रघुनंदन भागवत
देवेंद्रजी, आपण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विक्रमी विजय मिळवून एक नवा ‘इतिहास’ घडवलात त्यावेळी आमच्यासारख्या भाजप समर्थकांचे हृदय आनंदाने उचंबळून आले होते. आपण त्या निवडणुकीत घेतलेले अपार कष्ट, आखलेली रणनीती, कार्यकर्त्यांत निर्माण केलेली ऊर्जा, त्यांच्यात जागवलेला जोश/आत्मविश्वास याबद्दल आपले कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतील. तुम्ही परत मुख्यमंत्री झालात याबद्दल तुम्हाला झाला नसेल इतका आनंद भाजप/संघ कार्यकर्त्यांना झाला होता. सत्तेवर आल्यावर आपण धडाक्यात कामाला सुरुवात केलीत. अनेक नावीन्यपूर्ण योजना, प्रकल्प यांची मुहूर्तमेढ रोवलीत. आपला ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्ग पूर्ण झाला. नवनवीन मेट्रो मार्ग कार्यान्वित झाले, अपारंपरिक ऊर्जेला महत्त्व प्राप्त झाले. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होऊ लागली. वाढवण बंदराचे काम सुरू झाले अशा किती कामांची यादी सांगू! गृहमंत्री म्हणूनही आपण न बोलता/गाजावाजा न करता देशहिताची अनेक कामे करत आहात. असामाजिक तत्त्वांच्या मुसक्या बांधत आहात याची जाणीव महाराष्ट्राच्या जनतेला आहे आणि यासाठी जनता आपली ऋणी आहे. भारताचे भावी पंतप्रधान म्हणून मराठी जनता आपल्याकडे आशेने/अभिमानाने बघत आहे. पण… देवाभाऊ, भाजपच्या पक्षीय पातळीवर ज्या घडामोडी घडत आहेत त्या पाहून ‘हेचि फळ काय मम तपाला’ अशी भाजप कार्यकर्ते व समर्थकांची तीव्र भावना झाली आहे.
नाशिकचे ‘उबाठा’सेनेतील एक पुढारी सुधाकर बडगुजर यांना भाजपने पक्षात घेऊन पावन करून घेतल्याची बातमी वाचली आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. देवेंद्रजी, आम्हालाही बेरजेचे राजकारण कळते पण त्यासाठी भाजप इतकी लाजलज्जा सोडेल असे वाटले नव्हते…

मविआच्या काळात याच सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बॉम्बस्फोटातील एक आरोपी ‘सलीम कुत्ता’ याच्याबरोबर नृत्य करतानाचा व्हिडीओ सर्व मराठी वाहिन्यांवर दाखवण्यात आला होता. त्यावेळी भाजपने याच बडगुजरविरोधात आकाशपाताळ एक केले होते. या माणसाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पाढा वाचण्यात आला होता. आपल्याच नाशिकच्या आमदार सीमाताई हिरे जाहीरपणे बडगुजरांची कुंडली मांडत आहेत आणि आपल्याला कळकळीने आवाहन करीत आहेत की तुम्ही बाकी कुणालाही पक्षात घ्या पण या बडगुजरला पक्षात घेऊ नका. तरीसुद्धा या माणसाला पक्षात घेण्याइतके काय ‘सोने’ लागून गेले आहे? खरे म्हणजे पहिल्या प्रथम आपण या गृहस्थाला भेटीची वेळ द्यायलाच नको होती. आपल्या अशा निर्णयामुळे आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर/नेत्यांच्या मनोबलावर किती विपरीत परिणाम होत आहे याची जाणीव तुम्हाला नाही का?

बडगुजर कमी की काय त्याच्या जोडीने आपण बबनराव घोलप यांच्यासाठी पायघड्या घालत आहात अशी पण बातमी वाचनात आली. हा तर कहरच झाला. बबनराव घोलप यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना केलेले प्रताप जनतेच्या अजूनही स्मरणात आहेत. त्यावेळी गाजलेल्या चर्मोद्याोग महामंडळात झालेल्या महाघोटाळ्यात बबनराव घोलप एक आरोपी होते आणि अण्णा हजारे यांनी रान उठवल्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

आपण काँग्रेसच्या सुनील केदार यांनाही काही सिग्नल दिला आहे का माहीत नाही, पण केदारना भाजप हा लोकशाहीवादी पक्ष असल्याचा साक्षात्कार अचानक कसा होऊ लागला आहे? नुकतेच टीव्हीवर त्यांचे तसे वक्तव्य पाहण्यात आले. केदार यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांची आमदारकी गेल्याचे वाचनात आले. तसेच या माणसाचे नाव २५ वर्षांपूर्वी गाजलेल्या ‘होम ट्रेड फायनान्स’प्रकरणातही आले होते. हेही सदगृहस्थ आपल्या ‘वैटिंग लिस्ट’वर आहेत का ते एकदा सांगून टाका.

