं त्याचा धर्म, जात, वर्ग नव्हे. म्हणूनच ते फक्त राजा नव्हते तर ते लोकांचे लोकराजा होते.
शाहू महाराजांनी सत्ता हातात घेतल्यानंतर सर्वात आधी एक जाहीरनामा काढला. त्यात त्यांनी स्पष्ट शब्दांत लिहिलं, ‘आमची सर्व प्रजा सतत सुखी राहावी, प्रजेचं कल्याण होत राहावं, आणि आमच्या संस्थानातल्या प्रत्येक माणसाची भरभराट व्हावी, ही आमची इच्छा आहे.’ राजा म्हणून त्यांनी लोकांसाठी काय करायचंय, हे पहिल्याच जाहीरनाम्यात सांगून टाकलं. ही इच्छा फक्त बोलून न थांबता, ते आयुष्यभर ती पूर्ण करत राहिले. शोषित, दलित, मागास, गरीब, महिलांसाठी त्यांनी एकामागून एक निर्णय घेतले. प्रत्येकाला संधी मिळावी, न्याय मिळावा, सन्मानाने जगता यावं हा त्यांच्या कारभाराचा केंद्रबिंदू होता.
छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात कोण कुठल्या अडचणीत आहे, कोणाला काय हवंय हे सगळं बारकाईने समजून घेतलं. फक्त पाहून थांबले नाहीत, तर त्यावर तोडगेही काढले. त्यांना सर्वप्रथम जाणवलं की, समाजातल्या बदलाची सुरुवात शिक्षणापासूनच होणार आहे. पण त्याकाळी शिक्षण काही सगळ्यांसाठी नव्हतं ते फक्त काही वरच्या जातींना आणि श्रीमंतांना मिळायचं. म्हणूनच प्रत्येक जातीच्या मुलांना शिक्षण मिळायलाच हवं यासाठी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत केलं, वसतिगृहं सुरू केली. जेणेकरून गरिबांच्या पोरांनाही शिकता येईल. महाराजांच्या मनात सामान्य जनतेबद्दल एक वेगळीच कळवळ होती. खास करून बहुजन समाजाची दयनीय स्थिती पाहून ते अस्वस्थ व्हायचे. त्यांना वाटायचं हा समाज जर अंधारात राहिला, तर समाज कधीच पुढे जाणार नाही. म्हणून त्यांनी बहुजन समाजातील लोकांना साक्षर करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले.
अनेक ठिकाणी शाळा सुरू केल्या, शिक्षक नेमले गेले, लोकांना शिकण्यासाठी तयार केलं गेलं. शिक्षण म्हणजे फक्त अक्षरओळख नाही, तर सन्मानाने जगण्याचा अधिकार ही भावना त्यांनी समाजात रुजवली.
मागासलेल्या वर्गांना जर खऱ्या अर्थानं विकासाच्या प्रवाहात सामील करायचं असेल, तर त्यांना संधी द्याव्या लागतील, आरक्षण द्यावं लागेल ही कल्पना सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडली होती. हि कल्पना शाहू महाराजांनी प्रत्यक्षात कृतीत आणली. २६ जुलै १९०२ रोजी त्यांनी एक इतिहास घडवणारा निर्णय घेतला आणि आपल्या कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय जातींसाठी ५० टक्के जागा आरक्षित केल्या. त्या काळात हा निर्णय म्हणजे एक मोठी धाडसाची गोष्ट होती. समाजाचा विरोधही झाला. टीकाही झाली. पण शाहू महाराज डगमगले नाहीत. कारण त्यांना माहीत होतं. संधी मिळाली, तर हा समाज उभा राहील आणि एकदा उभा राहिला, तर तो मागे वळून पाहणार नाही. आज आपण ज्या आरक्षणाच्या हक्काबद्दल बोलतो, तो पाया इथेच घातला गेला.
