डॉ. तारा भवाळकर
पहिलीपासून हिंदी शिकवायला राज्यातून विरोध होतो आहे, हे बघितल्यावर ‘सक्ती केली जाणार नाही’, असे सांगत, राज्य सरकारने महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मागच्या दाराने हिंदी आणली आहे. बिहारची निवडणूक, महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत येऊ पाहणाऱ्या परप्रांतीयांचा अनुनय हे मुद्दे त्यामागे आहेत, हे उघड आहे. पण हे राजकारण करताना पाचसहा वर्षांच्या चिमुरड्यांना गिनिपिग करायची काय गरज होती? अनेक वर्षे अध्ययन केलेले शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ या संदर्भात काय म्हणतात, ते का विचारात घेतले नाही? या लेखात प्राध्यापक, तसेच यावर्र्षीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या अनुभवातून या विषयासंदर्भात सरकारला खडे बोल सुनावले आहेत…महाराष्ट्र शासनाचे धोरण म्हणून सध्या त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार सरकार सध्या करत आहे आणि त्यानुसार इयत्ता पहिलीपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवल्या जाव्यात अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. त्याचा महाराष्ट्रातील सर्व स्तरातून निषेध होत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य महामंडळ, नाट्य परिषद आणि इतर अनेक संस्थांनीही याला विरोध केला आहे. म्हणजे पहिलीपासून तीन भाषा शिकवायला या सगळ्यांचा विरोध आहे, कारण हे धोरण पूर्णपणे अशैक्षणिक आहे, आणि बाल -मानसशास्त्राच्या आणि लहान मुलांच्या शारीरिक क्षमतेच्या विरोधात आहे. पहिल्या वर्गात मूल येते, त्यावेळी ते केवळ सहा वर्षाचे असते, या वयात मुलगा वा मुलगी असली तरी शाळा हीच त्यांच्यासाठी नवीन गोष्ट असते आणि शाळेमध्ये सगळे विषय आणि इतिहास, भूगोल, व्याकरण, अमूक, तमूक, वगैरे त्यांची नावेसुद्धा त्यांना नवीन असतात.

तिसरी भाषा मानसिकदृष्ट्या न झेपणारी…

अशा स्थितीत तीन निरनिराळ्या भाषा शिकवायच्या हे म्हटले तर त्याच्या मानसिकतेच्या आणि बौद्धिकतेच्या, शारीरिक क्षमतेच्या विरोधात आहे. याबद्दलची माझी भूमिका मी मांडणार आहे, याचे कारण असे की, मी आयुष्याची ४५ वर्षे शिक्षक म्हणून भाषा विषय विविध स्तरावर शिकवले आहेत. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन आणि पदवी, पदव्युत्तर, संशोधन मार्गदर्शन म्हणजे पीएचडी, ते परदेशी विद्यापीठातील चर्चासत्रापर्यंत मी अनेक स्तरावर भाषा विषयाचे अध्यापन केले आहे. चारही भाषा, मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या मी आठवी ते अकरावी वरच्या स्तरावर शिकवल्या आहेत. आता पहिलीमध्ये प्रवेश घेणारी छोटी मुले असतात, त्यांना इतक्या विषयांची ओळख होणे, मुख्य म्हणजे तीन चार तास एका ठिकाणी बसणेही शारीरिकदृष्टया अवघड आहे, त्यांना मानसिकदृष्ट्या न झेपणारे आहे, आणि अशा वेळेला तीन तीन भाषा शिकायला लागणे हे अशैक्षणिक व अन्यायकारक आहे, त्यांच्यावर दबाव टाकणारे आहे. शिक्षक म्हणून माझे मत असे आहे की इयत्ता चौथीपर्यंत सर्व विषय मातृभाषेतच शिकवायला पाहिजेत, त्या त्या प्रदेशातील भाषा असेल तर त्या भाषेत शिकवायला हवे. दुसऱ्या कुठल्याही भाषेचा मुलांच्या शिक्षणात प्रवेश तेव्हा होता उपयोगी नाही. खासगी जीवनात ज्या भाषा बोलत असतील ते असतील, पण बालक ज्या शाळेत जाते, तिथले शिक्षण मातृभाषेेत पाहिजे, कारण पहिल्या चार वर्षात शाळेची सवय होते, शारीरिक क्षमता वाढते, आकलनाचा पाया भक्कम होतो, मातृभाषेमुळे सर्व विषयांचे चांगले आकलन होते, मध्येच दुसरी भाषा आली तरी ग्रहण करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, नव्हे तो होतोच.