वरील उदाहरणे केवळ प्रातिनिधिक आहेत. अशी ओवाळून टाकण्याच्या लायकीची माणसे जवळ करून भाजप ‘लाडक्या बहिणीं’ना कुठली ओवाळणी घालत आहे याचा विचार करा. उद्या आपण या सर्वांना तिकिटे द्याल तेव्हा भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते प्रचारासाठी मतदारांकडे कुठल्या तोंडाने जातील?

आधीच ‘राष्ट्रवादी’तील (अप )घाणीने आपले कपडे चिखलाने माखत आहेत. त्यात रोज नवीन शिंतोड्यांची भर पडत आहे. ते कपडे धुण्यापूर्वीच आपण ते आणखी घाण करून घेत आहात, ते आपल्या लक्षात येत नाही का?

आपण मुख्यमंत्री आहात, तरी आपण राज ठाकरेंना भेटायला कसे जाता हे कोडे उलगडत नाही. राज ठाकरे यांच्यासारख्या ‘बेभरवशी’ माणसाला इतके डोक्यावर घ्यायचे काय कारण आहे? बरे भेटायचे तर कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण भेटू शकतात की. राज आणि उद्धव एकत्र येतील ही भीती आपल्याला सतावते आहे का? अहो, एका म्यानात दोन ‘तलवारी’ राहू शकत नाहीत तर राज आणि उद्धव एकत्र कसे राहू शकतील हे सामान्य जनतेलासुद्धा कळते, ते आपल्याला कळत नाही असे कसे म्हणायचे?

आता सामान्य माणूस म्हणू लागला आहे की उद्या संजय राऊत यांनासुद्धा भाजपने प्रवेश दिला तरी आश्चर्य वाटायला नको. राजकारणात काहीही होऊ शकते हे सिद्ध करण्याचा मक्ताच जणू भाजपने घेतला आहे असे वाटते.

राष्ट्रीय राजकारणात मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागत आहेत, म्हणून काय वाटेल त्या तडजोडी करायच्या का? उद्या भाजपचे दिवस फिरले तर हेच बाजारबुणगे/उपरे संधीसाधू ‘ट्रोजन हॉर्स’ ठरतील आणि बोटीतून उड्या मारणारेही हेच पहिले असतील.

माधव भंडारी यांना आपण अजून न्याय देऊ शकला नाहीत. असे अनेक माधव भंडारी भाजपमध्ये आहेत ज्यांची पूर्ण हयात केवळ सतरंज्या उचलण्यात गेली आहे. ‘त्याग’, ’तपस्या’, ‘बलिदान’ भाजपच्या निष्ठावंतांसाठी आणि सत्तेचे ‘अन्नछत्र’ मात्र पाहुण्यांसाठी असे चित्र भाजपमध्ये सध्या दिसत आहे.

महाराष्ट्रातील भाजप पूर्णपणे सुस्तावलेला दिसत आहे. फडणवीस निवडणुका जिंकून देतील आपल्याला काही करायची जरूर नाही अशी कार्यकर्त्यांची मनोवृत्ती झालेली आढळते.

भाजपवाल्यांना आत्मसन्मान नावाची काही चीज आहे की नाही असा प्रश्न पडतो. संजय राऊत, ‘उबाठा’ आणि काँग्रेसचे पुढारी मोदी, शहा आणि तुमच्याबद्दल इतके खालच्या पातळीवर जाऊन बोलतात, तुम्हाला ‘कसाई’ म्हणतात तरी भाजप कार्यकर्त्यांचे रक्त पेटून कसे उठत नाही याचे आश्चर्य वाटते. तुम्ही सत्ताधारी असलात तरी या असल्या हीन वाचाळवीरांना जरब बसेल अशी कृती पक्षाकडून अपेक्षित आहे. एक नितेश राणे असून उपयोगी नाही. प्रतिपक्षावर तुटून पडणारी कार्यकर्त्यांची एक फळी मैदानात उतरवा. मुखदुर्बळ प्रवक्त्यांच्या जागी ‘अरे’ला ‘कारे’ करणारे प्रवक्ते नेमा.

देवेंद्रजी, मी काही भाजपचा कार्यकर्ता नाही, पण एक ‘डोळस हितचिंतक’ जरूर आहे. त्रयस्थ नजरेने पाहताना ज्या गोष्टी अस्वस्थ करतात /खटकतात त्या मोकळेपणाने मांडण्याचे स्वातंत्र्य मला आहे असे मी समजतो आणि तुम्ही ते मान्य कराल अशी मला खात्री आहे (कारण मी काही पक्षशिस्तीला बांधलेला नाही) त्याच विश्वासापोटी मी लहान तोंडी मोठा घास घेतला आहे असे समजा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी जाता जाता एकच इशारा द्यावासा वाटतो की, प्रतिकूल परिस्थितीत पक्षासाठी हाडाची काडे करणारे वामनराव परब, ग. भा. कानिटकर, रामभाऊ म्हाळगी, उत्तमराव पाटील, राम कापसे, आपले स्वत:चे तीर्थरूप, हशु अडवाणी यासारखे अनेक ‘भाजपच्या पायाचे दगड’ सध्याचे पक्षप्रवेश बघून स्वर्गातून म्हणत असतील की… ‘देवेंद्रजी, या ‘पापा’ला क्षमा नाही’.