त्या काळात जातिव्यवस्था ही ब्राह्मणांची सर्वात मोठी ताकद होती व बहुजन समाजाची सर्वात मोठी कमजोरी. हीच व्यवस्था मोडणं व बहुजनांना स्वाभिमानानं जगता येईल अशी संधी देणं हे शाहू महाराजांचं मुख्य उद्दिष्ट होतं. त्यासाठी त्यांनी गंगाराम कांबळे नावाच्या एका बहुजन व्यक्तीला हॉटेल सुरू करून दिलं. पण ते फक्त हॉटेल उभारून थांबले नाहीत तर शाहू महाराज स्वतः दररोज त्या हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायचे. इतकंच नव्हे, तर संस्थानातील अधिकारी, कर्मचारी, सामान्य नागरिक यांनाही त्या हॉटेलमध्ये चहा प्यायला सक्तीनं पाठवायचे. ही कृती आज साधी वाटत असली, तरी त्या काळात तिचा अर्थ फार मोठा होता. कारण ती जातीव्यवस्थेला थेट दिलेली एक जबरदस्त चपराक होती.
शाहू महाराजांना हे चांगलंच माहीत होतं की, मागासवर्गीय समाजाला सन्मानाची वागणूक दिल्याशिवाय खरा बदल घडणार नाही. म्हणून त्यांनी केवळ शिक्षण, नोकरी व आरक्षणापुरती मदत केली नाही तर त्यांच्या आत्मसन्मानावर जखम करणारी प्रत्येक गोष्ट मोडून काढली. पैलवानीसारख्या गौरवशाली कलेत बहुजन समाजही उतरावा म्हणून त्यांनी त्यांना ‘जाठ पैलवान’ ही उपाधी देऊन प्रोत्साहन दिलं. अस्पृश्य समाजातील लक्ष्मण मास्तर आणि गणपत पवार यांना शिवणकामासाठी शिवणयंत्र खरेदी करून दिलं. पण फक्त मशीन देऊन थांबले नाहीत तर ‘यांच्याकडे कोण कपडे शिवायला देणार?’ या समाजाच्या मनात असलेल्या भीतीला दूर करण्यासाठी, शाहू महाराजांनी स्वतःची राजवस्त्रं त्यांच्याकडे शिवायला दिली.
कोल्हापूर संस्थानात प्लेगसारख्या भीषण रोगाने थैमान घातलं होतं. त्यातच दुष्काळानं हातमिळवणी केली. गावोगावच्या गोरगरीब जनतेला घरदार सोडून रस्त्यावर यावं लागलं. त्यांच्यासमोर भूक, आजार, आणि निवाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला. पण अशा कठीण वेळी शाहू महाराज थेट मैदानात उतरले. कटकोल, पन्हाळा, बाजारभोगाव, गारगोठी, तिरवडा, बांबवडा आणि कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी गोरगरिबांसाठी आश्रम उभारले, औषधं, गोळ्या, उपचार यांची सोय करून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली. फाटकी अंगावरची कपडं बाजूला सारून स्वतःच्या संस्थानातून नवे कपडे देऊन त्यांना मायेची ऊब दिली. भुकेल्या पोटासाठी धान्याचा हंडा भरून दिला.
शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात फिरून जनतेच्या अडचणी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या. गरिबी, पिण्याच्या पाण्याची टंचाई, अज्ञान, श्रीमंत लोकांकडून गरिबांची होणारी पिळवणूक, ठिकठिकाणच्या रस्त्यांची झालेली दुर्दशा हे सगळं बघून ते मनातून अस्वस्थ झाले. त्या वेळी दुष्काळ होता. लोकांना धान्य, पाणी, औषधं अशा गरजेच्या वस्तू एका गावातून दुसऱ्या गावात पोहोचवायच्या होत्या. पण रस्तेच नव्हते. कुठे मळवाट तर कुठे चिखलट खड्डे. यामुळे वाहतूक थांबायची व लोक अजूनच त्रासात यायचे. हे लक्षात घेत शाहू महाराजांनी पक्क्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली. फक्त मुख्य रस्ते नाही, तर गावोगावी, दूरदूरच्या खेड्यांपर्यंत रस्ते जोडले गेले. त्यांच्यासाठी आजच्यासारखं विकास म्हणजे केवळ कागदावरची योजना नव्हती तर माणसाला सुखाने, सन्मानाने जगता यावं यासाठीचा खरा प्रयत्न होता.