या टप्प्यावर मातृभाषाच महत्त्वाची…

प्रत्येक विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक वेगवेगळा असतो, क्षमता वेगवेगळी असते आणि अशा वेळेला सर्वसामान्यपणे जी पातळी असते, त्याला झेपेल त्याप्रमाणेच विषय शिकवले पाहिजेत, त्यात एकच भाषा म्हणजे तीही मातृभाषाच आवश्यक आहे, हे मत आचार्य शंकरराव जावडेकर आणि विनोबाजी भावे अशा विचारवंतांचे आहे. तरच त्याला आकलनात गती प्राप्त होते. कोणत्याही टप्प्यावर मातृभाषेत शिक्षण घेतले तर त्याला नकळत भाषेच्या सर्व क्षमता लक्षात येतात. व्याकरण व भाषेचा पाया पक्का होतो. त्याला व्याकरणात काय म्हणतात हे माहीत नसले तरी वाक्य कसे असावे हे कळते. त्यामुळे व्याकरणाच्या दृष्टीने लिंग, वचन समजते. बोलता येते. यादृष्टीने शब्दसंग्रह, विशेषण हे बोलता बोलता नकळत पक्के होते. आपली मातृभाषा चांगल्या दृष्टीने समजली तर दुसरी भाषा समजणे अवघड नसते. कारण जो बुद्ध्यांक असतो, तो कुठल्याही विषयात सारखाच गतिमान असतो. त्या मुलाला भाषेत गती असेल, तर दुसऱ्या भाषेतही गती येऊ शकते. यामुळे चौथीपर्यंत माध्यम भाषा मातृभाषाच असली पाहिजे. दुसरी भाषा मध्ये आली, कुठलीही आली तर त्याच्या आकलनात, भाषिक आकलनात घोटाळे होतात. नेमके काय बोलावे, कसे बोलावे हे त्याला कळेनासे होते.

मुलंच्या डोक्यात भाषिक घोटाळा

आज परिस्थिती अशी आहे, मुलांना काही ठिकाणी पहिलीपासून इंग्रजीमध्ये शिकवले जाते. माझे प्राथमिक शाळेतील अनेक शिक्षक व पालक परिचयाचे आहेत ते असे सांगतात, की दोनही भाषा शिकवल्याचा दुष्परिणाम दोन्ही भाषांच्या आकलनावर होतो. त्यांना धड मराठीही येत नाही, इंग्रजीही धड येत नाही. अनुभव असा आहे की, आपल्याला असे वाटते की, किंवा काही शिक्षण शास्त्रज्ञ म्हणे असे सांगतात, की मुलांना लहान वयात जास्त भाषा आकलन करण्याची क्षमता असते, पण हे पूर्णपणे सत्य नाही, याचे कारण त्यांनी त्या वर्गातील मुलांना शिकवलेले नाही. जे शिकवणारे आहेत, शिकवणाऱ्या शाळा आहेत, त्यांचे मत येथे विचारात घेतलेले नाही. शिक्षण शास्त्रज्ञ आपल्या कक्षात बसून निर्णय घेत असतात, आणि काही पुस्तकात वाचून सिद्धांत मांडत असतात. पण प्रत्यक्षात अनुभव वेगळा असतो, कारण शब्दसंग्रह, लिंग-वचन भेद कळणे, दोन भाषेत उच्चारदृष्ट्या त्यांना साम्य, भेद कळणे अवघड असते. पुष्कळदा दोन भाषा जवळच्या वाटल्या तरी त्यामध्ये उच्चारानुसार अर्थबदल असतो. आज आग्रह असा चाललेला आहे, की हिंदी तिसरी भाषा शिकवावी, म्हणजे मातृभाषा म्हणून मराठी, परकीय भाषा म्हणून इंग्रजी आणि देशातील तिसरी भाषा म्हणून हिंदी. आता गंमत अशी होते, की दोन भाषांच्यामध्ये उच्चारदृष्ट्या एकच शब्द असतो, परंतु त्यांचे अर्थ पूर्णपणे भिन्न असतात, हे भाषा शिकविणाऱ्यांना माहीत आहे. इतरांच्या कोणाच्या लक्षातही येत नाही. मग मुलांचे गोंधळ होतात. साधे उदाहरण द्यायचे झाले तर एक साधा शब्द म्हणजे चेष्टा, मराठीमध्ये चेष्टा म्हणजे टिंगलटवाळी, आणि हिंदीमध्ये प्रयत्न म्हणजे येथे दोन वेेगवेगळे अर्थ होतात. कुठे टिंगलटवाळी, आणि कुठे प्रयत्न असा अर्थ होतो हे मुलांच्या लक्षात येत नाही. मुलांच्या डोक्यात हा घोटाळा वयाच्या सहाव्या वर्षात सुरू झाला तर त्याला कुठल्याही भाषेचे आकलन नीट होऊ शकत नाही. असे अनेक शब्द आहेत आणि सध्या तर मराठी भाषेवर अनेक वेळा असे अतिक्रमण होत असल्याचे दिसत आहे.