शाहू महाराजांनी समाजात जे लोक ‘नाकारले गेलेले’ होते, त्यांना स्वीकारून माणूसपण दिलं. त्यात फासेपारधी समाज हा मोठे उदाहरण आहे. या जमातीला राहण्यासाठी जमिनी दिल्या. त्यांनी ‘गुन्हेगार’ असा शिक्का मारलेल्या फासेपारधी समाजाला ‘सिपाही’ बनवले. अडाणी पोरांना शिक्षणाची गोडी लावली. आजही आपण अनेक फासेपारधी पाहतो, जे न्यायासाठी, रोजगारासाठी तळमळत आहेत. त्यांच्या पाठीशी शाहूंनी दाखवलेली उबदार सावली जर शासन, समाज, आणि आपण स्वतः देऊ शकलो, तर खऱ्या अर्थाने ‘शाहू महाराजांचा वारसा’ आपण चालवतो आहोत, असे म्हणता येईल.
भारतीय समाज पुरुषप्रधान, वर्ण व जातिव्यवस्थेवर आधारित असून स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले. सतीप्रथा, बालविवाह, विधवांच्या हालअपेष्टा, हुंडा, घटस्फोटाची बंदी अशा अनेक रूढींमुळे स्त्रियांचे जीवन जणू नरक बनले होते. अशा काळात शाहू महाराजांनी ऐतिहासिक पावले उचलली. महात्मा फुले यांची सामाजिक सुधारणेची चळवळ पुढे नेत शाहू महाराजांनी १२ जुलै १९१९ रोजी लग्नाचे वय वाढवण्याचा कायदा करून मुलीच्या लग्नाचे वय १४ व मुलाच्या लग्नाचे वय १८ वर नेले. त्यांनी बालविवाहास बंदी घातली, आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली, विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. ते इतके पुढारले होते की त्यांनी घटस्फोटाचा कायदाही १९१९ मध्ये अंमलात आणला आणि पती महारोगी किंवा नपुंसक असल्यास पत्नीला घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला.
शाहू महाराजांनी १८९५ पासून कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या अटींवर सरकारी कर्ज योजना सुरू केल्या. १८९७-९८ मध्ये ३२,२०१ रुपये आणि १९०६-०७ मध्ये १२,५०० रुपये तगाईसाठी वितरित केले. राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ‘सम्राज्ञी फंड’ सुरु करून शेतकऱ्यांना आधार दिला. १९१४ च्या शेती प्रदर्शनात, जनावरे, शेतीमाल आणि उद्योगक्षेत्रातील वस्तूंचे प्रदर्शन लावून आधुनिक शेतीतंत्रांचा प्रचार केला. तसेच, शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात कॉफी, चहा, बुंदा अशा पीकांची प्रयोगात्मक लागवड करून कृषी क्षेत्रात नवे प्रयोग घडवून आणले. पन्हाळा, भुदरगड परिसरात चहा आणि कॉफीच्या लागवडीने त्यांनी स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट स्थापन करून शेती संशोधनाला चालना दिली. या संस्थेच्या माध्यमातून सुधारित शेतीपद्धतींचा प्रचार, शेती अवजारांचे संग्रहालय, ‘शेतकी आणि शेतकरी’ पुस्तकांचे वितरण आणि आदर्श शेती प्रकल्प राबविण्यात आला.
शाहू महाराजांनी १९१७ मध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. उच्चवर्णीयांनी या कायद्याला तीव्र विरोध केला, कारण बहुजन समाजाच्या शिक्षणामुळे त्यांच्या सत्तास्थानाला धोका निर्माण होईल अशी भीती त्यांना होती. शाहू महाराजांनी ‘संधीची समानता’ न देता ‘पुरेशी संधी’ हे तत्व स्वीकारले. मागासलेल्या वर्गांना विशेष संधी देऊन त्यांनी शिक्षणात समता साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, ‘ज्यांना गरज जास्त, त्यांना संधी जास्त’ हेच सामाजिक न्यायाचे खरे रूप होय. शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे, हे ओळखून शाहू महाराजांनी गावोगावी शाळा उघडल्या, विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीवर पालकांवर दंड आकारला, आणि प्राथमिक शिक्षणावर भर दिला. त्यांनी सांगितले की, ‘शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची प्रगती झालेली नाही, तसेच अज्ञानाच्या प्रवाहात बुडालेल्या देशात लढवय्ये आणि मुत्सद्दी कधीच तयार होणारच नाही म्हणूनच देशाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची गरज आहे’.
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी सामाजिक समतेचा विचार पेटवला, शाहू महाराजांनी त्या विचारांना जमीन दिली व बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर संविधानाची भक्कम इमारत उभी केली. या तीन महामानवांनी मिळून उभा केलेला हा विचारपरंपरेचा दागिना भारतीय समाजाच्या सुधारणेचा मार्ग होता. शाहू महाराज आणि बाबासाहेब यांचा संबंध अगदी दोन-अडीच वर्षांचा असला तरी तो अतिशय जिव्हाळ्याचा, क्रांतिकारक व समाजपरिवर्तनाचा होता. शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेची योग्य वेळी ओळख घेतली. त्यांना शिक्षण, पत्रकारिता व सामाजिक चळवळीसाठी भरपूर आर्थिक मदतही केली.
त्या काळात बाबासाहेब ‘मूकनायक’ नावाचं एक साप्ताहिक चालवत होते. आर्थिक अडचणींमुळे ते बंद होण्याच्या उंबरठ्यावर होतं. पण शाहू महाराजांनी तात्काळ २५०० रुपयांची मदत करून त्या अंकाला पुनर्जीवित केलं. बाबासाहेब इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना शाहू महाराजांनी त्यांना मदत केली. त्यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार ठेवला. कोल्हापूर येथे बाबासाहेबांच्या सन्मानार्थ भव्य मिरवणूक काढून शाहू महाराजांनी त्यांना ‘जरीपटका’ देऊन सन्मानित केले. माणगाव येथे झालेल्या दलित परिषदेच्या अधिवेशनात, शाहू महाराजांनी थेट घोषणा केली ‘तुमचा खरा पुढारी तुम्ही शोधलात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. एक दिवस येईल, जेव्हा ते संपूर्ण हिंदुस्थानचे नेते ठरतील.’ इतकी दूरदृष्टी आणि त्यामागचा विश्वासाने बाबासाहेबांच्या नेतृत्वाला मान्यता मिळाली. मात्र नियतीने या जोडीला जास्त काळ साथ दिली नाही. ६ मे १९२२ ला शाहू महाराजांचं अकाली निधन झालं. त्यांनी रोवलेला विचारांचा वटवृक्ष बाबासाहेबांनी आपल्या संविधानाने अखंडित ठेवला. पुढे डॉ. आंबेडकर यांचा पहिला पुतळा उभा राहिला, तो कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये. म्हणजेच शाहू महाराजांच्या नगरीत उभा झाला.
शाहू महाराज त्यांना जे करायचं होतं ते करून गेले. पण आज आपण त्यांच्या विचारांना घेऊन किती चालतो हे महत्वाचं. कारण आज शाळा आहेत, कॉलेज आहेत, नोकऱ्या आहेत, आरक्षण आहे, बोलायला स्वातंत्र्य आहे. पण फक्त याचा उपयोग करून घेण्यात शाहू महाराजांचा वारसा, विचार पूर्ण होत नाही, तर त्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवणं ही खरी जबाबदारी आहे.
surajdahagavkar2030@gmail.com