भाषिक पाया पक्का हवा…

आता शासन असे सांगते की, हिंदी शिकवा असा आमचा आग्रह नाही दुसरी कुठलीही भाषा शिकवा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र हेही शक्य नाही, कारण दुसरी कुठलीही भाषा घेतली तरी त्या भाषेची रचना वेगळी असते. साधी गोष्ट शेजार भाषा शिकवायची म्हटले, म्हणजे सीमारेषेवरची भाषा, तरी मराठीच्या सीमारेषेवर एकीकडे गुजराती, एकीकडे कन्नड आहे. एक शिक्षक म्हणून अनुभव सांगते, गेली ४५ वर्षे सीमाप्रदेशात राहत असल्याने अनेक माणसे द्विभाषिक असतात, त्या दोन भाषांमध्ये एकच शब्द, एकच उच्चाराच्या दृष्टीने समान असला तरी अर्थ पूर्णपणे वेगळा असू शकतो. उदाहरणार्थ भंगार या शब्दाचा मराठीतील अर्थ मोडक्या वस्तू असा काहीसा असतो तर कन्नडमध्ये भंगार याचा अर्थ सोने असा आहे. आता हे आकलन होणे मोठ्या माणसांनाही कठीण जाते आणि मुलांना तर ते अशक्य ठरते. प्रत्येक भाषेच्या उच्चारणाची शैली वेगळी आणि उच्चारांनुसार अर्थही वेगळा होतो. म्हणजे विरामचिन्हे, आरोह, अवरोह त्यानुसार होणारे अर्थ हे सगळे एकमेकांत गुंतलेले असतात. म्हणून अर्थ परस्पराच्या दृष्टीने पूर्णपणे वेगळा असू शकतो, आणि त्याचे आकलन मुलांना होत नाही. म्हणजे मातृभाषेचा उच्चार, लेखन हे पक्के झाले की मग दुसरी भाषा शिकणे सोपे जाते. मग ती दुसरी कोणतीही भाषा असली तरी त्या दुसऱ्या भाषेचे सहज आकलन होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मातृभाषेशिवाय एखादी परकीय भाषा शिकवायला लागले, तर मुलांना आपल्या मनातील आशय सलगपणे व्यक्त करणे अवघड जाते, म्हणजे मातृभाषेतही व्यक्त करणे सोपे जात नाही. काही प्राथमिक शिक्षक असे सांगतात, की चौथीपर्यंतच्या मुलांना सरळ दहा वाक्येही मातृभाषेतून बोलता येत नाहीत. लिहिणे तर दूरच.

शिक्षकांचे काय?

आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांना जे प्रशिक्षण दिले जाते ते अपुरे असते. एखादा नवीन विषय घ्यायचा तर दहा दिवसांचे प्रशिक्षण घ्यायचे आणि त्या दहा दिवसांत शिक्षक किती समजून घेणार, आणि विद्यार्थ्यांना कसे समजून सांगणार, याचा विचार केलेला नाही. म्हणजे आत्ताही इंग्रजी हा विषय पहिलीपासून सुरू केला आहे, त्याची अशी स्थिती झाली आहे्, खेड्यापाड्यातील शिक्षक जेमतेम शिकलेले असतात, त्यांनी दहा दिवसांचा कोर्स केला, तरी या दहा दिवसांत शिक्षक किती शिकणार, मुलांना किती शिकवणार याचा विचार केला नाही.

भाषा शिकवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. स्वत:ची भाषा शिकवण्याची, म्हणजेच मातृभाषा शिकवण्याची पद्धती आणि इतर भाषा शिकवण्याच्या पद्धती या शिक्षण शास्त्रदृष्ट्या वेगवेगळ्या आहेत, हे एक शिक्षिका म्हणून नमूद करावेसे वाटते. या सगळ्याचे आकलन शिक्षकांना झाले नसेल तर नेमक्या प्रशिक्षणाच्या अभावामुळे ती भाषा आत्मसात होऊ शकत नाही.

आधी आकलन नीट हवे

लोकांना एका वेळी अनेक भाषा आल्या पाहिजेत असे मानले जाते. यामुळे प्रगल्भता येते असा समज आहे. पण हे तेव्हा शक्य आहे ज्यावेळी तुम्हाला एक भाषा चांगल्या पद्धतीने आकलन होते. ज्यावेळी तुम्हाला एका भाषेचे नीट आकलन होत असेल तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला दुसऱ्या भाषा शिकण्यास अवघड जात नाही. कारण आकलन क्षमता चांगली झालेली असते. ते आकलन नसताना नुसती भाषा शिकवणे उपयोगाचे नाही. अन्य भाषा शिकण्यासाठी त्या त्या भाषांच्या स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, रानडे इन्स्टिट्यूट (परकीय भाषा विभाग), मसाप अशा अनेक यंत्रणा आहेत. वास्तविक वयाच्या कोणत्याही टप्प्यावर अन्य भाषा शिकता येणे शक्य असते.

साने गुरूजींनी आंतरभारतीची कल्पना मांडली होती. आंतरभारती म्हणजे व्यक्तीला देशात इतरत्र बोलल्या जात असलेल्या अन्य काही भाषा आल्या पाहिजेत. आता शासन असे म्हणते, आमचा आग्रह हिंदी शिकावी असा नाही, दुसरी कोणतीही भाषा शिकावी, असे आमचे म्हणणे आहे. पण हे व्यवहारात शक्य नाही. शासनाने येथे मेख मारली आहे, हिंदीशिवाय अन्य भाषा शिकायची असेल तर किमान २० विद्यार्थी असले पाहिजेत तर त्या भाषेचे शिक्षण देऊ असे मुख्यमंत्री सांगतात. ते व्यवहार्य नाही. कारण मराठी भाषेचे कूळ वेगळं आहे, दक्षिणेकडच्या भाषेचे वेगळे कूळ आहे. यामुळे एकाच कुळातील भाषेत सर्व शिक्षण मिळणे अशक्य आहे.

टप्प्याटप्प्याने इतर भाषा शिकवा

मी महाविद्यालयात शिकवत होते, त्यावेळी रूढ विषयापेक्षा इतर विषय शिकायचे असतील तर कमीत कमी दहा विद्यार्थी असावेत असा यूजीसीचा आदेश होता. त्या वेळी दहा विद्यार्थी मिळणेही अवघड होते, आता २० विद्यार्थी कसे मिळणार आहेत? २० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षकही शासनाला परवडणारा नाही. हे विद्यार्थ्यांवर अन्यायकारक व अशैक्षणिक आहे. लादले जाणारे आहे. पालकांनीही याचा मनापासून विचार करावा. एकीकडे आपण राष्ट्रप्रेमाच्या गप्पा मारतो, आणि दुसरीकडे परकीय भाषेचा आग्रह धरतो हेही चुकीचे आहे. दुसरीकडे आपण महाराष्ट्राचा अभिमान बाळगतो असे म्हणतो, शिवाजी महाराजांनी अरबी, फारसी भाषेतील शब्दांना पर्यायी मराठी शब्द कसे निर्माण करता येतील यासाठी विद्वजनांची बैठक बोलावून राज्यव्यवहार कोष तयार केला होता. आपल्याला मराठीचा, इतिहासाचा, ज्ञानेश्वरांपासून आतापर्यंत आलेल्या साहित्य परंपरेचा, शिवाजी महाराजांचा खरोखरच अभिमान असेल तर आधी आपल्याला भाषेचा अभिमान बाळगावा लागेल. त्या भाषेचे आकलन नीट व्हावे यासाठी इयत्ता चौथीपर्यंत सर्व विषय मातृभाषेतूनच म्हणजे मराठीतूनच शिकवायला हवेत. पाचवीमध्ये विद्यार्थी गेल्यानंतर त्याला दुसरी भाषा आणि आठवीमध्ये तिसऱ्या भाषेचे ज्ञान द्यावे, कारण तोपर्यंत त्याची शारीरिक क्षमता वाढलेली असते. सहा वर्षांच्या मुलावर तीन-तीन भाषांचे आणि बाकीच्या विषयांचे ओझे लादणे अन्यायकारक व अशैक्षणिक आहे. म्हणून सहा वर्षांच्या मुलाला मातृभाषा, तीन वर्षांनी दुसरी भाषा आणि मूल १२ वर्षांचे झाल्यानंतर तिसरी भाषा अशीच पद्धत हवी. पालकही इंग्रजीचा आग्रह धरतात. याचे कारण असे आहे की त्यांना आपल्या मातृभाषेपेक्षा इंग्रजी भाषा जास्त प्रभावी वाटते. इंग्रजांचा पगडा नकळत गुलामीचा आहे, तो भाषेच्या माध्यमातून लक्षात येतो, पण हे पालक लक्षता घेत नाहीत.

आपण एकीकडे पाश्चिमात्यांचे आक्रमण नको म्हणतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या स्वच्छतागृहापासून स्वयंपाकगृहापर्यंत सगळ्या रचना आपण पाश्चिमात्यांच्याच घेतल्या आहेत, त्यांच्या भाषेचे आकर्षण वाटते. साहेब या देशातून गेला, मात्र, आपण इंग्रज गेल्यानंतर त्यांचे अनुकरण जास्त प्रमाणात करायला लागलो. विशेषत: मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय लोकांमध्ये हे दिसून येते. यामुळे साहेब गेल्यानंतर आपण जास्त ‘साहेबा’ळलो आहोत असे वाटते. मराठीचा आणि मराठी संस्कृतीचा अभिमान बाळगत असताना परप्रांतीय भाषेची अप्रत्यक्ष सक्ती होणं हेही तितकंच अन्यायकारक आहे.

आधी भाषा ऐकू, बोलू द्या…

मुले इंग्रजीत शिकली तर मुलांना उच्च स्तरातील नोकऱ्या मिळतील, असे पालकांना वाटते. पण हे पूर्णपणे सत्यात उतरलेले दिसत नाही. कारण भाषा हे केवळ उत्पन्नाचे साधन असू शकत नाही. त्या भाषेतून कुठल्या विषयाचे आकलन विद्यार्थी करतो हा महत्त्वाचा भाग असतो. शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने पालकांच्या अज्ञानातून हा हट्ट चाललेला असतो. आता त्याचा परिणाम असा होतो की, मुलांना भाषा शिकवण्याची पद्धत आहे, ती पूर्णपणे उलट्या दिशेने सुरू आहे. म्हणजे नवीन भाषा शिकवायचे म्हटले म्हणजे, मुलांच्या हाती वही पेन्सिल दिली जाते, म्हणजे मुलांनी प्रथम लिहावे अशी अपेक्षा असते. त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी कोणतीही भाषा असू दे, हे भाषा शास्त्राच्या दृष्टीने पूर्णपणे चुकीचे आहे. भाषाशास्त्राचा पद्धतशीर अभ्यास केल्यानंतर माझे हे मत झाले आहे. भाषा शिकण्याची पद्धत नैसर्गिक आहे. लहानपणापासून आपण निरीक्षण केले तर मूल पहिल्यांदा भाषा ऐकते, कुठलीही भाषा ऐकून ऐकून कानवळणी पडल्यानंतर मग कानाला उच्चाराची सवय होणे, यानंतर त्याचा उच्चार करणे आणि मग बोलणे हा क्रम असतो. मूल पहिल्यांदा इतरांना बोलताना पाहत असते. आई गाणी म्हणते, आजी काही तरी बोलत असते, याचे निरीक्षण बालक करत असते. त्याला लीपरीडिंग म्हणजेच ओष्ठवाचन म्हणतात. नकळत बालकाकडून निरीक्षण होत असते, यानंतर उच्चार करण्याचा बालक प्रयत्न करते. मग त्याच पद्धतीने बालक बोलण्याचा प्रयत्न करते. मग वाचन. यानंतर समोर दिसणारे अक्षर आणि कानवळणी पडलेला उच्चार याची सांगड घालण्याचा प्रयत्न हा बालकाचा तिसरा टप्पा येतो. हा टप्पा विकसित झाल्यानंतर चौथा टप्पा येतो तो लेखनाचा. यावेळेपर्यंत बालकाची हाताची बोटेसुद्धा पुरेशी सक्षम होणे गरजेचे आहे. यानंतर भाषाशास्त्रानुसार मुलाच्या आकलनाचे ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे असे टप्पे असले पाहिजेत. आपण मात्र चुकीच्या पद्धतीने मुलाला प्रथम लिहिता आले पाहिजे असा आग्रह धरतो, हे चुकीचे आहे. यामुळे मुलाला कोणतीच भाषा नीट येत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शब्दांकन- दिगंबर शिंदे